Hamid Dalwai (29 September 1932 - 3 May 1977) was a writer and social reformer. This blog is an attempt to create a small document about this iconic figure.
हमीद दलवाई
Showing posts with label हमीद दलवाई. Show all posts
Showing posts with label हमीद दलवाई. Show all posts
Tuesday, October 20, 2020
हमीद दलवाईंवरील एक माहितीपट
ज्योती सुभाष यांनी दिग्दर्शित केलेला हमीद दलवाईंवरचा माहितीपट यू-ट्यूबव १६ ऑक्टोबर २०२० रोजी अपलोड झाल्याचं दिसलं, तो इथे यू-ट्यूबद्वारेच जोडला आहे.
Monday, January 16, 2017
हमीद दलवाईंची एक मुलाखत
![]() |
| हमीद दलवाई |
मुलाखत
प्रकाश भागवत (यवतमाळ): जातीय दंलगींना मुख्यतः कोण जबाबदार आहे?
- जातीय दंगलींना बरेचदा मुसलमान आणि अनेकदा हिंदू जबाबदार असतात.
मेधा गोळवलकर (दादर): आपल्या विचारसरणीत आणि भारतीय जनसंघाच्या ध्येयधोरणात काय मतभेद आहेत?
- मला गोहत्याबंदी साफ अमान्य आहे. व्यक्तीच्या समानतेवर नवी समाजरचना अस्तित्वात यावी असे मला वाटते. अलीगड व बनारस या विद्यापीठांच्या नावातून अनुक्रमे मुस्लिम व हिंदू हे शब्द गाळण्यात यावे व ती राष्ट्रीय विद्यापीठे म्हणून घोषितकरावीत असेही माझे मत आहे. स्त्रियांना पुरुषांइतकेच समान अधिकार असावेत म्हणून मी समान नागरी कायद्याचा गेली काही वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. सर्वांनीच कुटुंबनियोजन करावे, इतकेच नव्हे तर, ते सर्वांना सक्तीचे व्हावे असे माझे मत आहे. थोडक्यात या देशाचे शासकीय निर्णय कुठल्याही धर्मसमुदायाला काय प्रिय किंवा अप्रिय आहे किंवा काय मंजूर किंवा नामंजूर आहे, यावरून न ठरवता, या देशातील कोट्यवधी जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीकरता काय आवश्यक आहे याचा विचार करून ठरविले जावे असे मला वाटते. जनसंघाचे यासंबंधी कोणते धोरण आहे हे आपल्याला या पक्षाच्या ध्येयधोरणविषयक सिद्धांतात सापडू शकेल. मेधाबाई, आमच्यातील मतभेद हुडकून काढणे आपल्याला वरीस उत्तरावरून सोपे जाईल, अशी मी आशा बाळगतो.
अशोक परब (जोगेश्वरी): आंतरजातीय विवाहाबद्दल आपले प्रामाणिक मत काय?
- आंतरजातीय विवाह ज्यांना करायचे असतील त्यांना अनिर्बंधपणे करता आले पाहिजेत असे माझे मत आहे. विवाह ही व्यक्तिगत बाब आहे, त्यात इतरांनी लुडबूड करू नये असे मी मानतो.
मी मांडीत असलेली सर्वच मते प्रामाणिक असल्यामुळे माझे हे मत प्रामाणिक आहे, हे लिहायची आवश्यकता नाही असे मला वाटते.
रमेश उदारे (मुंबई): 'जो मूर्तिपूजक त्याचा समूळ नाश करा' असं विधान कुराणात आहे का?
- आपण म्हणता तसे विधान नाही. मात्र मूर्तिपूजकांवर, त्यांना अवमानीत करण्यासाठी कर लावावा असे एक विधान आहे. यातूनच 'जिझिया' कराचा जन्म झाला आहे.
वास्तविक कुराणामध्ये काय लिहिले आहे, यापेक्षा आपण आत्ता मानवी संबंध कोणत्या पातळीवर ठेवायचे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशा प्रकारची सामाजिक असमतेचा पुरस्कार करणारा विधाने सर्वच धर्मशास्त्रात आढळतील. मनुस्मृतीनेदेखील स्त्रियांना आणि कनिष्ठ वर्गीयांना समान स्थान दिलेले नाही. आता भारतीय समाज मनुस्मृती अथवा कुराणचे आदेश यावर आधारलेले राहणार नाही. भारतीय समाजाची जडणघडण सर्व व्यक्तींच्या समानतेवर आधारलेली असेल, हे हिंदू आणि मुसलमान या दोहोंनी ओळखणे आवश्यक आहे.
अ. रा. कस्तुरे (गुलटेकडी): भारताबाहेर मुस्लिम आणि मुस्लिमेतरांचे संबंध कसे काय आहेत?
- काही ठिकाणी चांगले आहेत. काही ठिकाणी वाईट आहेत. उदा. इंडोनेशियात ख्रिश्चन, बौद्ध व हिंदू अल्पसंख्याक आहेत, पण तेथे धार्मिक तणाव नाहीत. मलेशिया, तुर्कस्तान, लेबेनान, ट्युनिशिया इत्यादी देशांत बिगरमुस्लिम अल्पसंख्याक राहतात आणि त्यांचे संबंध चांगले आहेत. काही अरब देशांतून ज्यू आणि ख्रिश्चन यांची हकालपट्टी झालेली आहे. बांगलादेशामध्ये आता हिंदू अल्पसंख्याकांना सुरक्षितता लाभलेली आहे असे हे चित्र आहे.
महादेव कोकाटे, चंद्रकांत धर्माधिकारी (अंधेरी): जातीयवादी मुसलमानांची संख्या वाढताच भारतात पुन्हा नव्या 'पाक'ची मागणी होण्याची शक्यता आहे, असं आपल्याला नाही का वाटत?
- जातीयवादी मुसलमान कोणती मागणी करतील यासंबंधी आपण फारशी चिंता बाळगण्याचे कारण नाही. ते 'भेंडीबाजारात पाकिस्तान हवे' असेसुद्धा सांगतील. त्यांनी अशी मागणी केल्यामुळे तसे काही आता घडण्याची शक्यता आहे असे समजणे बरोबर ठरणार नाही. एक तर आता वेगळे राष्ट्र द्यायला परकीय सत्ता अस्तित्वात नाही आणि मुस्लिम बहुसंख्याकांचे राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक तेवढे मोठे प्रदेश अस्तित्वात नाहीत.
महंमद समी कॉन्ट्रॅक्टर (औरंगाबाद): आपण स्वतःला मुसलमान समजता का? असल्यास नमाज, रोजा, कुराण आणि आखीरत याबद्दल आपली धारणा काय आहे?
- मी नमाज पढत नाही, उपवास करीत नाही. कारण हे ईश्वरनिर्मित नसून महंमदनिर्मित आहे असे मी मानतो. यामुळे आखीरतवर माझा विश्वास नाही, हे ओघानेच आले. आणि तरीही मी मुसलमान आहे, कारण मी मुस्लिम समाजात जन्माला आलो आहे. नेहरू निरीश्वरवादी होते आणि तरीही ज्या अर्थाने हिंदू होते, त्या अर्थाने मी मुसलमान आहे. कारण मुस्लिम अथवा हिंदू असणे याची केवळ पोथीबद्ध व्याख्या मी मान्य करीत नाही. ती अधिक व्यापक आहे असे मी मानतो.
बाळ जांभेकर (वसई): तुमचे राजकीय गुरू कोण? तसेच बाळ ठाकऱ्यांप्रमाणे तुमच्याबरोबर शरीररक्षक असतात काय?
- माझा राजकीय गुरू मीच. शरीररक्षक ठेवायला पैसा कुठे आहे?
गुलाम अहमद (औरंगाबाद): महाराष्ट्रातील दहा टक्केच मुस्लिम मराठी भाषा समाजतात. तरी तुम्ही तुमचं कार्य मराठीतून का करता?
- महाराष्ट्रातील नव्वद टक्के मुसलमान मराठी समजतात. फक्त शहरी विभागातील दहा टक्के मुसलमान मोडकेतोडगे उर्दू जाणतात. हे उर्दूदेखील 'धावत धावत म्हावर लानेको गया' किंवा 'झाडावरनं पडल्याबरोबर पाव फुट्या' अशा पद्धतीचे उर्दू बोलतात. हे उर्दू ऐकून लखनौच्या उर्दू भाषिकाला चक्क मूर्च्छाच येत असेल!
गुलाम अहमदभाई, आमचे कार्य आम्ही मराठीत का करतो, हे आता आपल्या लक्षात आले ना?
सुधीरकुमार आचार्य (कल्याण): समाजसुधारणेच्या कार्यक्रमात आपणास आपल्या कुटुंबीयांचे साह्य कितपत मिळते?
- अनेक प्रकारे मिळते. कुटुंबीय म्हणजे कोण, हे आपण स्पष्ट केलेले नाही. माझी पत्नी नोकरी करून द्रव्यार्जन करते आणि पर्यायाने माझ्यावरील कौटुंबिक जबाबदारीचा भार कमी करते, हेही मोठेच साह्य आहे असे मी मानतो.
स्वामीप्रसाद पंडित (पिंपरी): सर्जनशील लेखक राजकारणात पडल्यास त्याला ते कितपत साधेल? आपण एक समर्थ ललित लेखक आहात, सध्या ललित लेखन सोडले का?
- राजकारण मला कितपत साधले आहे यावरून आपणच आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधणे योग्य ठरेल. ललित लेखनाला पुरेशी मनाची उसंत मिळत नाही. त्याची खंतही वाटते. खंत वाटणे ही बाब कदाचित मी पुन्हा ललित लेखन करू शकेन असा दिलासा आपल्याला द्यायला तूर्त पुरेशी आहे.
मीनाक्षी ताटके (पुणे): आपली स्वतःची धर्माबद्दलची मते जी काही आहेत, ती घरातील सर्व मंडळींना विशेषतः आई, वडील, पत्नी, मुले यांना पटतात का?
- पटतातच असे नव्हे, पटावीत असा माझा आग्रहही नसतो. त्यांचा दृष्टिकोन त्यांनी माझ्यावर लादू नये. प्रत्येकाला धार्मिक मतस्वातंत्र्य असावे, असे मी मानतो. या दृष्टीने आम्ही आमच्या घरात लोकशाही स्वातंत्र्य अंमलात आणले असून, शांततामय सहजीवनाचे युग सुरू केले आहे. आपण हा प्रयोग करून पहायला काही हरकत नाही.
शेख सिराज अहमद (समशेरपूर): महाराष्ट्रातील बहुसंख्य मुस्लिम समाज ग्रामीण भागात राहात असताना, सत्यशोधक समाज शहरी भागात का?
- कुठलीही चळवळ प्रथम शहरात सुरू होते. मागाहून ती ग्रामीण भागात पसरते. आमची चळवळ आता सुरू झाली आहे. ती वाढेल तशी ग्रामीण भागात पसरेल. सध्या ती शहरातच का, याचे उत्तर आपल्याला सापडले ना?
संजीव पोहेकर (बुलढाणा): जर तुम्हाला 'ब्लॅक डिसेंबर'ने खुनाची धमकी दिली तर तुम्ही काय कराल?
- तुम्हाला मदतीला बोलावेन!
अरुण चव्हाण (सातारा): हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे आज भारतात मुसलमान सर्वसाधारणपणे सुखाने कालक्रमणा करीत असताना, मुसलमान समाज आपल्यात एकरूप का होऊ शकत नाही?
- या प्रश्नाचे समग्र उत्तर द्यायला एक प्रबंधच लिहावा लागेल. मुस्लिम समाजातील विभक्तवादी चळवळी त्या समाजाला एकरूप होऊन देत नाहीत, हे आपल्या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर होऊ शकेल. पण हिंदूंना आधुनिक बनवूनच मुस्लिम समाजातील विभक्ततावाद मोडावा लागेल.
सुधाकर जोशी (जामनेर): राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातीय आहे काय?
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातीय आहे, असा त्यांच्या प्रवक्त्यांचाच दावा आहे. संघाच्या नेत्यांची भाषणे, त्यांचे लिखाण आणि त्यांनी वेळोवेळी घेतलेली भूमिका यावरून आपल्याला याची प्रचिती येईल.
विश्वास डिग्गीकर (उमरगा): राजकारणातील चांगली माणसे आर्थिकदृष्ट्या भक्कम असलेली क्वचितच आढळतात, म्हणून विचारतो आपल्या उपजीविकेची साधने कोणती?
- मला सी.आय.ए. (अमेरिकन गुप्तहेर संघटना), के.जी.बी. (रशियन गुप्तहेर संघटना), ख्रिश्चन धर्मोपदेशक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, तसेच पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारख्या परस्परविरोधी विचारसरणीच्या व्यक्ती व संघटना यांच्याकडून पैसा पुरविण्यात येतो, असे मुस्लिम जातीयवाद्यांचे म्हणणे आहे. तर मी पाकिस्तानचा छुपा हस्तक असून, याह्याखान व सध्या झुल्फिकार अली भुट्टो मला पैसा पुरवतात, असे काही निवडक हिंदुत्ववादी आपसात कुजबुजत असतात.
वस्तुस्थिती अशी आहे की, मी 'इंडियन सेक्युलर सोसायटी'चा पूर्णवेळ कार्यकर्ता असून, सोसायटीकडून उपजीविकेला आवश्यक तेवढे मानधन घेतो. तसेच माझी पत्नी नोकरी करते व मुंबईच्या उपनगरात एका चाळीवजा डबल रूममध्ये मी राहतो. देणग्या मिळवून तसेच काही कार्यक्रमाच्या निमित्ताने स्मरणिकाद्वारा जाहिराती मिळवून आम्ही सोसायटीला आर्थिक साहाय्य मिळवतो.
विश्वासराव, आपला माझ्यावर विश्वास असेल असे समजून माझ्या उपजीविकेविषयी आपले मत बनविणे, मी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोपवतो.
व्यंकटेश लिगदे (मुंबई): सर्वांसाठी समान नागरी कायदा इंदिरा सरकार का लागू करत नाही? 'एकगठ्ठा' मतासाठी मुसलमानांच्या 'शरियत'मध्ये बदल करणार नाही असे काँग्रेसवाले म्हणतात, ते खरं आहे काय?
- आपण एकूण दोन प्रश्न विचारले आहेत. पहिला प्रश्न तुम्ही इंदिरा गांधींना विचारणे बरे! 'एक गठ्ठा' मतासंबंधीचे आपले मत खरे आहे, परंतु काँग्रेसचे नेते 'आम्ही मुस्लिम कायद्यात सध्या बदल करणार नाही' असे म्हणत असतात. यातील 'मुस्लिम कायद्यात' आणि 'सध्या' हे काँग्रेसजनांचे दोन शब्दप्रयोग फार महत्त्वाचे आहेत. भारतात मुसलमानांना 'मुस्लिम कायदा' अस्तित्वात आहे, 'शरियत' नव्हे. शरियत सौदी अरेबिया वगळता इतर कुठेच अस्तित्वात नाही. आणि 'सध्या कायदा करणार नाही' याचा अर्थ, वेळ येताच करू असा मी तरी घेतो.
दिलीपकुमार पाटणेकर (चिपळूण): हमीदभाई, मुस्लिम लीग ही मुसलमानांना शाप आहे की वरदान?
- शाप! केवळ मुसलमानांनाच नव्हे तर हिंदूंना, तसेच आपल्या देशालाही तो शापच आहे असे मी समजतो.
सुबोध वि. थरवळ (खेड, रत्नागिरी): इस्लाम हा जास्तीत जास्त लोकशाहीवादी आणि समताप्रधान धर्म आहे. आपले मत काय?
- कुठलाच धर्म लोकशाहीवादी तसेच समतावादी नाही. इस्लामही ह्याला अपवाद नाही. धर्म आध्यात्मिक पायावर समाजाती उभारणी करीत असतात. ते मध्ययुगीन आहेत आणि लोकशाही, स्वातंत्र्य, समानता या आधुनिक कल्पना आहेत. धर्माच्या पायावर आता सुसंस्कृत समाजव्यवस्था निर्माण होऊ शकणार नाही, हे आपण सगळ्यांनी ओळखले पाहिजे.
दिगंबर पाठक (अमरावती): आपण नेहमी हिंदू-मुसलमान ऐक्याबद्दल लिहिता-बोलता, परंतु आजचा सुशिक्षित मुसलमान समाजसुद्धा भारताबद्दल आपुलकी जिव्हाळा दाखवावयास तयार नाही, हे बऱ्याच घटनांनी दाखवून दिलेले आहे. यावर आपले मत काय?
- मी काय मत सांगणार? भारतीय सुशिक्षित मुसलमान समाज भारताबद्दल जिव्हाळा दाखवत नाही, असे मीच अनेक उदाहरणे देऊन म्हटले आहे. आणि माझ्या या मताबद्दल माझे मत काय, असा प्रश्न आपण मला विचारता! इतका विनोदी प्रश्न विचारल्याबद्दल आपल्याला 'मनोहर'चे (ललित पद्धतीचे) 'नोबेल' पारितोषिक दिले पाहिजे, असे माझे मत आहे.
क्षमा तावडे (मुंबई): मुसलमान लोक कुटुंबनियोजनाला विरोध करतात, हा देशद्रोह नाही का?
- कुटुंबनियोजनाला सनातनी मुसलमान, कॅथॅलिक समाज, जनसंघाचे काही नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुरीचे शंकराचार्य आणि आचार्य विनोबा भावे इतक्यांचा विरोध आहे. ही सर्व मंडळी राष्ट्रद्रोही आहेत असे आपल्याला सुचवायचे आहे काय?
वस्तुतः या देशाच्या कोट्यवधी जनतेच्या आर्थिक उन्नतीकरता जी राष्ट्रीय धोरणे आपण आखली आहेत. ती सर्वांनी अंमलात आणली पाहिजेत असे माझे मत आहे. कुटुंबनियोजन हे त्यातील एक धोरण आहे. ते सर्वांना सक्तीचे केले पाहिजे असे मी मानतो.
त्याचबरोबर ज्या देशात भाकड गुरांची संख्या प्रचंड आहे आणि त्यांची संख्या प्रचंड आहे आणि त्यांची संख्या पद्धतशीरपणे तेहतीस टक्के कमी करण्याची जरूरी आहे, असे देशातील बहुसंख्याक शेती-अर्थतज्ज्ञ सांगत असताना गोहत्याबंदीचा पुरस्कार करणे हेही देशाच्या प्रगतीत खीळ घालणारे आहे, असे आपल्याला नाही का वाटत?
विनोद वि. तंब्रे (नाशिक): बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटते?
- बांगलादेश नुकताच स्वतंत्र झाला आहे आणि मुक्तिलढ्याच्या काळात तेथे प्रचंड विध्वंस होऊन चुकला आहे. यामुळेच तेथे सध्याचे अस्थिर वातावरण दिसते आहे. आर्थिक पुनर्रचनेचा वेग वाढला की, तेथे हळूहळू राजकीय स्थैर्य प्राप्त होईल. आणि भारताशी त्याचे संबंध चांगले राहतील असेही मला वाटते.
श्यामकांत कुलकर्णी (मालेगाव): आपणास हिंदू होणे आवडेल काय?
- या आधी श्री. महंमद समी कॉन्ट्रॅक्टर यांनी विचारलेल्या प्रश्नाला मी दिलेल्या उत्तराकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. मी जन्माने मुसलमान आहे आणि संस्कृतीने हिंदू आहे. त्यामुळे मी हिंदू अथवा मुसलमान न राहता, चांगला माणूस बनावे या माझ्या आंतरिक इच्छेकडे एक पाऊल तरी प्रगती केली आहे असे मला वाटते. कारण धर्म ही बाब आता रूढ अर्थाने कालबाह्य झाली आहे, असे मी समजतो.
श्यामकांतराव, याकरता तूर्त मला माणूस म्हणूनच राहू द्या! उगाच हिंदू-मुस्लिमात माझी ओढाताण करू नका!
सुलभा बाकरे (अमरावती): आपल्या कार्यत आपल्याला पदोपदी अपेक्षाभंग, अपमान, निराशा पदरी येत असेल. अशा वेळी माणसाला आपलं मन हलकं करायला, कुणाचा तरी आधार, सहानुभूती हवी असते, तर असे आपले आधारस्थान कोणते?
- मी या दृष्टीने खरोखरच कधी विचार केला नव्हता. आपली कल्पना चांगली आहे. मी तिच्यावर विचार करतो आहे.
रवींद्र अफझुलपूरकर (सोलापूर): केवळ ब्राह्मण, पारशी यांसारख्या अल्पसंख्या जाती सोडून इतर 'अल्प(?)संख्य' जातींबद्दल सरकारने जे धोरण अवलंबिले आहे, ते मुसलमानधर्जिणेच आहे. निधर्मी नव्हे, खरे की नाही?
- मुसलमानांकडे 'गठ्ठा' मते आहेत म्हणून सत्ताधारी पक्ष त्यांना सांभाळून घेते असे आपल्या प्रश्नांचे योग्य उत्तर ठरेल.
अनिल चनाखेरकर: बुद्धिवादी मुसलमान मध्यमवर्गीयांअभावी मुस्लिम समाजात वैचारिक क्रांती होणे अशक्यप्राय आहे. हा समाज निर्माण करण्यात आपण कशा दृष्टीने प्रयत्नशील आहात?
- मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्य हा अशा प्रकारचे वैचारिक नेतृत्व निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे.
गणेश परशुराम बावकर (दोनिवडे): मुल्लामौलवींना व धर्मांध मुस्लिम समाजाला उघडउघड सामोरे जाऊन नवीन मते प्रतिपादन करताना आपल्याला जीवाची भीती वाटत नाही?
- भीती वाटली असती तर मी हे काम केले असते असे आपल्याला वाटते काय?
Monday, July 22, 2013
हमीद दलवाई - नरहर कुरुंदकर
नरहर कुरुंदकरांचा हा लेख १९७९ साली 'हमीद' या पुस्तिकेसाठी लिहिलेला, नंतर तो कुरुंदकरांच्या 'वाटचाल' या पुस्तकातही होता. जुलै २०१३मध्ये कुरुंदकरांच्या लेखनाचा पहिला निवडक खंड 'व्यक्तिवेध' प्रकाशित झाला. (संपादन - विनोद शिरसाठ. प्रकाशक - देशमुख आणि कंपनी). या पुस्तकातून संपादकांच्या परवानगीने हा लेख इथे नोंदवतो आहे.
***
हमीद दलवाई यांच्या निधनाला ३ मे १९७८ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. ३ मेला त्यांची प्रथम पुण्यतिथी येत आहे. या योगाचे निमित्त करून मुस्लिम राजकारणाचे विवेचन करणारी दलवाईंची एक जुनी पुस्तिका व अगदी शेवटच्या दिवसांतील त्यांची एक मुलाखत पुन्हा एकत्र करून पुनर्मुद्रित करण्यात येत आहे. दलवाई हे नानाविध कारणांनी आपली कर्मठ धर्मश्रद्धा टिकवून ठेवणाऱ्या मुस्लिम समाजात उदयाला आलेले लोकविलक्षण धडाडीचे आणि आपल्या लोकप्रियतेचा कोणत्याही क्षणी होम करण्यास तयार असलेले कार्यकर्ते होते. आधुनिक भारतीय राजकारणाच्या इतिहासात दलवाईंच्या इतका मूलगामी चिंतन करणारा निर्भय विचारवंत दुसरा नाही. महात्मा फुले यांच्या काळात त्यांचे कार्य जितके अवघड होते, त्यापेक्षाही दलवाईंचे काम काही बाबतीत अधिक कठीण होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली तर दलवाईंना त्यांच्या समाजातून फार मोठा प्रतिसाद कधीच का मिळू शकला नाही, यावर थोडासा प्रकाश पडेल. महात्मा फुले आणि हमीद दलवाई यांना समोरासमोर ठेवून विचार करताना माझ्यासमोर त्यांची तुलना करणे हा हेतू नाही. माझा हेतू अगदी मर्यादित आहे. आणि तो म्हणजे, मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजात दलवाईंना पाठिंबा मिळण्यास अडचण कोणती आली, या बाबींकडे लक्ष वेधणे. तेवढ्या सीमित प्रश्नापुरताच हा मुद्दा विचारात घ्यायचा आहे.
महात्मा फुले यांचा काळ कितीतरी जुना. जवळजवळ एका शतकाचे अंतर दोघांच्यामध्ये आहे. फुले यांच्या काळी हिंदू समाज आजच्या मानाने कितीतरी रूढीप्रिय, अंधश्रद्ध आणि परंपरावादी होता. पण हिंदू समाजाची रचना व जडण-घडण पुष्कळशी विस्कळित आणि विविधतेला वाव देणारी अशी आहे. वेगवेगळ्या जातीजमाती, चालीरीती, परस्परविरोधी (भिन्नभिन्न) विचार हिंदू समाजात नेहमीच वावरत आले. सुसंघटित व एक ग्रंथाचे प्रामाण्य मानणारा असा हिंदू समाज नव्हता; आजही नाही. विचार मांडण्याच्या बाबतीत खूप मोठे स्वातंत्र्य हिंदू समाजात राहत आले आणि सर्व विचारांना माना डोलवीत त्याच वेळी चिवटपणे आपला परंपरावाद जतन करण्याची हिंदू मनाची शक्तीही फार अफाट आहे. आजही महात्मा फुले यांचा पुरस्कार व जयजयकार करीत परंपरावाद जतन करण्याची मनोवृत्ती हिंदूंच्यामध्ये दिसते. महात्मा फुल्यांचे पुतळे उभे करणे, आपले महान नेते म्हणून त्यांना लक्ष अभिवादन करणे आणि आपले बुरसटलेले मन तसेच जतन करून ठेवणे, हे हिंदूंना अजिबात कठीण वाटत नाही. मुस्लिम समाज यापेक्षा निराळा आहे.
मुस्लिम समाजातही शिया-सुन्नींच्यासारखे मतभेद आहेत. त्याहून थोडे दूर असणारे अहमदियाही आहेत. पण हा फरक फारसा नाही. एक प्रेषित, एक धर्मग्रंथ यांमुळे आणि जवळपास एक असणाऱ्या कायद्यामुळे मुस्लिम धर्माचे स्वरूप हिंदूंच्या मानाने कितीतरी सुसंघटित आहे, आणि विचारस्वातंत्र्याची त्यांची परंपराही मर्यादित आहे. प्रेषित, कुराण आणि परंपरा यांचा मला परिपूर्ण पाठिंबा आहे असे मानणाऱ्या दोन माणसांत जितका मतभेद असू शकतो, तितकेच विचारस्वातंत्र्य मुस्लिम समाजात असे. एक विचार जाहीर रीतीने मान्य करायचा, तो विचार मांडणारा आपला नेता समजायचा व तरीही परंपरावादी मन जतन करायचे, असा दुटप्पीपणा मुस्लिम समाज फारसा पेलू शकत नाही. आचार-विचारस्वातंत्र्य यांची परंपरा नसणाऱ्या या समाजात दलवाई उदयाला आले होते. त्यामुळे फुले यांच्यापेक्षा त्यांच्या समोरच्या अडचणींचे स्वरूप उग्र होते, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.
दुसरी बाब अशी की, आपला पराभव झाला, आपले राज्य गेले त्या अर्थी आपल्या परंपरेतच काही मूलभूत चूक आहे, असे मानण्यास हिंदू समाज क्रमाने शिकत होते. आपल्या धर्माची, परंपरेची कठोर चिकित्सा करणारे लोक फुले यांच्या शेजारी होते. लोकहितवादी या मंडळींत सर्वांत महत्त्वाचे. आपला पराभव झाला, कारण आपल्या धर्मात, आपल्या परंपरेत, आपल्या समाजरचनेत काहीतरी उणिवा आहेत, असे मानण्याकडे हिंदू विचारवंतांचा कल दिसतो. म्हणून परंपरेच्या चुका दाखवणारा विचारवंत हिंदू समाजात आचारांचा मार्गदर्शक होत नसला तरी सभ्य ठरतो. मुस्लिम समाजालासुद्धा इंग्रजी राजवट आल्यामुळे आपला पराभव झाला, असे वाटतच होते. पण या पराभवाचे कारण आपल्या धर्मात अगर परंपरेत काही चूक आहे असे त्यांना वाटत नसे. आपला धर्म व परंपरा निर्दोष आहेत; पण या धर्मावर मुसलमानांची श्रद्धा पुरेशी बळकट नाही म्हणून आपला पराभव होतो असे या समाजातील नेत्यांना वाटे. इंग्रजी विद्या व ज्ञान यांविषयी आस्था असणारे सर सय्यद अहमदखानसुद्धा आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार करतात; स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार करतात, पण यापुढे जाऊन इस्लामची चिकित्सा ते करत नाहीत. ग्रंथप्रामाण्य झुगारून देऊन चिकित्सा करणारे पहिले मुस्लिम हमीद दलवाई हेच होत. दलवाईंची चिकित्सा ही नेहमीच मुसलमानांच्या हिताला बाधक आहे, असे त्यांच्या समाजाला वाटत आले. मुस्लिम समाजातील विचारवंतांचे मनच धर्माच्या चिकित्सेला फारसे तयार नसते. आजही ते तयार नाही. मुस्लिम समाजात राजकीय पराभव विचारवंतांना अधिक कर्मठ आणि परंपरावादी होण्याची प्रेरणा देतो, ही दलवाईंच्यासमोर दुसरी अडचण होती.
आमच्या देशातील पुरोगामी राजकारणाची एक शोकांतिका आहे. महात्मा फुले यांच्या काळी फुले यांच्या प्रयत्नाला इंग्रजांनी फार मोठा पाठिंबा दिला नसला तरी त्यांचे शाब्दिक कौतुक केले. त्यांच्या उपक्रमास गौरवपूर्वक सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्यावर इतरांना सरळसरळ आक्रमण करता येऊ नये याची शासनाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काळजी घेतली. दलवाईंच्या बाबतीत असे घडले नाही. पारतंत्र्याच्या काळात, इंग्रजांनी हिंदू-मुस्लिम मतभेदाचा फायदा घेऊ नये म्हणून मुसलमानांच्याविषयी फारसे बोलायचे नाही, होता होईतो त्यांच्या कर्मठपणाला पाठिंबाच द्यायचा, अशी आमच्या नेत्यांची पद्धत राहिली. पुरोगामी राजकीय नेता हिंदू समाजातील असेल तर तो हिंदू समाजातील परंपरावादावर कडाडून हल्ला करी; पण मुस्लिम समाजातील सर्व परंपरावाद मात्र सांभाळून घेई. मुस्लिम समाजातील कोणताही पुरोगामी नेता आपल्या धर्मपरंपरेवर काही टीका करण्यास धजावतच नसे. इस्लाममध्ये लोकशाही आहेच, इस्लाममध्ये समाजवाद आहेच, असे काहीतरी बोलून आपण इस्लामच सांगतो आहोत, असा आव हे नेते आणीत. स्वातंत्र्योत्तर काळात मते फुटू नयेत म्हणून मुसलमान समाजातील सर्व परंपरावाद जतन करण्याची चढाओढ आपल्या राजकीय पक्षांत सुरू झाली. काँग्रेस तर सोडाच, पण ज्या राजकीय पक्षाशी दलवाईंचा निकट संबंध होतो, तो समाजवादी पक्षसुद्धा दलवाईंना निवडून येण्यासाठी तर सोडा, पण पडण्यासाठीसुद्धा तिकीट देण्याची हिंमत दाखवू शकला नाही!
भारतीय कम्युनिस्ट पक्ष हमीद दलवाईंना हिंदू जातीयवादी आणि अमेरिकन साम्राज्यवादी यांचा हस्तक समजत असे. त्यामुळे 'धर्म ही अफूची गोळी' मानणाऱ्या त्या पुरोगामी क्रांतिकारक पक्षाला दलवाईंच्या निषेध करण्यापलीकडे कधी विचार करावासा वाटला नाही! काँग्रेस पक्षाचा पाडाव झाल्यामुळे गेल्या वर्षापासून ही परिस्थिती बदलली आहे, असे समजण्याचे कारण नाही. मुस्लिम समाजातील सर्व परंपरावाद जिव्हाळ्याने जतन करण्याचे काम जनता पक्ष अतिशय चोखपणे व काँग्रेसइतक्याच उत्साहाने पार पाडीत आहे! शासन प्रतिकूल, राजकीय पक्ष प्रतिकूल, यांमुळे तर दलवाईंचे कार्य अधिकच बिकट झाले.
महात्मा फुले यांच्यापेक्षा दलवाईंचे कार्य अधिक बिकट होते, तरीही त्यांना मुस्लिम समाजातील तरुण कार्यकर्त्यांचा एक गट आपल्या अल्पशा आयुष्यात स्वतःभोवती गोळा करता आला. मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि अमरावती अशा वेगवेगळ्या ठिकाणी मिळून तीन-चारशे स्त्री-पुरुष तरुण कार्यकर्ते पाहता पाहता दलवाईंभोवती गोळा झाले. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत इतके कार्यकर्ते दलवाईंना मिळाले, हेच आश्चर्य आहे. हा प्रपंच मुद्दाम नोंदवण्याचे कारण हे की, हमीद दलवाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या मित्रांनीसुद्धा त्यांच्याविषयी लिहिताना दोन गोष्टींचा वारंवार उल्लेख केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे, दलवाईंना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा कधीच मिळाला नाही! आणि दुसरे म्हणजे, आयुष्याच्या अखेरीला दलवाई मुस्लिम समाजापासून तुटून पडलेले होते. दलवाईंच्या कार्यातील अडचणी लक्षात घेता खऱ्या आश्चर्यकारक गोष्टी दोन आहे. पहिली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांना आजारी पडून मरण्याची संधी मिळाली; त्यांना हुतात्मा व्हावे लागले नाही. त्याहून अधिक आश्चर्याची दुसरी गोष्ट म्हणजे तेराशे वर्षांच्या परंपरेविरुद्ध बंड करणाऱ्या या बंडखोराला पाहता पाहता तीनशे-चारशे अनुयायी मिळाले!
दलवाईंना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा कधीच नव्हता; तो असणारही नव्हता, हे अगदी उघड आहे. मुस्लिम समाजातील सर्व राजकीय नेते प्रामुख्याने दलवाईंना विरोध करत होते. दलवाईंनी अतिरेकी भूमिका घेतलेली होती, म्हणून मुस्लिम समाज त्यांच्या मागे गेला नाही, हे म्हणणे खरे नाही. दलवाईंनासुद्धा महान विचारवंत म्हणून किर्ती मिळवण्याची इच्छा नव्हती. त्यांना समाजपरिवर्तनाचे आंदोलन अधिक प्रिय होते. महंमद पैगंबर आणि कुराण यांबाबत चर्चा करून दररोज समाजाचे मन दुखवावे आणि पुरुषार्थ मिरवावा असे त्यांनाही वाटत नव्हते. दलवाई स्वतः नास्तिक आणि अश्रद्ध होते; पण मुस्लिम समाजाने नास्तिक व अश्रद्ध असलेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह नव्हता. समाजाचे आमूलाग्र परिवर्तन होणे आवश्यक आहे, इतके मान्य असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आरंभ म्हणून कोणताही एक छोटासा कार्यक्रम घ्यावा आणि सुधारणेसाठी समाज तयार करावा हे दलवाईंना मान्य होते.
इस्लामवरील श्रद्धा, पैगंबरांवरील श्रद्धा, इस्लामच्या धार्मिक व राजकीय इतिहासावरील श्रद्धा या सर्व चर्चा बाजूला सारून तलाकपीडित महिलांचा प्रश्न हाती घेऊन सामाजिक आंदोलन करायला ते तयार होते. पण दलवाई अतिरेकी जरी नसले तरी सुधारणेचा लहान अगर मोठा कोणताच कार्यक्रम स्वीकारून मुस्लिम मन ढवळण्यास त्या समाजातील कार्यकर्ते तयार नव्हते. कोणत्याही प्रकारचा बदल मान्य न करता आपला परंपरावाद जतन करीतच आपण राहू; तेच आपल्या सोयीचे आहे, असे नेते समजत आणि या सेक्युलॅरिझमच्या सर्वद्रोही नेत्यांना हिंदू पुरोगामी नेते नेटाने पाठिंबा देत. मग दलवाईंना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा मिळू नये ही परिस्थिती बदलणार कशी?
माझा आणि दलवाईंचा अगदी आरंभापासून म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापन करण्याच्या काही वर्षे आधीपासून संबंध होता. दलवाईंनी मुस्लिम तरुणांना व कार्यकर्त्यांना पुनःपुन्हा हे सांगण्याचा प्रयत्न केला की, आपण एखाद्या छोट्या प्रश्नापासून आरंभ करू. एकदा तर ते असे म्हणाले की, बाकी सगळे सोडा, आपल्या सर्व सभा जन-गण-मन या राष्ट्रगीताने संपल्या पाहिजेत, इतक्या मुद्द्यावर तरी तुम्ही आंदोलन करायला तयार आहात काय? पण त्यालाही कुणी फारसा प्रतिसाद दिला नाही. आपल्या विजयाचा एके काळचा इतिहास सदैव स्मरणात जागता ठेवणाऱ्या परंपरावाद्यांना परिवर्तनाच्या कार्यक्रमाचा प्रत्यक्षात उतरू शकेल असा कोणताही प्रामाणिक आरंभच नको होता.
तरीही दलवाईंना आरंभाला दहा-वीस कार्यकर्ते मिळालेच. दरसाल हे कार्यकर्ते वाढतच जात होते. तलाकपीडित महिलांच्या परिषदा हळूहळू सर्वत्र भरू लागल्या. आरंभी या परिषदांना पंधरा-वीस मुस्लिम महिला जमणे कठीण होते; पण गेल्या डिसेंबरात अमरावती येथे भरलेल्या तलाकपीडित महिलांच्या परिषदेला संचालकांच्या अपेक्षेच्या बाहेर इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की पुरुष प्रेक्षकांना हॉल रिकामा करून द्यावा लागला! हे चित्र क्रमाने प्रतिसाद वाढत आहे, याचे आहे.. दलवाईंचा विचार क्रमाने समाजात रुजतो, पाझरतो आहे, याचे चित्र आहे. दलवाई समाजातून तुटून बाजूला गेले याचे हे चित्र नाही.
आपण स्वतःच्या मनाशी विचार करतो त्या वेळी सतत एक प्रश्न विचारला पाहिजे की, गुलाम राष्ट्रातील स्वातंत्र्यलढे पुनःपुन्हा पराभूत होतात म्हणून गुलामगिरी अमर राहील असे आपण मानणार आहोत काय? दहा उठाव फसतील, पण शेवटी संपणार आहे ती गुलामगिरी. स्वातंत्र्याची आकांक्षा संपत नसते. आज बोहरी समाजात धर्मगुरूंच्या विरुद्ध आंदोलन चालू आहे. अजून धर्मगुरूंचीच अधिसत्ता समाजावर चालते. पण उद्याचा विजय दाउदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंचा असणार नाही; तो स्वातंत्र्य मागणाऱ्यांचा राहील. अतिशय अजिंक्य आणि बलवान असणाऱ्या तटबंद्या कितीही बलवान असोत, त्या शेवटी कोसळत चाललेल्या मावळत्या शक्ती आहेत. या मावळत्या शक्तींचा विजय फार काळ टिकणारा नसतो. मुस्लिम समाजही बदलतच जाणार आहे. तोंडाने 'नाही नाही' म्हणत गोषा सोडून बाहेर येणाऱ्या स्त्रियांची संख्या सारखी वाढतच आहे, तिथून वाढतच जाणार आहे. मुस्लिम समाजातही यापुढे नवे विचार वाढतच जाणार आहेत. मुस्लिम समाजातही यापुढे नवे विचार वाढतच जाणार आहेत.
थोडा उशीर लागेल हे मान्य केले तरी अंधश्रद्धा, जळमटलेली मने कायमची गुलाम राहणार नाही. सगळेच हमीद दलवाईंप्रमाणे बंडखोर नसतील; पण कालमानानुसार 'मुस्लिम पर्सनल लॉ'मध्ये, मुस्लिम समाजात परिवर्तनाची भूक वाढवून दमादमाने बदल घडवून आणावा लागेल, असे म्हणणारे लोक त्याही समाजात तयार होत आहेत. परंपरावाद्यांचे बळ हे शेवटी मावळत्या शक्तींचे बळ असते. दलवाई हा नवा उगवता विचार आहे. दलवाईंच्यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी दलवाईंचा विचार वेगाने पसरत कसा जाईल, याची काळजी घ्यावी. दलवाईंचे चाहते व अनुयायी तो विचार करतीलही, करीतही आहेत. पण उरलेल्यांनी हे लक्षात ठेवावे की पराजय दलवाईंचा होणार नसून परंपरावाद्यांचा होणार आहे. वर्षांची संख्या थोडी वाढेल; पण भवितव्याच्या या दिशेत बदल होण्याची शक्यता अजिबात नाही. ज्या शक्ती कदाचित दहा-वीस वर्षांत विजयी होणार नाहीत, ज्यांना विजयी व्हायला कदाचित शंभर वर्षे लागतील, त्या शक्तीचा पराभव झालेला आहे, असे समजत बसण्यात आपण आत्मवंचनेशिवाय दुसरे काही मिळवत नसतो.
***
![]() |
| हमीद दलवाई |
महात्मा फुले यांचा काळ कितीतरी जुना. जवळजवळ एका शतकाचे अंतर दोघांच्यामध्ये आहे. फुले यांच्या काळी हिंदू समाज आजच्या मानाने कितीतरी रूढीप्रिय, अंधश्रद्ध आणि परंपरावादी होता. पण हिंदू समाजाची रचना व जडण-घडण पुष्कळशी विस्कळित आणि विविधतेला वाव देणारी अशी आहे. वेगवेगळ्या जातीजमाती, चालीरीती, परस्परविरोधी (भिन्नभिन्न) विचार हिंदू समाजात नेहमीच वावरत आले. सुसंघटित व एक ग्रंथाचे प्रामाण्य मानणारा असा हिंदू समाज नव्हता; आजही नाही. विचार मांडण्याच्या बाबतीत खूप मोठे स्वातंत्र्य हिंदू समाजात राहत आले आणि सर्व विचारांना माना डोलवीत त्याच वेळी चिवटपणे आपला परंपरावाद जतन करण्याची हिंदू मनाची शक्तीही फार अफाट आहे. आजही महात्मा फुले यांचा पुरस्कार व जयजयकार करीत परंपरावाद जतन करण्याची मनोवृत्ती हिंदूंच्यामध्ये दिसते. महात्मा फुल्यांचे पुतळे उभे करणे, आपले महान नेते म्हणून त्यांना लक्ष अभिवादन करणे आणि आपले बुरसटलेले मन तसेच जतन करून ठेवणे, हे हिंदूंना अजिबात कठीण वाटत नाही. मुस्लिम समाज यापेक्षा निराळा आहे.
मुस्लिम समाजातही शिया-सुन्नींच्यासारखे मतभेद आहेत. त्याहून थोडे दूर असणारे अहमदियाही आहेत. पण हा फरक फारसा नाही. एक प्रेषित, एक धर्मग्रंथ यांमुळे आणि जवळपास एक असणाऱ्या कायद्यामुळे मुस्लिम धर्माचे स्वरूप हिंदूंच्या मानाने कितीतरी सुसंघटित आहे, आणि विचारस्वातंत्र्याची त्यांची परंपराही मर्यादित आहे. प्रेषित, कुराण आणि परंपरा यांचा मला परिपूर्ण पाठिंबा आहे असे मानणाऱ्या दोन माणसांत जितका मतभेद असू शकतो, तितकेच विचारस्वातंत्र्य मुस्लिम समाजात असे. एक विचार जाहीर रीतीने मान्य करायचा, तो विचार मांडणारा आपला नेता समजायचा व तरीही परंपरावादी मन जतन करायचे, असा दुटप्पीपणा मुस्लिम समाज फारसा पेलू शकत नाही. आचार-विचारस्वातंत्र्य यांची परंपरा नसणाऱ्या या समाजात दलवाई उदयाला आले होते. त्यामुळे फुले यांच्यापेक्षा त्यांच्या समोरच्या अडचणींचे स्वरूप उग्र होते, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.
दुसरी बाब अशी की, आपला पराभव झाला, आपले राज्य गेले त्या अर्थी आपल्या परंपरेतच काही मूलभूत चूक आहे, असे मानण्यास हिंदू समाज क्रमाने शिकत होते. आपल्या धर्माची, परंपरेची कठोर चिकित्सा करणारे लोक फुले यांच्या शेजारी होते. लोकहितवादी या मंडळींत सर्वांत महत्त्वाचे. आपला पराभव झाला, कारण आपल्या धर्मात, आपल्या परंपरेत, आपल्या समाजरचनेत काहीतरी उणिवा आहेत, असे मानण्याकडे हिंदू विचारवंतांचा कल दिसतो. म्हणून परंपरेच्या चुका दाखवणारा विचारवंत हिंदू समाजात आचारांचा मार्गदर्शक होत नसला तरी सभ्य ठरतो. मुस्लिम समाजालासुद्धा इंग्रजी राजवट आल्यामुळे आपला पराभव झाला, असे वाटतच होते. पण या पराभवाचे कारण आपल्या धर्मात अगर परंपरेत काही चूक आहे असे त्यांना वाटत नसे. आपला धर्म व परंपरा निर्दोष आहेत; पण या धर्मावर मुसलमानांची श्रद्धा पुरेशी बळकट नाही म्हणून आपला पराभव होतो असे या समाजातील नेत्यांना वाटे. इंग्रजी विद्या व ज्ञान यांविषयी आस्था असणारे सर सय्यद अहमदखानसुद्धा आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार करतात; स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार करतात, पण यापुढे जाऊन इस्लामची चिकित्सा ते करत नाहीत. ग्रंथप्रामाण्य झुगारून देऊन चिकित्सा करणारे पहिले मुस्लिम हमीद दलवाई हेच होत. दलवाईंची चिकित्सा ही नेहमीच मुसलमानांच्या हिताला बाधक आहे, असे त्यांच्या समाजाला वाटत आले. मुस्लिम समाजातील विचारवंतांचे मनच धर्माच्या चिकित्सेला फारसे तयार नसते. आजही ते तयार नाही. मुस्लिम समाजात राजकीय पराभव विचारवंतांना अधिक कर्मठ आणि परंपरावादी होण्याची प्रेरणा देतो, ही दलवाईंच्यासमोर दुसरी अडचण होती.
आमच्या देशातील पुरोगामी राजकारणाची एक शोकांतिका आहे. महात्मा फुले यांच्या काळी फुले यांच्या प्रयत्नाला इंग्रजांनी फार मोठा पाठिंबा दिला नसला तरी त्यांचे शाब्दिक कौतुक केले. त्यांच्या उपक्रमास गौरवपूर्वक सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्यावर इतरांना सरळसरळ आक्रमण करता येऊ नये याची शासनाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काळजी घेतली. दलवाईंच्या बाबतीत असे घडले नाही. पारतंत्र्याच्या काळात, इंग्रजांनी हिंदू-मुस्लिम मतभेदाचा फायदा घेऊ नये म्हणून मुसलमानांच्याविषयी फारसे बोलायचे नाही, होता होईतो त्यांच्या कर्मठपणाला पाठिंबाच द्यायचा, अशी आमच्या नेत्यांची पद्धत राहिली. पुरोगामी राजकीय नेता हिंदू समाजातील असेल तर तो हिंदू समाजातील परंपरावादावर कडाडून हल्ला करी; पण मुस्लिम समाजातील सर्व परंपरावाद मात्र सांभाळून घेई. मुस्लिम समाजातील कोणताही पुरोगामी नेता आपल्या धर्मपरंपरेवर काही टीका करण्यास धजावतच नसे. इस्लाममध्ये लोकशाही आहेच, इस्लाममध्ये समाजवाद आहेच, असे काहीतरी बोलून आपण इस्लामच सांगतो आहोत, असा आव हे नेते आणीत. स्वातंत्र्योत्तर काळात मते फुटू नयेत म्हणून मुसलमान समाजातील सर्व परंपरावाद जतन करण्याची चढाओढ आपल्या राजकीय पक्षांत सुरू झाली. काँग्रेस तर सोडाच, पण ज्या राजकीय पक्षाशी दलवाईंचा निकट संबंध होतो, तो समाजवादी पक्षसुद्धा दलवाईंना निवडून येण्यासाठी तर सोडा, पण पडण्यासाठीसुद्धा तिकीट देण्याची हिंमत दाखवू शकला नाही!
भारतीय कम्युनिस्ट पक्ष हमीद दलवाईंना हिंदू जातीयवादी आणि अमेरिकन साम्राज्यवादी यांचा हस्तक समजत असे. त्यामुळे 'धर्म ही अफूची गोळी' मानणाऱ्या त्या पुरोगामी क्रांतिकारक पक्षाला दलवाईंच्या निषेध करण्यापलीकडे कधी विचार करावासा वाटला नाही! काँग्रेस पक्षाचा पाडाव झाल्यामुळे गेल्या वर्षापासून ही परिस्थिती बदलली आहे, असे समजण्याचे कारण नाही. मुस्लिम समाजातील सर्व परंपरावाद जिव्हाळ्याने जतन करण्याचे काम जनता पक्ष अतिशय चोखपणे व काँग्रेसइतक्याच उत्साहाने पार पाडीत आहे! शासन प्रतिकूल, राजकीय पक्ष प्रतिकूल, यांमुळे तर दलवाईंचे कार्य अधिकच बिकट झाले.
महात्मा फुले यांच्यापेक्षा दलवाईंचे कार्य अधिक बिकट होते, तरीही त्यांना मुस्लिम समाजातील तरुण कार्यकर्त्यांचा एक गट आपल्या अल्पशा आयुष्यात स्वतःभोवती गोळा करता आला. मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि अमरावती अशा वेगवेगळ्या ठिकाणी मिळून तीन-चारशे स्त्री-पुरुष तरुण कार्यकर्ते पाहता पाहता दलवाईंभोवती गोळा झाले. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत इतके कार्यकर्ते दलवाईंना मिळाले, हेच आश्चर्य आहे. हा प्रपंच मुद्दाम नोंदवण्याचे कारण हे की, हमीद दलवाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या मित्रांनीसुद्धा त्यांच्याविषयी लिहिताना दोन गोष्टींचा वारंवार उल्लेख केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे, दलवाईंना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा कधीच मिळाला नाही! आणि दुसरे म्हणजे, आयुष्याच्या अखेरीला दलवाई मुस्लिम समाजापासून तुटून पडलेले होते. दलवाईंच्या कार्यातील अडचणी लक्षात घेता खऱ्या आश्चर्यकारक गोष्टी दोन आहे. पहिली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांना आजारी पडून मरण्याची संधी मिळाली; त्यांना हुतात्मा व्हावे लागले नाही. त्याहून अधिक आश्चर्याची दुसरी गोष्ट म्हणजे तेराशे वर्षांच्या परंपरेविरुद्ध बंड करणाऱ्या या बंडखोराला पाहता पाहता तीनशे-चारशे अनुयायी मिळाले!
दलवाईंना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा कधीच नव्हता; तो असणारही नव्हता, हे अगदी उघड आहे. मुस्लिम समाजातील सर्व राजकीय नेते प्रामुख्याने दलवाईंना विरोध करत होते. दलवाईंनी अतिरेकी भूमिका घेतलेली होती, म्हणून मुस्लिम समाज त्यांच्या मागे गेला नाही, हे म्हणणे खरे नाही. दलवाईंनासुद्धा महान विचारवंत म्हणून किर्ती मिळवण्याची इच्छा नव्हती. त्यांना समाजपरिवर्तनाचे आंदोलन अधिक प्रिय होते. महंमद पैगंबर आणि कुराण यांबाबत चर्चा करून दररोज समाजाचे मन दुखवावे आणि पुरुषार्थ मिरवावा असे त्यांनाही वाटत नव्हते. दलवाई स्वतः नास्तिक आणि अश्रद्ध होते; पण मुस्लिम समाजाने नास्तिक व अश्रद्ध असलेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह नव्हता. समाजाचे आमूलाग्र परिवर्तन होणे आवश्यक आहे, इतके मान्य असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आरंभ म्हणून कोणताही एक छोटासा कार्यक्रम घ्यावा आणि सुधारणेसाठी समाज तयार करावा हे दलवाईंना मान्य होते.
इस्लामवरील श्रद्धा, पैगंबरांवरील श्रद्धा, इस्लामच्या धार्मिक व राजकीय इतिहासावरील श्रद्धा या सर्व चर्चा बाजूला सारून तलाकपीडित महिलांचा प्रश्न हाती घेऊन सामाजिक आंदोलन करायला ते तयार होते. पण दलवाई अतिरेकी जरी नसले तरी सुधारणेचा लहान अगर मोठा कोणताच कार्यक्रम स्वीकारून मुस्लिम मन ढवळण्यास त्या समाजातील कार्यकर्ते तयार नव्हते. कोणत्याही प्रकारचा बदल मान्य न करता आपला परंपरावाद जतन करीतच आपण राहू; तेच आपल्या सोयीचे आहे, असे नेते समजत आणि या सेक्युलॅरिझमच्या सर्वद्रोही नेत्यांना हिंदू पुरोगामी नेते नेटाने पाठिंबा देत. मग दलवाईंना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा मिळू नये ही परिस्थिती बदलणार कशी?
माझा आणि दलवाईंचा अगदी आरंभापासून म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापन करण्याच्या काही वर्षे आधीपासून संबंध होता. दलवाईंनी मुस्लिम तरुणांना व कार्यकर्त्यांना पुनःपुन्हा हे सांगण्याचा प्रयत्न केला की, आपण एखाद्या छोट्या प्रश्नापासून आरंभ करू. एकदा तर ते असे म्हणाले की, बाकी सगळे सोडा, आपल्या सर्व सभा जन-गण-मन या राष्ट्रगीताने संपल्या पाहिजेत, इतक्या मुद्द्यावर तरी तुम्ही आंदोलन करायला तयार आहात काय? पण त्यालाही कुणी फारसा प्रतिसाद दिला नाही. आपल्या विजयाचा एके काळचा इतिहास सदैव स्मरणात जागता ठेवणाऱ्या परंपरावाद्यांना परिवर्तनाच्या कार्यक्रमाचा प्रत्यक्षात उतरू शकेल असा कोणताही प्रामाणिक आरंभच नको होता.
तरीही दलवाईंना आरंभाला दहा-वीस कार्यकर्ते मिळालेच. दरसाल हे कार्यकर्ते वाढतच जात होते. तलाकपीडित महिलांच्या परिषदा हळूहळू सर्वत्र भरू लागल्या. आरंभी या परिषदांना पंधरा-वीस मुस्लिम महिला जमणे कठीण होते; पण गेल्या डिसेंबरात अमरावती येथे भरलेल्या तलाकपीडित महिलांच्या परिषदेला संचालकांच्या अपेक्षेच्या बाहेर इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की पुरुष प्रेक्षकांना हॉल रिकामा करून द्यावा लागला! हे चित्र क्रमाने प्रतिसाद वाढत आहे, याचे आहे.. दलवाईंचा विचार क्रमाने समाजात रुजतो, पाझरतो आहे, याचे चित्र आहे. दलवाई समाजातून तुटून बाजूला गेले याचे हे चित्र नाही.
आपण स्वतःच्या मनाशी विचार करतो त्या वेळी सतत एक प्रश्न विचारला पाहिजे की, गुलाम राष्ट्रातील स्वातंत्र्यलढे पुनःपुन्हा पराभूत होतात म्हणून गुलामगिरी अमर राहील असे आपण मानणार आहोत काय? दहा उठाव फसतील, पण शेवटी संपणार आहे ती गुलामगिरी. स्वातंत्र्याची आकांक्षा संपत नसते. आज बोहरी समाजात धर्मगुरूंच्या विरुद्ध आंदोलन चालू आहे. अजून धर्मगुरूंचीच अधिसत्ता समाजावर चालते. पण उद्याचा विजय दाउदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंचा असणार नाही; तो स्वातंत्र्य मागणाऱ्यांचा राहील. अतिशय अजिंक्य आणि बलवान असणाऱ्या तटबंद्या कितीही बलवान असोत, त्या शेवटी कोसळत चाललेल्या मावळत्या शक्ती आहेत. या मावळत्या शक्तींचा विजय फार काळ टिकणारा नसतो. मुस्लिम समाजही बदलतच जाणार आहे. तोंडाने 'नाही नाही' म्हणत गोषा सोडून बाहेर येणाऱ्या स्त्रियांची संख्या सारखी वाढतच आहे, तिथून वाढतच जाणार आहे. मुस्लिम समाजातही यापुढे नवे विचार वाढतच जाणार आहेत. मुस्लिम समाजातही यापुढे नवे विचार वाढतच जाणार आहेत.
थोडा उशीर लागेल हे मान्य केले तरी अंधश्रद्धा, जळमटलेली मने कायमची गुलाम राहणार नाही. सगळेच हमीद दलवाईंप्रमाणे बंडखोर नसतील; पण कालमानानुसार 'मुस्लिम पर्सनल लॉ'मध्ये, मुस्लिम समाजात परिवर्तनाची भूक वाढवून दमादमाने बदल घडवून आणावा लागेल, असे म्हणणारे लोक त्याही समाजात तयार होत आहेत. परंपरावाद्यांचे बळ हे शेवटी मावळत्या शक्तींचे बळ असते. दलवाई हा नवा उगवता विचार आहे. दलवाईंच्यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी दलवाईंचा विचार वेगाने पसरत कसा जाईल, याची काळजी घ्यावी. दलवाईंचे चाहते व अनुयायी तो विचार करतीलही, करीतही आहेत. पण उरलेल्यांनी हे लक्षात ठेवावे की पराजय दलवाईंचा होणार नसून परंपरावाद्यांचा होणार आहे. वर्षांची संख्या थोडी वाढेल; पण भवितव्याच्या या दिशेत बदल होण्याची शक्यता अजिबात नाही. ज्या शक्ती कदाचित दहा-वीस वर्षांत विजयी होणार नाहीत, ज्यांना विजयी व्हायला कदाचित शंभर वर्षे लागतील, त्या शक्तीचा पराभव झालेला आहे, असे समजत बसण्यात आपण आत्मवंचनेशिवाय दुसरे काही मिळवत नसतो.
Sunday, March 4, 2012
हमीद
| प्रकाशक- नीलकंठ प्रकाशन. मुखपृष्ठ- दिलीप भंडारे |
‘हमीद दलवाई यांच्या एका पत्रकार मित्राने त्यांच्या निधनानंतर उत्सफूर्तपणे लिहिलेला हा मजकूर आहे... आपल्या फार जवळचे माणूस जाते त्यानंतर त्याच्या आठवणी जागवीत आपण त्याच्या जाण्याने पडलेला प्रचंड खड्डा भरून काढण्याचा प्रयत्न करतो तसे या मजकुराचे स्वरूप आहे. अशा आठवणीत चरित्राचा मुद्देसूदपणा, नेमकेपणा अपेक्षिणे गैर. हे एक प्रकारचे ‘जागरण’ आहे. मित्राच्या जाण्याने बेचैन झालेले मन भूतकाळ उगाळीत त्या मित्राचा पुनः कधीही न मिळणारा सहवास, त्यातले कडू गोड दिवस आठवते आहे’, असं विजय तेंडुलकरांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलंय.
***
एक
हमीद अस्वस्थ आणि आक्रमक व्यक्तिमत्त्वाचा माणूस होता. जी गोष्ट करायची ती निधडेपणाने, मनस्वीपणे, मनमुरादपणे, असा त्याचा खाक्या होता. मुस्लीम समाजात आधुनिक मूल्ये रुजवणे हे तर त्याचे मिशनच होते. त्याचा त्याला अहोरात्र ध्यासच लागला होता. गप्पांमध्येही इतर विषय त्याला सहन होत नसत. त्याच्या गप्पा ऐकणाराला वाटावे की, भारतात या प्रश्नाखेरीज दुसरा प्रश्नच अस्तित्वात नसावा.
मैत्रीही मनमुराद करायचा. माणसांचे त्याला व्यसनच होते. जीवनातली अनेक सुखे तो आसक्तीने उपभोगीत असे. दोस्त जमवून गप्पा मारणे, खाणे-पीणे, सिनेमे बघणे, गाणी ऐकणे, पुस्तके वाचणे... जे जे तो करायचा, त्यात तो स्वतःस पूर्णपणे झोकून द्यायचा.
पुण्याला वरचेवर यायचा. तो आला की ते दोन-चार दिवस आमचे राहायचेच नाहीत. ते त्याचे असायचे. आम्हा चारसहा मित्रांचे एरवीचे कार्यक्रम तो पार मोडून-तोडून टाकायचा. कधी मरगळ आली आणि कळले की, हमीद पुण्याला आला आहे की मरगळ अगदी विरून जायची. आम्ही त्याच्यापासून उदंड उत्साह घेतला.
हमीद रंगून बोलायला लागला की, एका हाताची बोटे छातीजवळ घेऊन हात पुढे-मागे झटकायचा. भुवया सतत वरखाली करायचा. जोकमधले स्फोटक वाक्य डोळे मोठे करून, जाड्या खर्ज आवाजात बोलायचा. बसला की मांडी उडवत बसायचा. परवाच्या दुखण्यात तो एवढा अशक्त झाला होता- इतर काही करता येत नव्हते, तर तळपायाची बोटे सारखी हलवत राहायचा. शरीराच्या कुठल्यातरी भागाची हालचाल नाही, असा क्षणही पाहण्यात नसायचा.
त्याच्या तोंडात सतत सिगारेट असायची. दिवसाकाठी तीन-चार पाकिटे ओढायचा. सिगारेटचा ब्रँडही बदलता असे. प्रथम पिवळा हत्ती, चारमिनार, विल्स. अलीकडे तो सिमला ओढीत असे. मधे केंट या परदेशी सिगारेटची त्याला आवड निर्माण झाली होती. बॅगेत अनेक औषधी गोळ्यांच्या स्ट्रिप्सही पडलेल्या असत. ग्लॉकोमामुळे डोके दुखायचे, मग क्रोसिनच्या गोळ्या घ्यायच्या.
हमीद देखणा होता. घारे डोळे, गोरा रंग, तरतरीत नाक, बोलणे नाकात-कोकणी व हेलात असायचे. आदल्या रात्री निरोप आल्यावर ‘पूनम’वर सकाळी भेटायला जायचो, तेव्हा हमीद रिसेप्शन-रूमपाशी फेऱ्या मारत, हातात पेपर उघडून वाचत, मधूनच घडी करून काखोटीला मारीत असायचा. ते त्याचे दिवसातले पहिले ताजे, टवटवीत, प्रसन्न दर्शन असायचे.
अंगात सुरेख टेक्श्चरचा, सौम्य आल्हाददायक रंगाचा खादी सिल्कचा बुशशर्ट असायचा. खाली खादीची पांढरी पँट असायची. लहानपणी सेवादलात असल्यामुळे आणि मोठेपणी टेक्श्चर व फील आवडतो म्हणून खादी घालीत असे. प्रवासात दिल्ली, आसाम, कलकत्ता कोठेही गेला तरी मिळतील तिथून छान छान कापडाचे पीसेस आणीत असे. त्याच्या रंगाच्या निवडीविषयीचे कौतुक बोलून दाखवताच तो म्हणे, ‘सिलेक्शन! अवचटजी इसे कहते है सिलेक्शन. इस बारेमें हमको माननाही पडेगा.’ ‘माननाही पडेगा’ ही त्याची आवडती टर्म. इतरांच्या बाबतीतही ती तो मुक्तपणे वापरे.
आम्ही बाहेर पडलो की, प्रथम कार्यक्रम ठरवायचो. त्याच्या आवडीनिवडी मला माहीत झाल्या होत्या. त्याला पहिल्यापासून वरचेवर लघवीला जावे लागे. कुणाकडे जायच्या आधी लघवीला जाऊऩ आले की, त्याला स्वस्थ वाटे. (हे कदाचित काही व्याधीमुळे असेल या शंकेने मी एकदा डॉक्टरकरवी लघवी व इतर तपासणी करून घेतली होती. पण रिपोर्टात सर्व काही ठीक निघाले होते.) म्हणून कार्यक्रम ठरवताना मी ‘आपण आधी अमक्याकडे जाऊ, तिथून तमक्या (हमीदच्या आवडत्या) हॉटेलात नास्ता करू, तिथे मागे मुतारीही आहेच, तिथून तिसरीकडे जाऊ’ असे ठरवीत असे. ते ऐकून हमीद म्हणे, ‘बस अवचटजी, इसलिये हम तुमको मानते है.’
...
हमीद सदैव प्रवासाला जायचा. परत आल्यावर त्याच्या गप्पा आणखीनच फ्रेश व्हायच्या. तिथं भेटलेली नाना तऱ्हेची माणसं, त्यांच्या लकबी यांचे पूनमधल्या खोलीत हमीदचे परफॉर्मिंग आर्टचे प्रयोग सुरू व्हायचे. आम्हाला हसवण्याच्या उद्देशाने सांगितलेल्या गप्पा असल्या तरी त्यातून नकळत त्या त्या गावचे चित्रच उभे राहात असे. हमीदच्या कलावंताच्या नजरेने ती ती वैशिष्ट्ये बरोबर टिपलेली असायची.
परवा दोन आजारपणांच्या मध्ये कोल्हापूरला जाऊन आल्यावर सांगत होता, ‘सालं ते गावच और. फेटेवाले, लुंगीवाले, मिशीवाले. रिक्षाने चाललो होतो. रस्ता होता, कडेला फुटपाथ होता. रस्त्याच्या मधूनच पाच-सहा आडदांड माणसं चाललेली. रिक्षाला रस्ताच नाही. रिक्षावाला थांबून बाहेर मान काढून म्हणाला ‘अबे राव, जरा हटा की. त्याबरोबर तिघे-चौघे एकदम वळले. त्यातला एक फुटपाथकडे हात करून रिक्षावाल्याला म्हणाला, ‘तूच घाल की तिकडनं.’ त्यावर रिक्षावाला काही बोलू लागताच दुसरा म्हणाला, ‘उचला रे याला रिक्षासगट.’ रिक्षावाल्याने निमूटपणे अबाऊट टर्न घेऊन दुसऱ्या रस्त्याने रिक्षा घेऊन गेला. आता काय यांच्यापुढे करणार बोला.’
मी म्हटले, ‘कोल्हापूरला मटन जहाल असतं. तू चापलं असशीलच.’ हमीद म्हणाला, ‘तिथं सगळीकडे मटन इकडच्यापेक्षा खूप तिखट. पण तिथेही एका खानावळीत आणखीच तिखट. तिथं गेलो होतो. जेवायला बसलो. शेजारच्या टेबलावर मारामारीचा प्रसंग. दोन-तीन पैलवान मंडळी नळी मागत होती. (नळी म्हणजे बोन पीस त्यातून मॅरो शोषून घेतात.) वेटर म्हणत होता, ‘अहो साहेब, पहिल्यांदा मटनाच्या बशीत येते तेवढीच नळी मिळते.’ मालक आला. त्याने भिंतीवर लावलेली पाटी दाखवली, ‘येथे नळी एकदाच मिळेल.’ त्यांना कसेबसे शांत केले. दुसऱ्या अशाच ‘तिखट’ हॉटेलात गेलो, तिथे गिऱ्हाइके ‘कट’ मागत होती. कट म्हणजे मटनाच्या रश्श्यावरच्या तेलाचा तवंग. ह्यात तिखट आणखीच उतरलेले असते. आता तो रश्श्याबरोबर येतो तेवढाच कट प्रत्येकाला मिळणार. जादा कसा येणार? त्याही हॉटेलात अशी पाटी लावली होती, येथे जादा कट मिळणार नाही. अशी ही माणसं. काय करणार यांच्यापुढे? अवचटजी, आहे का इलाज काही तुमच्याकडे यांच्यावर?’
हमीद मुसलमान प्रश्नाच्या अभ्यासासाठी भारतभर फिरला होता. मुसलमानांची सांस्कृतिक बैठक ज्या प्रांतात आहे, त्या उत्तर प्रदेशात तो फिरला होता. तिथले खानदान, अदब पाहून आला. देवबन, अलिगड ही मुसलमानांमधली विचारप्रवाहन निर्माण करणारी केंद्रे पाहून आला. लखनऊची नबाबी संस्कृती पाहून तो सांगत होता, ‘तिथे बोलण इतक सॉफ्ट की विचारायची सोय नाही. तिथले लोक मागून खंजीर खुपसून. पुढून आदाबर्ज करून ‘जनाब, आपको तकलीफ तो नहीं हुई?’ असे विचारतील.’
लखनऊला मनोहर तांबे नावाच्याय तिथे स्थायिक झालेल्या महाराष्ट्रीय माणसाकडे हमीद उतरला होता. तांब्यांनी त्याचे छान आदरातिथ्य केले. हमीदने त्याचे ‘मराठी माणसाला न शोभेल असे आदरातिथ्य त्यांनी केले’, असे वर्णन करीत असे.
...
नव्या ठिकाणी गेल्यावर तो भाग पाहण्याची हमीदची दृष्टी एखाद्या लहान मुलाच्या कुतूहलाची असायची. त्याने अगदी लहानपणीची आठवण एकदा मला सांगितली होती. त्याच्या आईली टी.बी. झाला म्हणून तिला मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये ठेवले. उपचारही होतील आणि देशावरच्या मोकळ्या हवेत बरेही वाटेल, असा त्यात विचार होता. छोट्या हमीदलाही तिने बरोबर नेले होते.
या भेटीविषयी हमीद मला एकदा म्हणाला होता, ‘मी प्रथमच गाव सोडून इतक्या लांब आलो होतो. माळरानावरचा सुसाट वारा मला आठवतोय. लांबच लांब पसरलेली सपाट जमीन पाहून मी चकितच होऊन गेलो. आमच्या तिकडे चिपळूणला टेकड्या-टेकड्यांचा भाग. तिकडे टेकडीवर गावं. टेकडी संपली की गाव संपले असे सहजच समजता येतं. इकडं सगळं आपलं सपाट. इथं गाव संपलं, असं लोकांना कशावरून समजत असेल, असा मला तेव्हा प्रश्न पडला होता.’
हीच बालसुलभ वृत्ती मोठा झाल्यावरही कायम राहिली होती. मध्यंतरी तो पाकिस्तानला जाऊन आला. बायकोकडचे काही नातेवाईक तिकडे आहेत. परदेशी जायचा त्याचा तो पहिलाच प्रसंग. तो सांगत होता, ‘परदेश म्हणजे काही तरी वेगळं असणार असं वाटायचं. नकाशात दोन देशांना वेगळे रंग दिलेले असतात, तसं काही दिसेल अशी कल्पना होती. बॉर्डर क्रॉस करायच्या क्षणाची उत्सुकता होती. प्रत्यक्षात वेगळं काही घडलंच नाही. ट्रेनने गेलो होतो. आधीचं स्टेशन भारताचं नंतरचं स्टेशन पाकिस्तानचं. मध्ये रेषा वगैरे काही आखलेली नव्हती. सगळा प्रदेश सारखा. सरहद्द म्हटल्यावर दोन्हींकडे बंदुकी एकमेकांवर रोखून लोक उभे असणार असे वाटायचे. तसेही नव्हते. लोक शेतात शांतपणे काम करीत होते.’
जरा थांबून तो पुढे सांगू लागला, ‘पुढे स्टेशनावर पाकिस्तानी पोलीस चेकिंगला आले. रस्त्यांवर स्त्रियांच्या बुरख्यांच्या जाहिराती दिसून लागल्या. आपल्याकडे कधी बुरख्यांच्या जाहिराती पाहिल्यात? मग हळूहळू ‘पाकिस्तान’ दिसू लागले.’
...
हमीद कधी खास मूडमध्ये असायचा. मग त्याला त्याचे लहानपण आठवायचे. चिपळूणजवळचे मिरजोळी हे त्याचे गाव. त्याच्या ‘इंधन’ कादंबरीत किंवा ‘लाट’ या कथासंग्रहातल्या बऱ्याच गोष्टींमध्ये ते गाव पार्श्वभूमीला आहे. हमीद गावाकडच्या गोष्टी सांगायचा. तिथली गमतीशीर पात्रे सांगताना एका उत्साही पोराची त्याने एकदा हकीगत सांगितली होती. गावात एका विवाहित बाईबरोबर एका माणसाची भानगड होती. ती कळल्याने गावातले काही लोक अतिशय संतप्त झाले. तो माणूस बाईकडे रात्री गेल्याचे कळल्यावर सगळे त्या बाईच्या घरासमोर जमले व हा खाली आला की, त्याला ठोकायचे असे ठरवले. घरामागे ओढा होता. घराच्या मागच्या दाराने ओढ्यातून त्या माणसाने पळून जाऊ नये म्हणून एका उत्साही वीराला पहाऱ्याला तिथे उभे केले. हा वीर सोटा घेऊन उभा राहिला. तो बाईकडे गेलेला माणूस पुढच्या दाराने खाली आल्यावर लोकांनी त्याला धरले. पिटायचे ते पिटले. पुढे तडजोड होऊन सगळे घरी गेले. उत्साही वीर मात्र सोटा घेऊन ओढ्यातच उभा. सकाळी त्याच्या घरचे लोक त्याच्या मित्रांना विचारू लागले की, हा (वीर) कुठंय? तेव्हा सगळे शोधायला लागले, तर हा सोटा घेऊन अटेन्शनमध्ये ओढ्यात उभा असलेला दिसला.
...
हमीदला माणसांचे व्यसन होते. पुण्या-मुंबईत आणि भारतात इतरत्र खूप माणसे त्याच्या जिवाभावाची हती. हमीदची पत्त्यांची डायरी चाळली तरी त्याच्या अफाट मनुष्यसंग्रहाची कल्पना यायची. तो एकटा विचार करीत पडलाय असे दृश्य आजारपणाच्या आधी कधीच दिसायचे नाही. पुण्यात आल्यावर सकाळपासून आमची माझ्या स्कूटरवर भ्रमंती सुरू व्हायची. रावसाहेब पटवर्धन हयात असताना आम्ही त्यांच्याकडे जायचो. रावसाहेबांचे हमीदवर मुलासारखे प्रेम. आपल्या खर्ज आवाहा ‘काय दलवाई, कधी आलात? कार्य कसे चालले आहे’ वगैरे चौकशी करायचे.
प्रभाकर पाध्यांकडेही आम्ही दर भेटीच्या वेळी जायचो. सरिता व मंगेश पदकींच्याकडे, स.शि. व सुमित्रा भाव्यांकडे चक्कर असायची. ही त्यांची लेखक मित्रमंडळी. सरिता पदकींकडे पूर्वी तो उतरत असे. आम्ही गेलो तेव्हा सरिताबाई म्हणाल्या, ‘दलवाई, तुमच्याविषयी आमची तक्रार आहे. तुम्ही तुमच्या कार्यापायी ललित लेखन अजिबात बंद केले, हे बरोबर नाही.’ मी म्हटले, ‘अहो, लेखक आपल्याला मिळतील. पण मुसलमानात असा माणूस प्रथमच निपजला आहे. तेच कार्य जास्त महत्त्वाचे आहे.’ हमीद अशावेळी काहीच बोलत नसे.
मुंबईतल्या लेखकमित्रांचाही त्याच्या बोलण्यातून उल्लेख यायचा. सदानंद रेगे हे त्याचे जवळचे मित्र. रेग्यांविषयी तो एकदा म्हणाला, ‘रेगे हा भांडणं करतो, अशी त्याची प्रसिद्धी आहे. त्याच्याशी मैत्री झाली की, लगेच तो त्याच्याबरोबर भांडण करतो. म्हणून काही लोक आता उघड म्हणतात, ‘रेगे तुझ्याबरोबर आम्हाला मैत्री करायची नाही, कारण तुझ्याबरोबर आमचं भांडण व्हावं असं आम्हाला वाटत नाही.’’
पुण्यात ‘साधने’च्या कचेरीला त्याची हमखास भेट असायची. साधनेने व यदुनाथ थत्त्यांनी हमीदला सुरुवातीपासून उचलून धरलेले.
हमीद ज्यांना मार्गदर्शक मानायची अशी मंडळी म्हणजे श्री. पु. भागवत, अ. भि. शहा, वसंत नगरकर, मे. पुं. रेगे, नरहर कुरुंदकर. कुरुंदकरांनी हमीदच्या बरोबरीने मुस्लीम जातीयवादावर कोरडे ओढले. त्यांनी एकदा हमीदला नव्या वर्षाच्या शुभेच्छा पाठविल्या होत्या. कार्डावर त्यांनी त्यांच्या अशुद्ध लेखनाचे नियम पाळून लिहिले होते, ‘तुम्हाला नवे वर्ष सुखा-समाधानाचे, समृद्धीचे जावो असे मला म्हणवत नाही. कारण तसे म्हणणे म्हणजे आपण अंगिकारलेले कार्य सोडून द्या, असे म्हणण्यासारखे आहे. तुम्ही हे कार्य करीत राहावे अशी इच्छा असल्याने तुम्हाला नवे वर्ष खडतर कष्टाचे जावो असे लिहितो.’
शहांविषयी हमीदला खूपच आदर होता. ‘शहा हा अतिशय डिसेंट व उमदा माणूस आहे. आमचे काही वेळा वैचारिक मतभेद झाले तरी ते शहांनी त्या पातळीवरच ठेवले. मनानेच ते डेमोक्रॅटिक वृत्तीचे आहेत.’ असे तो म्हणे. शहा मुस्लीम सत्यशोधक अधिवेशनात उंच फरची टोपी घालून बसत. त्याची तो थट्टाही करे. शहांच्या ‘कमिटी फॉर कल्चरल फ्रिडम’ या समितीवर अमेरिकाधर्जिणी अशा शिक्का असल्याने व ती चालविणाऱ्या शहांशी हमीदचे संबंध असल्ने हमीदचे जातीय मुस्लीव व हिंदू विरोधक, कम्युनिस्ट मंडळी हमीदवर सी.आय.ए.चा एजंट असल्याची टीका करीत. हमीद म्हणे, ‘सालं, त्या सी.आ.ए.चा पत्ता तरी सांगा आम्हाला. मी अर्जच करणार आहे; डिअर सी.आय.ए. आम्ही तुमचे एजंट व्हायला तयार आहोत. तुमचे पैसे कुठे मिळतात ते कळवावे. म्हणजे त्या पत्त्यावरून नेण्याची व्यवस्था करू.’ जरा थांबून तो म्हणे, ‘अरे, सी.आ.ए. एजंट म्हणून ज्यांच्यावर पेपरमधून उघड टीका होते, त्यांना पैसे द्यायला सी.आय.ए.वाले काय मूर्ख आहेत? ज्याचा संशयही येणार नाही, अशीच माणसे त्यांचे एजंट असणार. उघड उघड एजंट व्हायला सी.आ.ए. हे काय वर्तमानपत्र आहे?’
शहा, कुरुंदकर, यदुनाथ हे समविचाराचे लोक हमीदचे मित्र असतील यात फारसे आश्चर्य नाही. हमीदचे ज्यांच्याशी कडवट मतभेद होते अशांशीसुद्धा तो उत्तम संबंध ठेवीत असे. काहींशी तर त्याची दाट मैत्रीही जमली होती. कर्तारसिंग थत्ते हे हिंदुत्वनिष्ठ चमत्कारिक गृहस्थ. शस्त्र बाळगता यावे म्हणून शीख धर्म स्वीकारलेला. मुसलमानांच्याविषयी, त्या सगळ्यांना ठार केले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. हमीदला ते भेटले की प्रथम म्हणायचे, मला दहा रुपये द्या. हमीदही निमूटपणे नोट काढून द्यायचा. एकदा हमीदला टाइम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगसमोर कर्तारसिंग थत्ते भेटले. ते काही बोलायच्या आत हमीदने दहाची नोट त्यांच्या हातावर ठेवली आणि तो त्यांना म्हणाला, ‘माझ्या पूर्वजांनी तुमच्या पूर्वजांकडून जो जिझिया कर घेतला होता. त्याची प्रथम भरपाई होऊ द्या, मग दुसरे बोलू.’ कर्तारसिंग गडगडून हसले, व म्हणाले, ‘दलवाई, तुला आम्ही मानला. हिंदुस्थानातल्या सगळ्या हिंदूंना च्युत्त्या बनवलंस तू. आम्ही गेली वीस-पंचवीस वर्षे मुस्लीमविरोधाची धार लावत आणली होती. तू दोन वर्षांत ती बोथट करून टाकलीस. मानलं तुला!’
...
दोन
हमीद दलवाईला मुस्लीम समाज सुधारणेचा ध्यास लागला होता. जळी स्थळी तोच प्रश्न. या विषयावर त्याची अखंड बडबड ऐकून मी एकदा कंटाळलो व म्हणालो, ‘आता हे हिंदू व मुसलमान दोघेही खड्ड्यात जाऊ देत. आपण संध्याकाळी भेटू तेव्हा निराळ्या विषयावर बोलायचे.’ त्याला तो कबूल झाला. संध्याकाळी आम्ही फिरायला गेलो. मी पाहिलेल्या एका चांगल्या सिनेमाची त्याला गोष्ट सांगू लागलो. मधेच थांबवून सिनेमातला संदर्भ घेऊन मला म्हणाला, ‘म्हणजे हे आमच्या शेख अब्दुल्लासारखं झालं. डू यू नो व्हेन शेख अब्दुल्ला...’ असे म्हणून मुस्लीम प्रश्नावर परत त्याचा धबधबा सुरू झाला.
एखाद्या प्रश्नावर एवढा झपाटलेला माणूस माझ्या पाहण्यात नाही. इतर मौजमजा चालली असली तरी ती करत असतानाही हमीदची या प्रश्नातली इन्व्हॉल्व्हमेंट कुठे कमी पडली नाही. माझ्यासमोर त्याची दहा-बारा वर्षे गेली. त्या आधी नुकते त्याचे काम सुरू झालेले होते. आजाराची गेली दोन वर्षे सोडली तर आठ-दहा वर्षे एवढाच काळ त्याला काम करायला मिळाला. पण एवढ्याशा काळात त्याने सबंध भारतातल्या मुसलमान समाजाला हादरा दिला. आणि दूरवर पाहता जागतिक इस्लामच्या इतिहासात अभूतपूर्व घटना करून दाखवली. त्याच्या कामगिरीचं गमक म्हणजे त्याने घेतलेली भूमिका आणि ती पुस्तकात न ठेवता तिचे मास-मूव्हमेंटमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याने केलेली धडपड.
‘अल्ला हा स्तुतीस पात्र असा जगातील एकमेव देव आहे. महंमद पैगंबर हा अल्लाचा रसूल (दूत) असून त्याच्याकरवी अल्लाने कुराण ही शिकवण माणसासाठी सांगितली आहे.’ ही इस्लामची थोडक्यात भूमिका. आजपर्यंत इस्लामच्या तेराशे वर्षांच्या इतिहासात या भूमिकेला कोणी जाहीररित्या आव्हान दिलेले नव्हते. ते हमीद दलवाईने दिले. यापूर्वी प्रागतिकक विचारसरणीचे अनेक मुस्लीम विचारवंत होऊन गेले. मौलाना आझादांसारख्यांनी कुराणाची निराळी इंटप्रिटेशन्स केली. न्या. छगलांनी मुस्लीम जातीच्या राजकारणावर टीका केली. पण कुराण हा ईश्वरी ग्रंथ आहे, यावर कोणी शंका घेतली नाही. काही मुस्लीम मार्क्सिस्ट झाले. त्यांनी मार्क्सिझम स्वीकारला. पण इस्लामच्या मूलतत्त्वांविषयी जाहीर भूमिका घेण्याचे त्यांनी टाळले. हमीदने त्याच्या कार्याच्या सुरवातीपासून ‘महंमद पैगंबर हा माणूस होता. त्याने त्यावेळच्या समाजधारणेसाठी कुराण हा ग्रंथ लिहिला, त्या काळात त्या समाजाला ते नियम आवश्यक वाटले असले तरी कालमानानुसार त्यातील काही नियम चुकीच्या पायावर आधारलेले आहेत, ते रद्द व्हावेत’ अशी भूमिका घेतली यात कुठेही कधीही त्याने लपवाछपवी केली नाही. कुठे तडजोडही केली नाही.
या त्याच्या भूमिकेमुळे इस्लामच्या जगतात खळबळ उडाली. अशा गद्दार माणसाला नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मृत्यूच्या छायेत हमीद सततच वावरत राहिला. मुस्लीम पुढाऱ्यांनी हमीदच्या मृत्यूनंतर साधे उपचार म्हणूनसुद्धा दुःखप्रदर्शन केले नाही. पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे आलेल्या दुखवट्याच्या ठरावालाही त्यांनी विरोध केला, इतका त्यांच्या मनात हमीदविषयी कडवटपणा भरलेला होता.
पासष्ट-सहासष्ट साली हमीदचे भाषण मी पन्हाळ्याच्या शिबिरात ऐकले. वजनदार कुऱ्हाडीने घाव घालावा तसं वाटलं. त्याच्या भाषणाच्या आधी एस.एम. जोशांनी ‘मुस्लीम समाजातला आगरकर’ अशी त्याची ओळख करून दिलेली होती. परवा त्याच्या मृत्यूनंतरच्या पुण्यातल्या शोकसभेत नानासाहेब गोरे, बाबा आढाव, पु. ल. देशपांडे आणि इतर वक्त्यांनी त्याला महात्मा फुल्यांची उपमा दिली. पण ‘मुस्लीम समाजाचा महात्मा फुले’ अशी उपमा न देता, ‘हा सर्व समाजाला आवश्यक, महात्मा फुल्यांचा वारस आहे’ असे सर्वांनी म्हटले. आठदहा वर्षांतली हमीद दलवाईच्या कार्याची ही वाटचाल आहे.
हमीदने गांधीटोपी घालण्यावरून वडिलांच्या हातचा मार खाल्ला. पुढे हट्टाने तो टोपी घालू लागला. सेवादलात जाऊ लागला. गावच्या काही पुढाऱ्यांच्या हातचा मार खाल्ला, तरी डरला नाही. पुढे मुंबईला आल्यावर सेवादलाच्या संपर्कामुळे तो सोशालिस्ट पक्षाच्या परिघात वावरू लागल्यावर या प्रश्नाची इतर सहकाऱ्यांबरोबर चर्चा करू लागला. त्याला समाजवादी पक्षातही या विषयाचा कोणी सखोल विचार केलेला आढळला नाही. वैचारिक पातळीवर भोंगळपणा आणि कृतीच्या बाबतीत मुस्लिमांचा अनुनय असा प्रकार त्याला तेथे आढळला. पण त्या पक्षात त्याला बोलायची संधी मात्र मिळत गेली. त्याला तिथे स्थानही होते. मला भेटला त्या वर्षी तो संयुक्त समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्राच्या कार्यकारिणीवर होता. पण आपली मते मांडून पक्षाचे धोरण बदलेना म्हणून तो निराश झाला होता.
या सुमारास त्याच्या भूमिकेला अ. भि. शहा व कुरुंदकर यांनी उचलून धरले. मी तेव्हा यूथ ऑर्गनायझेशन – पुढे जिचे युवक क्रांती दल झाले- मधे काम करीत होतो. आम्ही पुण्यात त्याची टिळक स्मारक मंदिरात तीन व्याख्याने घडवून आणली. पुढे तो महाराष्ट्रभर व्याख्याने देत फिरला. भारतातल्या अन्य प्रांतातही हिंडला. थोडक्यात, त्याने विचारांचे स्वतंत्र व्यासपीठच उभे केले.
हमीदने या समाजापुढे असे मांडले की, स्वातंत्र्यपूर्व काळात मुसलमान फुटीर वृत्तीने का वागले, किंवा आजही भारतातले मुसलमान मुख्य प्रवाहात का समरस होत नाहीत, याचे खापर केवळ हिंदुत्त्ववाद्यांवर फोडून चालणार नाही. मुसलमानांच्या इतिहासाचे नीट परिशीलन केल्यावर मुस्लीम राजकारणामागच्या शक्ती ध्यानात येतील. इस्लामच्या तेराशे वर्षांच्या इतिहासात त्याला पराभव जवळपास माहीत नव्हता. एका छोट्याशा, कोणाला माहीत नसलेल्या देशात हा धर्म उदय पावला आणि एकतृतीयांश जगावर त्याचे राज्य पसरले. भारतातही मुस्लीम नेतृत्वाला आपण राज्यकर्ती जमात आहोत, याचा अजूनही अहंकार आहे. तेव्हा या प्रवृत्ती ज्यांच्यात परंपरेने जोपासल्या गेल्या आहेत, त्यांना सेक्युलर कसे बनवायचे, या आव्हानाचा विचार करा.
कडव्या हिंदूंना उद्देशून त्याने सांगितले, ‘इतिहासाच्या एका क्षणी हिंदुस्थानची फाळणी झाली. फाळणीची चिकित्सा होऊ शकेल, फाळणीचे गुन्हेगारही ठरवता येतील. पण ते चक्र उलटे फिरविण्याचे स्वप्न पाहू नका. कित्येक प्रांतातल्या लोकांनी या देशातून फुटायचा निर्णय त्यावेळी घेतला होता हे विसरू नका. आता भारतातल्या आठ कोटी मुसलमानांना पाकिस्तान आश्रय देणार नाही, शिवाय त्यांची तिकडे जायची तयारी नाही. ही आठ कोटी माणसे आपण ही समुद्रात बुडवू शकत नाही. तेव्हा यांच्याशी जुळवून घेण्याचाच विचार केला पाहिजे. त्यांना बरोबरीचे स्थान देऊन सर्वसामान्य मुस्लीम समाजाची मुल्लामौलवींच्या संधिसाधू पकडीतून कशी सुटका करता येईल ते पाहा. त्यासाठी त्यांचा द्वेष करणे सोडून त्यांच्यातल्या सामाजिक सुधारणांना हात घातला पाहिजे. मुसलमानात या विचाराचे तरुण पुढे येऊ पाहात आहेत. ते त्या समाजात कसे रुजतील हे पाहिले पाहिजे. जातीय दंगली करून प्रश्न सुटणे तर दूरच, पण अधिक बिकट होतील. आमच्यासारखे जे काम करतात त्यांची पंचाईत होईल.’
मुसलमान नेतृत्वामधल्या जातीय व आक्रमक प्रवृत्तींवर प्रहार करणारा हमीद हा एक मुस्लीम माणूस निघाल्याने त्याला खूप महत्त्व आले. तो एक मुस्लिमांच्या सामाजिक प्रक्रियेचा टप्पा ठरला. अ. भि. शहा, हमीद व इतरांनी सेक्यूलर फोरम स्थापन करून ‘सेक्युलरिस्ट’ हे इंग्रजी नियतकालिक काढून अखिल भारतीय स्तरावरच्या मुस्लीम इंटलेक्चुअल्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
शहांच्यामुळे हमीदच्या प्रेरणेला उत्तम वैचारिक बैठक मिळाली. शहांची इस्लामविषयावरची खाजगी लायब्ररी भारतातील उत्तम समजली जाते. त्यामुळे इस्लामविषयीचे जागतिक स्तरावरील चिंतन त्याच्या परिचयाचे झाले. दिल्लीचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी वसंत नगरकर यांच्या मुस्लीम प्रश्नाच्या गाढ्या व्यासंगाचा हमीदला खूप फायदा मिळाला. हमीदच्या भ्रमंतीत इस्लामिक हिस्टरीचे अलिगढ विद्यापीठातील जागतिक किर्तीचे विद्वान प्रा. हबीब यांची गाठ पडली. तेव्हा हमीदला मुस्लिमांमधला समविचारांचा माणूस प्रथमच भेटल्याचा आनंद झाला. दिलीप चित्रे ह्या प्रसिद्ध लेखकाने हमीदच्या लेखांची इंग्रजी भाषांतरे केली. शहांनी ती ‘क्वेस्ट’ व अन्यत्र छापवून आणली. त्यामुळे त्याची भूमिका अखिल भारतीय स्तरावर ज्ञात झाली.
हमीद केवळ भूमिका घेऊन थांबला नाही. तसा थांबला असता तर मोठा विचारवंत म्हणून त्याचा लौकिक राहिला असता. पण या पलीकडे काही नाही. त्याने आपल्या वैचारिक भूमिकेवरून मुस्लीम मास मूव्हमेंट बांधण्याचा सतत प्रयत्न केला.
हमीदने मुस्लीम स्त्रियांच्या तलाकचा प्रश्न हाती घेतला. इस्लामच्या कायद्यात शरियतमध्ये पुरुषाला चार बायका करण्याची मुभा व तोंडाने तीनदा तलाक उच्चारल्यावर बायकोला विनाजबाबदारी बेघर करण्याचा अधिकार दिलेला आहे. हमीदने मागणी केली की, हा मुस्लीम पर्सनल लॉ रद्द व्हावा. सर्व धर्मियांना समान नागरी कायदा लागू व्हावा.
यावर मुस्लीम नेतृत्वाकडून गदारोळ उठला : ही धर्मात ढवळाढवळ आहे. शरियत हा ईश्वरी कायदा आहे. त्यात कोणी बदल करू शकत नाही. शहा, हमीद आणि इतरांनी त्यांना दाखवून दिले की, इतिहासात शरियतमध्ये वेळोवेळी बदल झालेले आहेत. शरियतमध्ये चोरीच्या गुन्ह्याबद्दल हात तोडण्याची शिक्षा आहे. आणि इस्लामिक स्टेट्समध्येही ती अंमलात येऊ शकत नाही, इत्यादी.
हमीदने मुंबईला सहा मुस्लीम स्त्रियांचा समान नागरी कायद्याची मागणी करणारा मोर्चा काढला. तो खूप गाजला. इस्लामच्या इतिहासात असे प्रथमच घडत होते. पुण्याला भाई वैद्य, बाबा आढाव यांनी त्यांच्या पक्षातल्या व संपर्कातल्या मुस्लीम तरुणांची मीटिंग घेऊन हमीदला तेथे बोलावले. काही अंतराने चार-पाच सेशन्स झाल्यावर त्या तरुणांनी हमीदचे विचार स्वीकारून त्याच्याबरोबर काम करायचे ठरवले. या मंडळास ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळ’ असे नाव दिले.
हमीदने समान नागरी कायद्याच्या मागणीबरोबर ‘वक्फ’ या मुस्लीम धार्मिक इस्टेटींच्या चौकशीची मागणी केली. या वक्फांच्या जीवावरच मुस्लिमांमधले जातीय नेतृत्व पोसले जाते. या इस्टेटी किती आहेत, त्यांचा विनियोग कसा होतो, याची सरकारला फारच थोडी माहिती आहे. हमीदने वक्फची चौकशी होऊन त्याचा विनियोग मुस्लीम समाजातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी व्हावा, अशी मागणी केली.
उर्दू माध्यमाच्या शाळा बंद करून उर्दू हा एक ऐच्छिक भाषाविषय म्हणून ठेवण्यात यावा, अशी मागणी करणारी परिषद त्याने कोल्हापूरला डिसेंबर ७४मध्ये भरवली. त्याला साडेसातशे मुस्लीम प्रतिनिधी आले. परिषदेत अरेबिक लिपीचे, धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरसा या शाळांवर टीका झाली. ‘रेग्युलर शाळांमधे न जाता अशा शाळांमधे लहानपणी मुस्लीम मुले जाताता. त्यामुळे शिक्षणाचा सांधा तुटतो. म्हणून मुस्लीम समाजात गुन्हेगारीकडे वळण्याची प्रवृत्ती जास्त असते. अशा मदरशांचे ट्रस्टी कलेक्टर, मोठे ऑफिसर असतात. ते मात्र स्वतःच्या मुलांना मदरशांत घालून नुकसान करून घेत नाहीत. त्यांची मुले कॉन्व्हेंटमधे जातात’ अशीही एकाने टीका केली.
...
हमीदच्या वैचारिक धक्क्यामुळे मुस्लीम तरुणांची एक लाट सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे आली. पण पुढे आजतागायत तेच चेहरे कायम राहिले. नवी माणसे येऊच शकली नाहीत. त्यामुळे या जुन्या मंडळींच्या मर्यादा ह्या चळवळीच्याच मर्यादा बनल्या. ही चळवळ मुस्लीम जनमानसात रुजू शकली नाही.
हमीद स्वतःच या मुस्लीम समाजात रुजलेला नव्हता. आमच्यात जेवढा वेळ तो घालवायचा त्याच्या सहस्त्रांशही त्याने मुस्लीम समाजात घालविला नाही. त्याचा बहुतांश वावर ‘एलिट’ समाजात होता. त्यामुळे मुस्लीम समाजाला हमीदविषयी ‘सेन्स ऑफ बिलाँगिंग’ कधीच आला नाही. हमीदला त्या समाजाविषयी कळकळ नव्हती अशातला मुळीच भाग नाही. धडपड करून शकणाऱ्या नांदेडच्या एका मुस्लीम मुलीला तिचे शिक्षण बंद पडून नये म्हणून शंभर रुपये त्याने त्याच्या आजारपणाच्या काळातही आठवण ठेवून पाठविले होते. अशा तुरळक बाबी सोडल्या तर हमीद हा सर्वसामान्य मुसलमानांची मने जिंकू शकला नाही, त्यांच्यातला एक होऊ शकला नाही. त्यांना तो परकाच राहिला. त्याची ‘इंधन’ ही कादंबरी जवळपास आत्मचरित्रात्मक आहे. त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांच्या अनेक खुणा या कादंबरीत पसरलेल्या आहेत. ह्या कादंबरीचा नायक तरुण वयातच गाव सोडून जातो. हृदयरोगानंतर विश्रांतीसाठी म्हणून बऱ्याच वर्षांनी परत येतो. त्या गावात हिंदू-मुसलमान ताण वाढत जाऊन त्याचे भीषण पर्यवसान होत असताना तो केवळ एक प्रेक्षक असतो. मधे पडून ती प्रक्रिया थांबविण्याचा प्रयत्न करू लागताच त्याचे कोणी ऐकत नाही. एक जण तर त्याला म्हणतो, ‘तू इथून पळ काढलास. पंधरा वर्षे आम्ही ही सर्व झळ सोसली. आम्हाला उपदेश करण्याचा तुला काही अधिकार नाही.’ घडलेल्या घटनेनंतर तो गाव सोडतो. तसे करण्यावाचून दुसरा मार्गच त्याच्यापुढे राहात नाही.
या कादंबरीवरून हमीदच्या स्वभावातल्या या परकेपणाविषयीचा अंदाज बांधता येतो. लहानपणी गांधी टोपी घालतो म्हणून वडिलांनी मारलेले होते, याची डोक्यात तिडीक. वडील आणि गावातले इतर वडीलधारे लीगवाले, त्यामुळे या मुस्लीम राजकारणाविषयीच तिडीक बसली असावी. कलावंताचे संवेदनाक्षम मन असल्याने या जातीय राजकारणापायी होणारी निरपराध जीवांची फरपटही त्याला दिसत होती.
‘लाट’ कथासंग्रहातली ‘छप्पर’ या गोष्टीतली करीमची व्यक्तिरेखा ही हमीदच्या भूमिकेच्या संदर्भात फारच अन्वर्थक वाटते. घरात बहिणीला टी.बी. झाला म्हणून शहरातून आलेला भाऊ, करीम, अस्वस्थ होतो. तिला वेगळे ठेवा, तिचे उष्टे कोणी खाऊ नका असे सर्वांना बजावतो. पण मागासपणामुळे, मायेपोटी ते पाळले जात नाही. घरातली एकेक करीत करीत करीम व आई सोडून सगळी माणसे टी.बी. होऊन मरतात. करीम वेडा व्हायची पाळी येते. तो म्हणतो, ‘या काळोखाने सगळ्यांना खाल्ले. हे छप्परच उडवले पाहिजे. त्याशिवाय हा रोग घराबाहेर जाणार नाही.’ त्याची आई म्हणते, ‘अरे, वाडवडिलांनी बांधलेलं छप्पर का पाडतोस? त्यापेक्षा घरात सुधारणा कर...’
हमीदची सुरुवातीच्या काळातरी धडक ही करीमसारखीच होती. सद्हेतूने पण छप्पर उडवायची भाषा तो करीत होता. करीमची गोष्ट लिहिणारा कलावंत हमीद त्या आईची बाजू समजू शकत होता. पण समाजसुधारक हमीद काही मर्यादा ओलांडू शकला नाही.
...
... यावर कोणी म्हणेल की, ‘वैचारिक मांडणीचे काम हमीदने केले. चळवळीची किंवा संघटनेची बांधणी करण्याचे काम दुसऱ्या कोणी करावे.’ हे काम कोणी केले तर उत्तमच. पण तसे सहसा होत नाही. जो एखाद्या चळवळीचा प्रवर्तक असतो, त्याची आपल्या समाजात अतिशय खडतर अवस्था असते. त्याला अभ्यास करून, ग्रंथालय पालथे घालून ग्रंथनिर्मितीही करावी लागते आणि चळवळीतल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या हेव्यादाव्यांना, कटकटींना तोंड देऊन सर्वांचा मेळ घालावा लागतो. फुले व आंबेडकरांनी हे केले. तेव्हा डोळस माणसाला अपयशाला अपयश म्हणूनच पुढे जावं लागतं.
***
अवचटांच्या मूळ पुस्तकातील मजकूर इथे दोन भागांत लेखाच्या स्वरूपात प्रसिद्ध केलाय. पुस्तकात दलवाईंचं आजारपण आणि नंतर मृत्यू इथपर्यंत अवचट येऊन थांबतात. आपण ब्लॉगच्या मर्यादेत अवचटांचे दलवाईंसोबतचे व्यक्तिगत अनुभव-आकलन आणि दलवाईंच्या सामाजिक भूमिकेचा-साहित्याचा त्यांचा अंदाज एवढाच भाग इथे संपादित करून कुठली लिंक तुटणार नाही याची शक्य तेवढी काळजी घेऊन दिला आहे.
मूळ पुस्तक पुण्यात टिळक रोडवर नीलकंठ प्रकाशनाच्या दुकानात पन्नास रुपयांना मिळतं.
Labels:
anil awachat,
hamid dalwai,
vijay tendulkar,
हमीद दलवाई
Wednesday, February 15, 2012
हमीद : एक श्रेष्ठ प्रबोधनकार
- पु. ल. देशपांडे
पुलंच्या ‘मैत्र’ ह्या ‘मौज’ने प्रकाशित केलेल्या पुस्तकातल्या मूळ लेखाचा अगदीच थोडासा भाग संदर्भापुरता इथे दिला आहे, बाकी पुस्तक बाजारात मिळतं.
आगरकरांना ‘देव न मानणारा देवमाणूस’ म्हटले जाते. हमीद दलवाई हा ह्या महाराष्ट्रातला असाच देव न मानणारा देवमाणूस, पण ‘देव न मानणे’ हे हमीदला मात्र आगरकरांहून अधिक धोक्याचे होते. तो ज्या मुसलमान धर्मात जन्माला आला होता, त्यात हिंदूंसारखी उदारमतवादी परंपरा नाही. आगरकरांना सनातन्यांचा विरोधा झाला, तरी त्यांच्या मताना पाठिंबा देणारेही हिंदू होते. हमीदचा लढा हा मुसलमानी समाजात अभूतपूर्व होता. आजदेखील बॅरिस्टर छगलांसारखी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी सर्वार्थाने इहवादी आणि उदारमतवादी माणसे वगळली, तर हमीदच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे तो बहुसंख्य मुसलमानांच्या हिशेबी ‘काफिर’ होता. त्याला काफिर मानत नव्हत्या फक्त धार्मिक रूढींच्या जाचाखाली रगडल्या जाणाऱ्या त्या दुर्दैवी मुसलमान भगिनी. ‘तलाक’ पद्धतीमुळे ज्यांच्या आयुष्याचा पालापाचोळा होत होता अशा भगिनींना त्यांची दुःखे जाणणारा एक भाऊ लाभला होता. त्या जाचातून मुक्त करण्यासाठी जिवाचे रान करणारा भ्राता उभा राहिला होता. माणुसकीचे प्राथमिक अधिकार ज्यांना घरातही नाहीत आणि घराबाहेरही नाहीत, अशा अवस्थेत जगण्याचे भोग ह्या देशातल्या मुसलमानच नव्हे, तर असंख्य स्त्रियांच्या नशिबाला लागलेले आहेत. खुद्द दलित समाजातील पुरुषदेखील त्यांच्या स्त्रियांना प्रतिष्ठेने वागवत असतात असे नाही. ह्या देशातल्या बहुतांश स्त्रियांचे जगणे म्हणजे नाना प्रकारच्या खस्ता काढीत पिचत पिचत एके दिवशी मरून जाणे एवढेच आहे. ते मरण तिला जितके लवकर येईल, ती स्त्री भाग्यवान. मृत्यूनेही उशीर लावला, तर त्या दुर्भाग्याला सीमा नाही.
‘धर्म’, ‘मजहब’ या नावाखाली अनेक अदृश्य लटकत्या तलवारी असंख्य अभागी जिवांच्या मस्तकांवर ते जीव केवळ स्त्रीदेहाने ह्या जगात आले म्हणून शतकानुशतके टांगलेल्या आहेत. दुर्भाग्याची प्रत निराळी, पण त्यातून कुठल्याही धर्मातली स्त्री सुटलेली नाही. हमीदला केवळ मुसलमान स्त्रीचेच दुःख जाणवले होते असे नाही. फक्त त्या स्त्रियांच्या यातनांची त्याला अधिक माहिती होती. त्या स्त्रियांच्या दुःखांना कुठे वाचाच फुटत नव्हती, ती फोडायला कुणी धजावत नाही ह्याची त्याला खंत होती. वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्याला धर्म या नावाखाली चालणाऱ्या अज्ञानाच्या जोपासनेची आणि अन्यायांची जाण आली होती. हिंदू स्त्रीला निदान निसर्गाने बहाल केलेली मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश तरी नाकारला जात नव्हता. मुसलमान स्त्रीला तोही नाकारलेला. अपवाद फक्त नियम सिद्ध करण्यापुरते. आणि ह्या साऱ्या रूढी पुरुषांची सोय व्हावी म्हणून.
...
... हमीदशी माझा स्नेह होता हे म्हणतानादेखील त्या म्हणण्यातून आत्मप्रौढीचा ध्वनी उमटेल की काय, अशी मनाला शंका यावी इतका तो मोठा होत गेलेला होता. ज्या जिद्दीने तो ह्या साऱ्या अन्यायांविरुद्ध लढत होता ते पाहिल्यावर त्याची भेट ही एखाद्या वीरपुरुषाच्या दर्शनासारखी वाटत होती, असे म्हणण्यात मला यत्किंचितही अतिशयोक्ती वाटत नाही. हमीदचा आणि माझा गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासूनचा परिचय. ‘कफनचोर’सारखी विलक्षण परिणामकारक कथा लिहिणारा हमीद, ‘इंधन’सारखी सरळसूत शैलीतली पण प्रभावी कादंबरी लिहिणारा हमीद. मी रेडियोत नोकरी करत होतो त्यावेळी कोकणातल्या मुसलमान कुटुंबाच्या जीवनावर श्रुतिकांची एक मालिका मी त्याच्याकडून लिहून घेतली होती. सदैव हसतमुख, बोलताना गमतीने आपले ते घाऱ्या रंगाचे डोळे मिचकावण्याची सवय असलेला हमीद, हसताना लालबुंद होणारा, खट्याळ पोरासारखी जीभ काढणारा, बोलताना बऱ्याच कोकणी माणसांना सवय असते तशी, ‘आयकलं का?’ म्हणून वाक्याची सुरुवात करणारा – मराठी साहित्याच्या क्षेत्रात सरसर वर चाललेला हमीद. अशा ह्या उमद्या, खेळाडू आणि मैफिलीत हव्याहव्याशा वाटणाऱ्या तरुणाच्या अंतःकरणात एक ज्वाला पेटते आहे आणि पाहता पाहता ती एका बंडाची मशाल होणार आहे, याची त्या काळात फार थोड्या लोकांना कल्पना असेल, पण एक दिव्य क्षण त्याच्या जीवनात आला आणि ललित साहित्य, त्याचा आवडता समाजवादी पक्ष या सर्वांशी असलेले संबंध बाजूला करून त्याने एका भयंकर बिकट वाटेचा प्रवास सुरू केला. आणि पाहता पाहता एका अपूर्व अशा नव्या प्रबोधनाचा उद्गाता होऊन तो निराळ्याच तेजाने तळपायला लागला.
...
यशापयशाची चिंता न करता आपल्या कार्यात रमून गेल्यासारखी त्याची वागण्याची वृत्ती पाहिल्यावर डोळ्यांपुढे दिसणारा हमीद कलावंतांच्या हातातल्या वाद्यासारखा वाटायचा. सतारीतून करूण स्वर निघावे आणि त्या कारुण्याचा सतारीवर परिणाम न दिसता ती आपल्या घडणीतल्या त्या पितळी ब्रिजेस, हस्तिदंती कलाकुसर, चमकदार भोपळे यांच्यामुळे ते देखणेपण जसेच्या तसे ठेवून असावी तसे काहीसे त्याचे ते आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि बोलण्यातून जाणवणारी रूढिग्रस्तांची करूण कहाणी ह्यांच्यातल्या पृथकपणाने प्रत्ययाला यायचे.
एखाद्या कार्याशी संपूर्णपणाने लिप्त असूनही त्या लिप्ततेचे प्रदर्शन न करणारी अलिप्तता सत्यशोधक हमीदला त्याच्यातल्या कलावंत हमीदने दिली असावी. मनाला हादरून टाकणाऱ्या त्याच्या ‘इंधन’ ह्या कादंबरीचे निवेदनदेखील असल्या कलापूर्ण अलिप्ततेचाच प्रत्यय घडवते. इतके करूण प्रसंग आहेत पण कुठे भळभळ नाही. आपल्या न्याय्य हक्कांसाठी झगडू पाहणाऱ्या मुसलमान स्त्रियांचा मोर्चा ही एक अभूतपूर्व घटना होती. त्याची कथाही त्याने जणू त्यात आपण कोणीच नव्हतो अशा विलक्षण अलिप्ततेने सांगितली होती. त्या मोर्चातली महिला पुढे दिल्लीला पंतप्रधानांना भेटायला गेली. तिला भेट नाकारण्यात आली. हे सर्व सांगून त्याबद्दलची चीड व्यक्त न करता हमीद आपले डोळे मिचकावीत म्हणाला, ‘‘... आणि आयकलं का, ही भेट नाकारताना पंतप्रधान इंदिरा गांधी आपणही बाई आहोत हे विसरल्या.’’
…
आपल्या मित्रांपैकी एक अशा सहजभावनेने हमीद भेटत होता. बोलत होता. थट्टामस्करी करीत होता. त्यामुळे एका व्यापक प्रबोधनाचा उद्गाता ह्या दृष्टीने त्याची असामान्य उंची जाणवत नव्हती. ती तो जाणवूही देत नव्हता. आता तो कायमचा चर्मचक्षूंच्या आड गेला. खूप दूर गेला. आणि दूर गेलेल्या पर्वतासारखी त्याची ती उंची आता जाणवायला लागली. त्याच्या त्या समर्पित जीवनाकडे पाहिल्यावर आता मात्र ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे दीन-दलित, स्त्री-पुरुषांच्या उद्धाराच्या चळवळीचा प्रवाह आणून जोडणारा त्या मालिकेतला एक श्रेष्ठ प्रबोधनकार ह्याच दृष्टीने त्याच्याकडे पाहिले पाहिजे, हे समजले. महाराष्ट्रातल्या समाजप्रबोधनाच्या इतिहासकाराला महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि हमीद दलवाई ही नावे अत्यंत आदराने उच्चारूनच ह्या प्रबोधनाचा विचार करावा लागेल. किंबहुना, महात्मा फुल्यांनी सुरू केलेल्या समाजप्रबोधनाच्या संपूर्ण इहवादी आणि ‘माणुसकी हाच धर्म मानायला हवा’ ह्या विचारवृक्षाला आलेले ‘हमीद दलवाई’ हे खरे रसरशीत फळ होते.
धर्म, रूढी, वंशवर्चस्व, राजकीय आणि आर्थिक सत्तालोभ यांची असहायांच्या शोषणासाठी राक्षसी चढाओढ चालत असलेल्या ह्या जगात शोषितांच्या अश्रुधारांना खंड नसतो. उणीव असते ती असले असहाय अश्रू पुसून तिथे हास्य फुलवायला निघालेल्या निर्भय आणि निःस्वार्थी हातांची.
हमीद गेला याचा अर्थ असले दुर्मिळ हात गेले.
![]() |
| पु. ल. देशपांडे |
आगरकरांना ‘देव न मानणारा देवमाणूस’ म्हटले जाते. हमीद दलवाई हा ह्या महाराष्ट्रातला असाच देव न मानणारा देवमाणूस, पण ‘देव न मानणे’ हे हमीदला मात्र आगरकरांहून अधिक धोक्याचे होते. तो ज्या मुसलमान धर्मात जन्माला आला होता, त्यात हिंदूंसारखी उदारमतवादी परंपरा नाही. आगरकरांना सनातन्यांचा विरोधा झाला, तरी त्यांच्या मताना पाठिंबा देणारेही हिंदू होते. हमीदचा लढा हा मुसलमानी समाजात अभूतपूर्व होता. आजदेखील बॅरिस्टर छगलांसारखी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी सर्वार्थाने इहवादी आणि उदारमतवादी माणसे वगळली, तर हमीदच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे तो बहुसंख्य मुसलमानांच्या हिशेबी ‘काफिर’ होता. त्याला काफिर मानत नव्हत्या फक्त धार्मिक रूढींच्या जाचाखाली रगडल्या जाणाऱ्या त्या दुर्दैवी मुसलमान भगिनी. ‘तलाक’ पद्धतीमुळे ज्यांच्या आयुष्याचा पालापाचोळा होत होता अशा भगिनींना त्यांची दुःखे जाणणारा एक भाऊ लाभला होता. त्या जाचातून मुक्त करण्यासाठी जिवाचे रान करणारा भ्राता उभा राहिला होता. माणुसकीचे प्राथमिक अधिकार ज्यांना घरातही नाहीत आणि घराबाहेरही नाहीत, अशा अवस्थेत जगण्याचे भोग ह्या देशातल्या मुसलमानच नव्हे, तर असंख्य स्त्रियांच्या नशिबाला लागलेले आहेत. खुद्द दलित समाजातील पुरुषदेखील त्यांच्या स्त्रियांना प्रतिष्ठेने वागवत असतात असे नाही. ह्या देशातल्या बहुतांश स्त्रियांचे जगणे म्हणजे नाना प्रकारच्या खस्ता काढीत पिचत पिचत एके दिवशी मरून जाणे एवढेच आहे. ते मरण तिला जितके लवकर येईल, ती स्त्री भाग्यवान. मृत्यूनेही उशीर लावला, तर त्या दुर्भाग्याला सीमा नाही.
‘धर्म’, ‘मजहब’ या नावाखाली अनेक अदृश्य लटकत्या तलवारी असंख्य अभागी जिवांच्या मस्तकांवर ते जीव केवळ स्त्रीदेहाने ह्या जगात आले म्हणून शतकानुशतके टांगलेल्या आहेत. दुर्भाग्याची प्रत निराळी, पण त्यातून कुठल्याही धर्मातली स्त्री सुटलेली नाही. हमीदला केवळ मुसलमान स्त्रीचेच दुःख जाणवले होते असे नाही. फक्त त्या स्त्रियांच्या यातनांची त्याला अधिक माहिती होती. त्या स्त्रियांच्या दुःखांना कुठे वाचाच फुटत नव्हती, ती फोडायला कुणी धजावत नाही ह्याची त्याला खंत होती. वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्याला धर्म या नावाखाली चालणाऱ्या अज्ञानाच्या जोपासनेची आणि अन्यायांची जाण आली होती. हिंदू स्त्रीला निदान निसर्गाने बहाल केलेली मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश तरी नाकारला जात नव्हता. मुसलमान स्त्रीला तोही नाकारलेला. अपवाद फक्त नियम सिद्ध करण्यापुरते. आणि ह्या साऱ्या रूढी पुरुषांची सोय व्हावी म्हणून.
...
... हमीदशी माझा स्नेह होता हे म्हणतानादेखील त्या म्हणण्यातून आत्मप्रौढीचा ध्वनी उमटेल की काय, अशी मनाला शंका यावी इतका तो मोठा होत गेलेला होता. ज्या जिद्दीने तो ह्या साऱ्या अन्यायांविरुद्ध लढत होता ते पाहिल्यावर त्याची भेट ही एखाद्या वीरपुरुषाच्या दर्शनासारखी वाटत होती, असे म्हणण्यात मला यत्किंचितही अतिशयोक्ती वाटत नाही. हमीदचा आणि माझा गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासूनचा परिचय. ‘कफनचोर’सारखी विलक्षण परिणामकारक कथा लिहिणारा हमीद, ‘इंधन’सारखी सरळसूत शैलीतली पण प्रभावी कादंबरी लिहिणारा हमीद. मी रेडियोत नोकरी करत होतो त्यावेळी कोकणातल्या मुसलमान कुटुंबाच्या जीवनावर श्रुतिकांची एक मालिका मी त्याच्याकडून लिहून घेतली होती. सदैव हसतमुख, बोलताना गमतीने आपले ते घाऱ्या रंगाचे डोळे मिचकावण्याची सवय असलेला हमीद, हसताना लालबुंद होणारा, खट्याळ पोरासारखी जीभ काढणारा, बोलताना बऱ्याच कोकणी माणसांना सवय असते तशी, ‘आयकलं का?’ म्हणून वाक्याची सुरुवात करणारा – मराठी साहित्याच्या क्षेत्रात सरसर वर चाललेला हमीद. अशा ह्या उमद्या, खेळाडू आणि मैफिलीत हव्याहव्याशा वाटणाऱ्या तरुणाच्या अंतःकरणात एक ज्वाला पेटते आहे आणि पाहता पाहता ती एका बंडाची मशाल होणार आहे, याची त्या काळात फार थोड्या लोकांना कल्पना असेल, पण एक दिव्य क्षण त्याच्या जीवनात आला आणि ललित साहित्य, त्याचा आवडता समाजवादी पक्ष या सर्वांशी असलेले संबंध बाजूला करून त्याने एका भयंकर बिकट वाटेचा प्रवास सुरू केला. आणि पाहता पाहता एका अपूर्व अशा नव्या प्रबोधनाचा उद्गाता होऊन तो निराळ्याच तेजाने तळपायला लागला.
...
यशापयशाची चिंता न करता आपल्या कार्यात रमून गेल्यासारखी त्याची वागण्याची वृत्ती पाहिल्यावर डोळ्यांपुढे दिसणारा हमीद कलावंतांच्या हातातल्या वाद्यासारखा वाटायचा. सतारीतून करूण स्वर निघावे आणि त्या कारुण्याचा सतारीवर परिणाम न दिसता ती आपल्या घडणीतल्या त्या पितळी ब्रिजेस, हस्तिदंती कलाकुसर, चमकदार भोपळे यांच्यामुळे ते देखणेपण जसेच्या तसे ठेवून असावी तसे काहीसे त्याचे ते आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि बोलण्यातून जाणवणारी रूढिग्रस्तांची करूण कहाणी ह्यांच्यातल्या पृथकपणाने प्रत्ययाला यायचे.
एखाद्या कार्याशी संपूर्णपणाने लिप्त असूनही त्या लिप्ततेचे प्रदर्शन न करणारी अलिप्तता सत्यशोधक हमीदला त्याच्यातल्या कलावंत हमीदने दिली असावी. मनाला हादरून टाकणाऱ्या त्याच्या ‘इंधन’ ह्या कादंबरीचे निवेदनदेखील असल्या कलापूर्ण अलिप्ततेचाच प्रत्यय घडवते. इतके करूण प्रसंग आहेत पण कुठे भळभळ नाही. आपल्या न्याय्य हक्कांसाठी झगडू पाहणाऱ्या मुसलमान स्त्रियांचा मोर्चा ही एक अभूतपूर्व घटना होती. त्याची कथाही त्याने जणू त्यात आपण कोणीच नव्हतो अशा विलक्षण अलिप्ततेने सांगितली होती. त्या मोर्चातली महिला पुढे दिल्लीला पंतप्रधानांना भेटायला गेली. तिला भेट नाकारण्यात आली. हे सर्व सांगून त्याबद्दलची चीड व्यक्त न करता हमीद आपले डोळे मिचकावीत म्हणाला, ‘‘... आणि आयकलं का, ही भेट नाकारताना पंतप्रधान इंदिरा गांधी आपणही बाई आहोत हे विसरल्या.’’
…
आपल्या मित्रांपैकी एक अशा सहजभावनेने हमीद भेटत होता. बोलत होता. थट्टामस्करी करीत होता. त्यामुळे एका व्यापक प्रबोधनाचा उद्गाता ह्या दृष्टीने त्याची असामान्य उंची जाणवत नव्हती. ती तो जाणवूही देत नव्हता. आता तो कायमचा चर्मचक्षूंच्या आड गेला. खूप दूर गेला. आणि दूर गेलेल्या पर्वतासारखी त्याची ती उंची आता जाणवायला लागली. त्याच्या त्या समर्पित जीवनाकडे पाहिल्यावर आता मात्र ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे दीन-दलित, स्त्री-पुरुषांच्या उद्धाराच्या चळवळीचा प्रवाह आणून जोडणारा त्या मालिकेतला एक श्रेष्ठ प्रबोधनकार ह्याच दृष्टीने त्याच्याकडे पाहिले पाहिजे, हे समजले. महाराष्ट्रातल्या समाजप्रबोधनाच्या इतिहासकाराला महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि हमीद दलवाई ही नावे अत्यंत आदराने उच्चारूनच ह्या प्रबोधनाचा विचार करावा लागेल. किंबहुना, महात्मा फुल्यांनी सुरू केलेल्या समाजप्रबोधनाच्या संपूर्ण इहवादी आणि ‘माणुसकी हाच धर्म मानायला हवा’ ह्या विचारवृक्षाला आलेले ‘हमीद दलवाई’ हे खरे रसरशीत फळ होते.
धर्म, रूढी, वंशवर्चस्व, राजकीय आणि आर्थिक सत्तालोभ यांची असहायांच्या शोषणासाठी राक्षसी चढाओढ चालत असलेल्या ह्या जगात शोषितांच्या अश्रुधारांना खंड नसतो. उणीव असते ती असले असहाय अश्रू पुसून तिथे हास्य फुलवायला निघालेल्या निर्भय आणि निःस्वार्थी हातांची.
हमीद गेला याचा अर्थ असले दुर्मिळ हात गेले.
Sunday, February 12, 2012
Hamid and I
- Vijay Tendulkar
Vijay Tendulkar, one of India's finest playwrights, had written an article titled 'The Prejudice' in the monthly magazine Communal Combat. The article is also available on Rediff in three parts.
In the article he recounts his personal experiences of growing up in a Hindu family and elaborates the complex Hindu-Muslim relationship in the country. He also writes about how at different junctures in his life Muslim friends built his understanding of the religious complexities. This post includes Tendulkar's personal memories of his friendship with Hamid Dalwai.
After Amar Sheikh, I had the good fortune of having Hamid Dalwai, the Muslim reformer of the '60s in my life. We became friends much before he plunged into the Muslim reform movement. He was a creative writer. He wrote short stories. I was the editor of the monthly magazine in which they were published. I published his short stories. I was one of the first readers of his writing. He wrote about his community. His childhood. He wrote with anguish about his mother who was the third wife of his father. About communal riots. He wrote with a searing insight about his community, the Muslims.
My days with Hamid taught me the real lessons in understanding Muslims in my society. The working of the minds of the Muslims, their upbringing, what they were taught about us, Hindus, in their early formative years and the biases they were injected with at an early age. All this realisation came through Hamid. Through our long evenings and nights of intimate conversations.
Hamid had come to learn about my Hindu world more or less in the same way as I came to learn about his: through whatever little contact we could make with the 'other' world, the other side of the communal divide, by going out of our way in our adolescent years to know things by ourselves. His father was a Muslim Leaguer. A local leader of the League and a Hindu-hater. Hamid had grown up as a boy in this political climate. He grew out of it later, at a fairly young age.
When he worked for a better understanding between the two communities and propagated progressive social reforms in his own community particularly concerning the state of Muslim women, he was branded a traitor and a heretic by the majority of his people -- especially the diehard, conservative men of his community. He was simultaneously seen as an exception and a freak within his Muslim community by the Hindu intelligentsia.
I still remember. One of our senior writers who proudly proclaimed himself as a Hindu revivalist once advised Hamid with genuine concern: "You will always be an outsider among the Muslims. Why don't you become a Hindu? After all your forefathers were Hindu. You have Hindu blood in your veins. Come, I shall arrange for your conversion to Hinduism."
Hamid laughed heartily every time he heard this.
But he did say to me once in his introspective mood: "We Indian Muslims are a peculiar lot. Our forefathers did not come from across the borders of the country. They were not invaders but the invaded like the Hindus. They were Hindus. They were converted to Islam mostly under pressure; even by force. If this is true, then we belong here. We have Hindu genes in our system and a Muslim upbringing, a Muslim bias. We are a product of a mixed or hybrid culture which makes us an isolated lot; removed from the general reality, the general ethos. We belong nowhere. Not to the Muslim world outside nor to the predominantly Hindu world of this country. We have no roots to claim. And our loyalties will always remain questionable in this country. Not necessarily because of what we do but because of what we are expected to do -- as an alien race whose interests lie outside of this country. It will be presumed that we do it, that we have done it though we may have not. And we must not. Whatever happens to this country happens to us. Our fate is tied up to the fate of this society which may never accept us as its natural, integral part."
My friend Hamid died prematurely of kidney failure.
![]() |
| Vijay Tendulkar |
In the article he recounts his personal experiences of growing up in a Hindu family and elaborates the complex Hindu-Muslim relationship in the country. He also writes about how at different junctures in his life Muslim friends built his understanding of the religious complexities. This post includes Tendulkar's personal memories of his friendship with Hamid Dalwai.
After Amar Sheikh, I had the good fortune of having Hamid Dalwai, the Muslim reformer of the '60s in my life. We became friends much before he plunged into the Muslim reform movement. He was a creative writer. He wrote short stories. I was the editor of the monthly magazine in which they were published. I published his short stories. I was one of the first readers of his writing. He wrote about his community. His childhood. He wrote with anguish about his mother who was the third wife of his father. About communal riots. He wrote with a searing insight about his community, the Muslims.
My days with Hamid taught me the real lessons in understanding Muslims in my society. The working of the minds of the Muslims, their upbringing, what they were taught about us, Hindus, in their early formative years and the biases they were injected with at an early age. All this realisation came through Hamid. Through our long evenings and nights of intimate conversations.
Hamid had come to learn about my Hindu world more or less in the same way as I came to learn about his: through whatever little contact we could make with the 'other' world, the other side of the communal divide, by going out of our way in our adolescent years to know things by ourselves. His father was a Muslim Leaguer. A local leader of the League and a Hindu-hater. Hamid had grown up as a boy in this political climate. He grew out of it later, at a fairly young age.
When he worked for a better understanding between the two communities and propagated progressive social reforms in his own community particularly concerning the state of Muslim women, he was branded a traitor and a heretic by the majority of his people -- especially the diehard, conservative men of his community. He was simultaneously seen as an exception and a freak within his Muslim community by the Hindu intelligentsia.
I still remember. One of our senior writers who proudly proclaimed himself as a Hindu revivalist once advised Hamid with genuine concern: "You will always be an outsider among the Muslims. Why don't you become a Hindu? After all your forefathers were Hindu. You have Hindu blood in your veins. Come, I shall arrange for your conversion to Hinduism."
Hamid laughed heartily every time he heard this.
But he did say to me once in his introspective mood: "We Indian Muslims are a peculiar lot. Our forefathers did not come from across the borders of the country. They were not invaders but the invaded like the Hindus. They were Hindus. They were converted to Islam mostly under pressure; even by force. If this is true, then we belong here. We have Hindu genes in our system and a Muslim upbringing, a Muslim bias. We are a product of a mixed or hybrid culture which makes us an isolated lot; removed from the general reality, the general ethos. We belong nowhere. Not to the Muslim world outside nor to the predominantly Hindu world of this country. We have no roots to claim. And our loyalties will always remain questionable in this country. Not necessarily because of what we do but because of what we are expected to do -- as an alien race whose interests lie outside of this country. It will be presumed that we do it, that we have done it though we may have not. And we must not. Whatever happens to this country happens to us. Our fate is tied up to the fate of this society which may never accept us as its natural, integral part."
My friend Hamid died prematurely of kidney failure.
Friday, February 10, 2012
मी भरून पावले आहे
हमीद दलवाईंच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाईंचं हे आत्मचरित्र. 'मेहता पब्लिशिंग हाऊस'ने प्रकाशित केलेलं.
पुस्तकावरचा 'ब्लर्ब' असा आहे -
''एकोणीस वर्षं माझा दलवाईंच्याबरोबर सहवास झाला.
त्या काळात मी त्यांना समजू शकले नाही.
मला तेवढा वेळच नव्हता.
माझा संसार, माझी मुलं, आणि माझी नोकरी.
मी काय काय सांभाळणार हो?
कुठल्याही प्रकारचा त्रास दलवाईंना आपल्याकडून होता कामा नये, हे लक्षात ठेवून मी चालण्याचा प्रयत्न करीत होते...
तीन मे एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी दलवाईंचा अंत झाला.
शेवटी शेवटी ते मला दोन-तीनदा म्हणाले, 'मेहरू, आज मी जो काही आहे तो तुझ्यामुळेच आहे.'
याच्यातच मी सगळं भरून पावले आहे.''
पुस्तकावरचा 'ब्लर्ब' असा आहे -
''एकोणीस वर्षं माझा दलवाईंच्याबरोबर सहवास झाला.
त्या काळात मी त्यांना समजू शकले नाही.
मला तेवढा वेळच नव्हता.
माझा संसार, माझी मुलं, आणि माझी नोकरी.
मी काय काय सांभाळणार हो?
कुठल्याही प्रकारचा त्रास दलवाईंना आपल्याकडून होता कामा नये, हे लक्षात ठेवून मी चालण्याचा प्रयत्न करीत होते...
तीन मे एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी दलवाईंचा अंत झाला.
शेवटी शेवटी ते मला दोन-तीनदा म्हणाले, 'मेहरू, आज मी जो काही आहे तो तुझ्यामुळेच आहे.'
याच्यातच मी सगळं भरून पावले आहे.''
Wednesday, February 8, 2012
‘लाट’च्या निमित्ताने थोडेसे
- यदुनाथ थत्ते
हमीद दलवाई मराठीतून साहित्य-लेखन करू लागले, तेव्हा त्यांची फारशी दखल मराठी मुसलमानांना घ्यावीशी वाटली नाही. इतर लेखकांप्रमाणेच त्यांचे लेखन असणार अशी त्यांची समजूत होती. पण हमीदने जेव्हा स्वतः पाहिलेल्या, अनुभवलेल्या मुसलमानांच्या जीवनावर लिहायला सुरुवात केली तेव्हा ते काहीसे बेचैन झाले.
वैचारिक आणि ललित असा भेद करण्याची आपल्याकडे प्रथा पडली आहे. त्यांच्यात दुर्लभ असा भेद आहे अशी समजूत. महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ ठाकूर यांचे साहित्य वाचले की, हा भेद किती वरवरचा आणि नकली आहे ते ध्यानी येते. महात्मा गांधींच्या वैचारिक लिखाणात केवढे तरी लालित्य आढळते आणि रवींद्रांच्या ललित म्हणवल्या जाणाऱ्या लेखनात केवढी विलक्षण विचारवत्ता प्रकट झाली आहे, ते पाहून मन चकित होते. हमीदने वैचारिक लिखाण केले तसे ललित लेखनही केले आणि ते दोन्ही प्रवाह सरमिसळ झालेले आढळतील.
हमीदच्या वैचारिक साहित्याचे वेगळेपण त्याच्या वास्तवाच्या सम्यक आकलनात आणि निर्भय मांडणीत दिसून येते. तीच गोष्ट त्याचे ललित साहित्य वाचतानाही जाणवते. त्याचे मानवी भावजीवनाचे आकलन सम्यक वास्तवावर आधारलेले आहे. तो मुस्लिम समाजात वावरला, वाढला. त्या जीवनातील विविध रसधारा त्याने पाहिल्या, चाखल्या. इतर मुस्लिम लेखकांप्रमाणे आपला समाज वगळून त्याने फारसे लिहिले नाही. त्याच्या काव्यात्म सत्याच्या मुळाशी वास्तव सत्य ठाम उभे असते. त्याने माणसे बेचैन, प्रक्षुब्ध झाली तरी ते वास्तव सत्य नाकारणे कोणालाच शक्य नसते.
‘लाट’ हा हमीदच्या कथांचा संग्रह. त्याच्या गाजलेल्या कथांचा या संग्रहात अंतर्भाव केलेला आहे. साधना प्रकाशनाने पानशेतफुटीच्या आधी हा संग्रह प्रकाशित केला आणि दुर्दैवाने त्याच्या प्रती मोठ्या प्रमाणावर वितरित होण्याआधीच तो पाणलोटाचे भक्ष्य झाला. त्यानंतर त्याची एखादी प्रत मिळणेही अवघड झाले. शेवटी मेहरुन्निसा दलवाई यांनी मोठ्या कष्टाने एक प्रत मिळविली व त्यामुळे हे पुनर्मुद्रण शक्य झाले. मंजुल प्रकाशनचे श्री. सुनील अंबिके यांनी प्रकाशनाची जबाबदारी हमीदबद्दलच्या आपलेपणाने उचलली. हमीदने ‘इंधन’ नावाची एक कादंबरीही लिहिली आहे आणि तीही प्रक्षोभक ठरली आहे. हिंदीत त्या कादंबरीचा अनुवाद प्रकाशित झाला आहे.
हमीदच्या वैचारिक साहित्याचे आखात ललित साहित्यात शिरले आहे आणि त्याच्या ललित साहित्याचे भूशीर त्याच्या वैचारिक साहित्यात घुसले आहे. वैचारिक साहित्यात जशी त्याची निर्भय सत्यनिष्ठा जाणवते, तशी त्याच्या ललित साहित्यातही आढळते. त्यामुळेच त्याच्या साहित्यात जी काय अभिसरणक्षमता झाली आहे ती आलेली आहे. जमातवादी मुस्लिमांच्या तीव्र प्रतिक्रिया त्याच्या दोन्ही प्रकारच्या साहित्याबद्दल झाल्याचे आढळते. ही त्याच्या साहित्य क्षेत्रातील कर्तृत्वाला मिळालेली अप्रत्यक्ष मान्यताच आहे. त्याच्या साहित्याची मुस्लिमांनाही उपेक्षा करून चालण्यासारखे नाही. एका अर्थाने हा वानवळा आहे. हमीदला आणखी आयुष्य लाभते तर मराठी ललित साहित्यावर त्याचा स्वतंत्र ठसा उमटू शकला असता एवढी ग्वाही द्यायला हे साहित्य पुरेसे आहे.
मराठी साहित्य आता कुंपणाबाहेर पडले आहे आणि त्यात व्यापकता आली आहे. अवघे मराठी जीवन आपल्या कवेत घेण्याची धडपड चाललेली दिसते. साहित्यावर जात-वंश-धर्म-भाषा किंवा यौन यांचे बंधन येते तेव्हा त्याची एकात्म समाज घडवण्याची शक्ती संपुष्टात आलेली असते. सर्व समाजघटकांच्या जीवनातील भावभावनांच्या धाग्यांनी साहित्याचे सणंग विणले गेले पाहिजे. हमीद दलवाईंचे साहित्ये हे या नव्या जाणिवेची चाहूल देणारे आहे. आपण मूढपणाने भाषा, लिपी, पोषाख, नावे यांची निरगाढ निष्कारणच जात-धर्माशी बांधली आहे आणि त्यातूनच दुरावा आणि परकेपण जोपासले गेले आहे. ही निरगाठ सुटली म्हणजे साहित्याला अनेक अंगांनी बहर येईल.
‘लाट’ हे हमीदचे पुस्तक दिशादर्शक आहे. प्रादेशिक भाषांचा स्वीकार जातिधर्म निरपेक्षपणे केला जाईल तेव्हा त्या त्या भाषांच्या साहित्यात समाजाच्या सर्व घटकांचे प्रतिबिंब पडलेले दिसेल आणि त्याने ते साहित्य समृद्ध होईल. जातिधर्माच्या बेड्या तोडण्याच्या कामी हमीदने मोठा कर्तबगारी दाखवली व एक नवी वाट वहिवाटली म्हणून त्याच्या पुस्तकाचे महत्त्व.
***
‘लाट’च्या पहिल्या दोन आवृत्त्या पुण्यातल्या मंजुळ प्रकाशनाने काढल्या होत्या.
हमीद दलवाई मराठीतून साहित्य-लेखन करू लागले, तेव्हा त्यांची फारशी दखल मराठी मुसलमानांना घ्यावीशी वाटली नाही. इतर लेखकांप्रमाणेच त्यांचे लेखन असणार अशी त्यांची समजूत होती. पण हमीदने जेव्हा स्वतः पाहिलेल्या, अनुभवलेल्या मुसलमानांच्या जीवनावर लिहायला सुरुवात केली तेव्हा ते काहीसे बेचैन झाले.
वैचारिक आणि ललित असा भेद करण्याची आपल्याकडे प्रथा पडली आहे. त्यांच्यात दुर्लभ असा भेद आहे अशी समजूत. महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ ठाकूर यांचे साहित्य वाचले की, हा भेद किती वरवरचा आणि नकली आहे ते ध्यानी येते. महात्मा गांधींच्या वैचारिक लिखाणात केवढे तरी लालित्य आढळते आणि रवींद्रांच्या ललित म्हणवल्या जाणाऱ्या लेखनात केवढी विलक्षण विचारवत्ता प्रकट झाली आहे, ते पाहून मन चकित होते. हमीदने वैचारिक लिखाण केले तसे ललित लेखनही केले आणि ते दोन्ही प्रवाह सरमिसळ झालेले आढळतील.
हमीदच्या वैचारिक साहित्याचे वेगळेपण त्याच्या वास्तवाच्या सम्यक आकलनात आणि निर्भय मांडणीत दिसून येते. तीच गोष्ट त्याचे ललित साहित्य वाचतानाही जाणवते. त्याचे मानवी भावजीवनाचे आकलन सम्यक वास्तवावर आधारलेले आहे. तो मुस्लिम समाजात वावरला, वाढला. त्या जीवनातील विविध रसधारा त्याने पाहिल्या, चाखल्या. इतर मुस्लिम लेखकांप्रमाणे आपला समाज वगळून त्याने फारसे लिहिले नाही. त्याच्या काव्यात्म सत्याच्या मुळाशी वास्तव सत्य ठाम उभे असते. त्याने माणसे बेचैन, प्रक्षुब्ध झाली तरी ते वास्तव सत्य नाकारणे कोणालाच शक्य नसते.
‘लाट’ हा हमीदच्या कथांचा संग्रह. त्याच्या गाजलेल्या कथांचा या संग्रहात अंतर्भाव केलेला आहे. साधना प्रकाशनाने पानशेतफुटीच्या आधी हा संग्रह प्रकाशित केला आणि दुर्दैवाने त्याच्या प्रती मोठ्या प्रमाणावर वितरित होण्याआधीच तो पाणलोटाचे भक्ष्य झाला. त्यानंतर त्याची एखादी प्रत मिळणेही अवघड झाले. शेवटी मेहरुन्निसा दलवाई यांनी मोठ्या कष्टाने एक प्रत मिळविली व त्यामुळे हे पुनर्मुद्रण शक्य झाले. मंजुल प्रकाशनचे श्री. सुनील अंबिके यांनी प्रकाशनाची जबाबदारी हमीदबद्दलच्या आपलेपणाने उचलली. हमीदने ‘इंधन’ नावाची एक कादंबरीही लिहिली आहे आणि तीही प्रक्षोभक ठरली आहे. हिंदीत त्या कादंबरीचा अनुवाद प्रकाशित झाला आहे.
हमीदच्या वैचारिक साहित्याचे आखात ललित साहित्यात शिरले आहे आणि त्याच्या ललित साहित्याचे भूशीर त्याच्या वैचारिक साहित्यात घुसले आहे. वैचारिक साहित्यात जशी त्याची निर्भय सत्यनिष्ठा जाणवते, तशी त्याच्या ललित साहित्यातही आढळते. त्यामुळेच त्याच्या साहित्यात जी काय अभिसरणक्षमता झाली आहे ती आलेली आहे. जमातवादी मुस्लिमांच्या तीव्र प्रतिक्रिया त्याच्या दोन्ही प्रकारच्या साहित्याबद्दल झाल्याचे आढळते. ही त्याच्या साहित्य क्षेत्रातील कर्तृत्वाला मिळालेली अप्रत्यक्ष मान्यताच आहे. त्याच्या साहित्याची मुस्लिमांनाही उपेक्षा करून चालण्यासारखे नाही. एका अर्थाने हा वानवळा आहे. हमीदला आणखी आयुष्य लाभते तर मराठी ललित साहित्यावर त्याचा स्वतंत्र ठसा उमटू शकला असता एवढी ग्वाही द्यायला हे साहित्य पुरेसे आहे.
मराठी साहित्य आता कुंपणाबाहेर पडले आहे आणि त्यात व्यापकता आली आहे. अवघे मराठी जीवन आपल्या कवेत घेण्याची धडपड चाललेली दिसते. साहित्यावर जात-वंश-धर्म-भाषा किंवा यौन यांचे बंधन येते तेव्हा त्याची एकात्म समाज घडवण्याची शक्ती संपुष्टात आलेली असते. सर्व समाजघटकांच्या जीवनातील भावभावनांच्या धाग्यांनी साहित्याचे सणंग विणले गेले पाहिजे. हमीद दलवाईंचे साहित्ये हे या नव्या जाणिवेची चाहूल देणारे आहे. आपण मूढपणाने भाषा, लिपी, पोषाख, नावे यांची निरगाढ निष्कारणच जात-धर्माशी बांधली आहे आणि त्यातूनच दुरावा आणि परकेपण जोपासले गेले आहे. ही निरगाठ सुटली म्हणजे साहित्याला अनेक अंगांनी बहर येईल.
‘लाट’ हे हमीदचे पुस्तक दिशादर्शक आहे. प्रादेशिक भाषांचा स्वीकार जातिधर्म निरपेक्षपणे केला जाईल तेव्हा त्या त्या भाषांच्या साहित्यात समाजाच्या सर्व घटकांचे प्रतिबिंब पडलेले दिसेल आणि त्याने ते साहित्य समृद्ध होईल. जातिधर्माच्या बेड्या तोडण्याच्या कामी हमीदने मोठा कर्तबगारी दाखवली व एक नवी वाट वहिवाटली म्हणून त्याच्या पुस्तकाचे महत्त्व.
***
‘लाट’च्या पहिल्या दोन आवृत्त्या पुण्यातल्या मंजुळ प्रकाशनाने काढल्या होत्या.
Tuesday, February 7, 2012
हमीद दलवाईंविषयी सदानंद रेगे
लेखक-कवी सदानंद रेगे (१९२३-१९८२) हे हमीद दलवाईंचे जवळचे मित्र. रेग्यांसंबंधी ‘अक्षरगंधर्व’ नावाचं एक पुस्तक ‘पॉप्युलर प्रकाशना’ने काढलं. प्र. श्री. नेरूरकरांनी रेग्यांची घेतलेली एक मोठी मुलाखत या पुस्तकात आहे. या खेळीमेळीतल्या संवादासारख्या रूपातल्या मुलाखतीवेळी शरद मंत्रीसुद्धा आहेत. ह्या मुलाखती थोड्या भागात दलवाईंबद्दल बोलणं झालंय. तो भाग ह्या ब्लॉगमध्ये बसणारा आणि दलवाईंबद्दल काही गोष्टी उलगडणारा असल्यामुळे इथे देतो आहे-
रेगे – हमीद हा मला ‘सत्यकथे’च्या ऑफिसमध्ये भेटायचा. तिथे ओळख झाली. त्यावेळेला त्याचे दिवस अतिशय वाईट होते. कुठे नोकरी नव्हती. काम नव्हतं. योगायोगाने तोही रेल्वेत आमच्याबरोबर नोकरीला लागला. स्टोअर्स डिपार्टमेंटमध्ये नोकरीला लागला...
नेरूरकर- त्या दिवशी तू, मी व हमीद एकत्र होतो... (सदानंद रेगेची आई निवर्तली त्या दिवशी)
रेगे- नेहमी यायचा ना तो माझ्याकडे...
नेरूरकर- किती वर्षे त्याने नोकरी केली?
रेगे- वर्षभर असेल... त्या नोकरीत तो रमत नसे. पण काही इलाजच नव्हता. नुक्तं मला वाटतं त्याने लग्न केलं. ती बातमीसुद्ध मला माहिती नव्हती. तसा तो यायचा माझ्याकडे... रेल्वेच्या ऑफिसमध्ये. तो लघुकथा लिहित असे. मीही लिहीत असे. पुढे त्याची माझी दोस्ती जमत गेली... त्याचा पहिला लघुकथासंग्रह मीच एडिट केला आहे.
नेरूरकर- खरं का?
रेगे- मला विचारून विचारून त्याने कथा संग्रहात घातल्या. मला तो मानतही असे. त्याच्याजवळ छक्केपंजे नव्हते. म्हणजे त्याचं माझं जमायचं म्हटलं ना. छक्केपंजे नव्हते. काय असेल ते खुल्लमखुल्ला. याला शिव्या दे. त्याला शिव्या दे. पुढे ‘मराठा’मध्ये त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्याने हिंदुमुस्लीम प्रश्नावर लेख लिहिले... अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंनी त्याला बोलावून घेतला. मग पाकिस्तानवर लिहिण्याचा विषय आला. तेव्हा तो म्हणाला, मला तो देश बघावा लागेल. पण माझ्याजवळ पैसे कुठे आहेत? मग अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांनी त्याची सगळी व्यवस्था केली. तो पाकिस्तानात जाऊन आला आणि मग राजकारणात ओढला गेला. पण इतका मोठा झाल्यानंतरसुद्धा नंतर त्याची माझी भेट नव्हती.
... कित्येक वर्षे त्याची माझी बेट नव्हती. सगळं प्रकरण चालू असेपर्यंत अधूनमधून कुठे भेटला तर भेटायचा. पुढे त्याचं ते किडनीचं प्रकरण सुरू झालं. पहिल्यांदा त्याला अल्सर झालाय म्हणून कित्येक वर्षे ट्रीटमेंट त्याला त्याच्या फॅमिली डॉक्टरने दिली. आणि एके दिवशी त्याला तो किडनी ट्रबल आहे असं ठरलं. त्याला भाटिया हॉस्पिटलात नेला. तर तो भाटिया हॉस्पिटलात असतानासुद्धा शेवटी मग मी काही जाऊ शकलो नाही. एक दिवस गेलो तिथे. तर तो अत्यवस्थच होता. त्याची किडनी काढून टाकायची की नाही असा विचार चालू होता. असं ते प्रकरण चालू होतं त्यावेळेला.
मंत्री- त्यावेळी मला आठवतंय... त्याची बायकोसुद्धा म्हणाली, तुम्ही येत जा हो. कारण तुमच्याकडेच आलं की ते बोलतात... तुम्ही रोज येत जा.
नेरूरकर- सदूला म्हणाली?
मंत्री- हो.
रेगे- तर... नंतरही मी गेलो नाही. कारण मी फोर्टमध्ये असायचो. बसबिस मिळायची नाही. मग ते राहात गेलं ते राहात गेलं आणि जसलोकमध्ये तो गेला आणि त्याची ती किडनीबिडनी बसवायची ते सगळं चालू होतं. तरीसुद्धा मी गेलो नाही त्याला बघायला. एक दिवस कसा कसा गेलो... आणि त्याचं ते सगळे प्रकरण... दारूवाल्याची किडनी बसवणं... गाजलं होतं ते सगळं प्रकरण.
... तरीसुद्धा मी त्याला भेटायला गेलो नाही. आणि एक दिवस असा मी लायब्ररीत (डेव्हिड ससून लायब्ररीत) बसलो होतो... फोर्टमध्ये ती जागा... जिथे आम्ही दारू प्यायला बसत होतो... तिथले मालक म्हणाले, ‘दलवाई येऊन गेले’. मी विचारलं, ‘तुम्ही बरोबर ओळखलं होतं का?’ ‘दलवाईंना काय मी ओळखत नाही!’ ते म्हणाले, ‘आले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला उद्या लायब्ररीत भेटतो म्हणून सांगितलंय.’ दुसऱ्या दिवशी मी वाट बघत बसलो. तो लायब्ररीमध्ये आला. म्हणाला, ‘मला डिसचार्ज दिलाय. किडनी बसवलीय. आता माझं व्यवस्थित आहे’ आणि मग मी शेवटी त्याला बघितल्यावर मी त्याच्या पायावरच पडलो. अगदी म्हटलं, ‘पहिल्यांदा तू पायातला जोडा काढ आणि माझ्या थोबाडीत मार. मला लाज वाटायला पाहिजे होती की तू इतका सिरियस आजारी असताना तुला बघायलासुद्धा मी येऊ शकलो नाही किंवा मला इच्छा झाली नाही. अगदी जन्माचा पश्चाताप होतोय.’ ‘अ, जाऊ दे’, म्हणाला. काय सगळं असंच असतं. अशा तऱ्हेने त्याने ते नेलं. आणि त्याच्यानंतर रोज तो मला भेटायला लागला. लायब्ररीत येऊन बसायचा. त्याचे सगळे लोक तिथेच त्याला भेटायला यायचे. त्याची माझी फार मग शेवटच्या दिवसापर्यंत फार जवळीक आली.
त्याचे प्रश्न, त्याच्या समस्या, आम्ही तासन् तास चर्चा करीत असू..
नेरूरकर- प्रश्न म्हणजे काय?
रेगे- राजकारण, सत्यशोधक समाज..
नेरूरकर- मुस्लीम सत्यशोधक समाज?.. त्यात तू काय केलीस त्याला मदत?
रेगे- नाही. तो चर्चा वगैरे करायचा.
रेगे – हमीद हा मला ‘सत्यकथे’च्या ऑफिसमध्ये भेटायचा. तिथे ओळख झाली. त्यावेळेला त्याचे दिवस अतिशय वाईट होते. कुठे नोकरी नव्हती. काम नव्हतं. योगायोगाने तोही रेल्वेत आमच्याबरोबर नोकरीला लागला. स्टोअर्स डिपार्टमेंटमध्ये नोकरीला लागला...
नेरूरकर- त्या दिवशी तू, मी व हमीद एकत्र होतो... (सदानंद रेगेची आई निवर्तली त्या दिवशी)
रेगे- नेहमी यायचा ना तो माझ्याकडे...
नेरूरकर- किती वर्षे त्याने नोकरी केली?
रेगे- वर्षभर असेल... त्या नोकरीत तो रमत नसे. पण काही इलाजच नव्हता. नुक्तं मला वाटतं त्याने लग्न केलं. ती बातमीसुद्ध मला माहिती नव्हती. तसा तो यायचा माझ्याकडे... रेल्वेच्या ऑफिसमध्ये. तो लघुकथा लिहित असे. मीही लिहीत असे. पुढे त्याची माझी दोस्ती जमत गेली... त्याचा पहिला लघुकथासंग्रह मीच एडिट केला आहे.
नेरूरकर- खरं का?
रेगे- मला विचारून विचारून त्याने कथा संग्रहात घातल्या. मला तो मानतही असे. त्याच्याजवळ छक्केपंजे नव्हते. म्हणजे त्याचं माझं जमायचं म्हटलं ना. छक्केपंजे नव्हते. काय असेल ते खुल्लमखुल्ला. याला शिव्या दे. त्याला शिव्या दे. पुढे ‘मराठा’मध्ये त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्याने हिंदुमुस्लीम प्रश्नावर लेख लिहिले... अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंनी त्याला बोलावून घेतला. मग पाकिस्तानवर लिहिण्याचा विषय आला. तेव्हा तो म्हणाला, मला तो देश बघावा लागेल. पण माझ्याजवळ पैसे कुठे आहेत? मग अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांनी त्याची सगळी व्यवस्था केली. तो पाकिस्तानात जाऊन आला आणि मग राजकारणात ओढला गेला. पण इतका मोठा झाल्यानंतरसुद्धा नंतर त्याची माझी भेट नव्हती.
... कित्येक वर्षे त्याची माझी बेट नव्हती. सगळं प्रकरण चालू असेपर्यंत अधूनमधून कुठे भेटला तर भेटायचा. पुढे त्याचं ते किडनीचं प्रकरण सुरू झालं. पहिल्यांदा त्याला अल्सर झालाय म्हणून कित्येक वर्षे ट्रीटमेंट त्याला त्याच्या फॅमिली डॉक्टरने दिली. आणि एके दिवशी त्याला तो किडनी ट्रबल आहे असं ठरलं. त्याला भाटिया हॉस्पिटलात नेला. तर तो भाटिया हॉस्पिटलात असतानासुद्धा शेवटी मग मी काही जाऊ शकलो नाही. एक दिवस गेलो तिथे. तर तो अत्यवस्थच होता. त्याची किडनी काढून टाकायची की नाही असा विचार चालू होता. असं ते प्रकरण चालू होतं त्यावेळेला.
मंत्री- त्यावेळी मला आठवतंय... त्याची बायकोसुद्धा म्हणाली, तुम्ही येत जा हो. कारण तुमच्याकडेच आलं की ते बोलतात... तुम्ही रोज येत जा.
नेरूरकर- सदूला म्हणाली?
मंत्री- हो.
रेगे- तर... नंतरही मी गेलो नाही. कारण मी फोर्टमध्ये असायचो. बसबिस मिळायची नाही. मग ते राहात गेलं ते राहात गेलं आणि जसलोकमध्ये तो गेला आणि त्याची ती किडनीबिडनी बसवायची ते सगळं चालू होतं. तरीसुद्धा मी गेलो नाही त्याला बघायला. एक दिवस कसा कसा गेलो... आणि त्याचं ते सगळे प्रकरण... दारूवाल्याची किडनी बसवणं... गाजलं होतं ते सगळं प्रकरण.
... तरीसुद्धा मी त्याला भेटायला गेलो नाही. आणि एक दिवस असा मी लायब्ररीत (डेव्हिड ससून लायब्ररीत) बसलो होतो... फोर्टमध्ये ती जागा... जिथे आम्ही दारू प्यायला बसत होतो... तिथले मालक म्हणाले, ‘दलवाई येऊन गेले’. मी विचारलं, ‘तुम्ही बरोबर ओळखलं होतं का?’ ‘दलवाईंना काय मी ओळखत नाही!’ ते म्हणाले, ‘आले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला उद्या लायब्ररीत भेटतो म्हणून सांगितलंय.’ दुसऱ्या दिवशी मी वाट बघत बसलो. तो लायब्ररीमध्ये आला. म्हणाला, ‘मला डिसचार्ज दिलाय. किडनी बसवलीय. आता माझं व्यवस्थित आहे’ आणि मग मी शेवटी त्याला बघितल्यावर मी त्याच्या पायावरच पडलो. अगदी म्हटलं, ‘पहिल्यांदा तू पायातला जोडा काढ आणि माझ्या थोबाडीत मार. मला लाज वाटायला पाहिजे होती की तू इतका सिरियस आजारी असताना तुला बघायलासुद्धा मी येऊ शकलो नाही किंवा मला इच्छा झाली नाही. अगदी जन्माचा पश्चाताप होतोय.’ ‘अ, जाऊ दे’, म्हणाला. काय सगळं असंच असतं. अशा तऱ्हेने त्याने ते नेलं. आणि त्याच्यानंतर रोज तो मला भेटायला लागला. लायब्ररीत येऊन बसायचा. त्याचे सगळे लोक तिथेच त्याला भेटायला यायचे. त्याची माझी फार मग शेवटच्या दिवसापर्यंत फार जवळीक आली.
त्याचे प्रश्न, त्याच्या समस्या, आम्ही तासन् तास चर्चा करीत असू..
नेरूरकर- प्रश्न म्हणजे काय?
रेगे- राजकारण, सत्यशोधक समाज..
नेरूरकर- मुस्लीम सत्यशोधक समाज?.. त्यात तू काय केलीस त्याला मदत?
रेगे- नाही. तो चर्चा वगैरे करायचा.
Wednesday, February 1, 2012
'लाट'विषयी
'लाट' ह्या दलवाईंच्या कथासंग्रहाच्या तिसऱ्या आवृत्तीचं 'लोकसत्ता'च्या 'लोकरंग' पुरवणीत 'दखल' सदरात २० एप्रिल २००३ रोजी छापून आलेलं परिक्षण, केवळ संदर्भासाठी इथे -
पुरोगामी ललित लेखन
हमीद दलवाई हे नाव पुरोगामी वैचारिक साहित्याशी निगडित आहे. पुरोगामी मुस्लीम सामाजिक चळवळींचे अध्वर्यू असणारे हमीद दलवाई यांचा ललित साहित्याच्या संदर्भात फारसा विचार होत नाही. वैचारिकता आणि लालित्य यांची एकमेकांपासून फारकतच असते, या गैरसमजुतीमधून हे होत असावे. हमीद दलवाई यांचे जे मोजकेच ललित लेखन आहे त्यातील 'लाट' या कथासंग्रहाची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली असून कसदार साहित्यनिर्मितीची सारी मूल्ये त्यात अनुभवास येतात.
लेखकाची वैचारिक भूमिका त्याच्या ललित लेखनातूनही जाणवतेच. जातिधर्माचे अडसर दूर सारू पाहणाऱ्या दलवाई यांनी धर्मनिरपेक्षपणे पात्रांच्या तोंडी प्रादेशिक भाषेचा वापर करवून सर्वधर्मसमभावाचाच पुरस्कार केला आहे. केवळ भाषाच नव्हे, तर रितिरिवाज, सामाजिक व सांस्कृतिक चालिरिती त्या विशिष्ट प्रदेशातील लोकांधमल्या धर्माच्या भेदालाही क्षीण करतात, याचा या कथा उत्तम पुरावा आहेत. दलवाईंसारख्या कार्यकर्त्या माणसाला हे जाणवावं, याचं मोल निश्चितच अधिक आहे. चाळीस वर्षांपूर्वीच्या समाजकारणात आजही बदल झालेला नाही. किंबहुना ते अधिकच बिघ़डले आहे. म्हणूनच ४० वर्षांपूर्वीच्या कथांना आजही वैचारिक मोल आहे.
'माणूस आणि गाढव' नावाची कथा कोण्या मुसलमानाची नव्हे तर कोकणी मनोवृत्तीचीच कथा सांगते. 'बेकार माणसाची गोष्ट'मध्ये एका भणंग कलावंताची चटका लावणारी कथा दलवाईंनी अप्रतिमपणे सांगितली आहे. 'पैसा असतो, त्या दिवशी मी थोडा दुःखी असतो', या पहिल्याच वाक्यानं काही वेगळं वाचायला मिळणार याची कल्पना येते. कलावंतपणाची कदर नसणाऱ्या व्यवहारी जगात कलावंताची होणारी होरपळ अत्यंत संयतपणे दलवाईंनी चित्रित केली आहे. 'मी लाचारीला, पर्यायानं सभ्यतेला चिकटून राहण्याचा निर्णय घेतो', अशा पद्धतीने दलवाई कथानायकावरच नव्हे तर आजच्या षंढ पांढरपेशेपणावरच बोट ठेवतात. 'छप्पर'सारखी कथा खास कार्यकर्त्या लेखकाने लिहिलेली गोष्ट आहे. दारिद्र्य आणि अज्ञान यांचं भय तळागाळात काम करणाऱ्याला जेवढं जाणवेल, त्याहून अधिक कोणाला जाणवू शकेल? 'कळ'ने तर गरीब-श्रीमंत, हिंदू-मुस्लीम, स्त्री-पुरुष साऱ्याच रेषा मिटवून टाकल्या आहेत. काळानुरूप नव्या संदर्भासह स्पष्टीकरण देऊ करणारे ते सकस साहित्य, अशी व्याख्या मांडली तर दलवाईंचे 'लाट' त्या व्याख्येला पुरेपूर उतरले आहे.
***
'लाट' - हमीद दलवाई, पहिली आवृत्ती १९६०, दुसरी आवृत्ती १९९०, तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशक मौज प्रकाशन गृह, मुंबई. पृष्ठे- १०९, मूल्य- १०० रुपये.
पुरोगामी ललित लेखन
हमीद दलवाई हे नाव पुरोगामी वैचारिक साहित्याशी निगडित आहे. पुरोगामी मुस्लीम सामाजिक चळवळींचे अध्वर्यू असणारे हमीद दलवाई यांचा ललित साहित्याच्या संदर्भात फारसा विचार होत नाही. वैचारिकता आणि लालित्य यांची एकमेकांपासून फारकतच असते, या गैरसमजुतीमधून हे होत असावे. हमीद दलवाई यांचे जे मोजकेच ललित लेखन आहे त्यातील 'लाट' या कथासंग्रहाची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली असून कसदार साहित्यनिर्मितीची सारी मूल्ये त्यात अनुभवास येतात.
लेखकाची वैचारिक भूमिका त्याच्या ललित लेखनातूनही जाणवतेच. जातिधर्माचे अडसर दूर सारू पाहणाऱ्या दलवाई यांनी धर्मनिरपेक्षपणे पात्रांच्या तोंडी प्रादेशिक भाषेचा वापर करवून सर्वधर्मसमभावाचाच पुरस्कार केला आहे. केवळ भाषाच नव्हे, तर रितिरिवाज, सामाजिक व सांस्कृतिक चालिरिती त्या विशिष्ट प्रदेशातील लोकांधमल्या धर्माच्या भेदालाही क्षीण करतात, याचा या कथा उत्तम पुरावा आहेत. दलवाईंसारख्या कार्यकर्त्या माणसाला हे जाणवावं, याचं मोल निश्चितच अधिक आहे. चाळीस वर्षांपूर्वीच्या समाजकारणात आजही बदल झालेला नाही. किंबहुना ते अधिकच बिघ़डले आहे. म्हणूनच ४० वर्षांपूर्वीच्या कथांना आजही वैचारिक मोल आहे.
'माणूस आणि गाढव' नावाची कथा कोण्या मुसलमानाची नव्हे तर कोकणी मनोवृत्तीचीच कथा सांगते. 'बेकार माणसाची गोष्ट'मध्ये एका भणंग कलावंताची चटका लावणारी कथा दलवाईंनी अप्रतिमपणे सांगितली आहे. 'पैसा असतो, त्या दिवशी मी थोडा दुःखी असतो', या पहिल्याच वाक्यानं काही वेगळं वाचायला मिळणार याची कल्पना येते. कलावंतपणाची कदर नसणाऱ्या व्यवहारी जगात कलावंताची होणारी होरपळ अत्यंत संयतपणे दलवाईंनी चित्रित केली आहे. 'मी लाचारीला, पर्यायानं सभ्यतेला चिकटून राहण्याचा निर्णय घेतो', अशा पद्धतीने दलवाई कथानायकावरच नव्हे तर आजच्या षंढ पांढरपेशेपणावरच बोट ठेवतात. 'छप्पर'सारखी कथा खास कार्यकर्त्या लेखकाने लिहिलेली गोष्ट आहे. दारिद्र्य आणि अज्ञान यांचं भय तळागाळात काम करणाऱ्याला जेवढं जाणवेल, त्याहून अधिक कोणाला जाणवू शकेल? 'कळ'ने तर गरीब-श्रीमंत, हिंदू-मुस्लीम, स्त्री-पुरुष साऱ्याच रेषा मिटवून टाकल्या आहेत. काळानुरूप नव्या संदर्भासह स्पष्टीकरण देऊ करणारे ते सकस साहित्य, अशी व्याख्या मांडली तर दलवाईंचे 'लाट' त्या व्याख्येला पुरेपूर उतरले आहे.
***
'लाट' - हमीद दलवाई, पहिली आवृत्ती १९६०, दुसरी आवृत्ती १९९०, तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशक मौज प्रकाशन गृह, मुंबई. पृष्ठे- १०९, मूल्य- १०० रुपये.
'राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान'विषयी
दलवाईंच्या 'राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान' या 'साधना प्रकाशना'ने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे 'लोकसत्ता'मध्ये ५ जानेवारी २००३ रोजी प्रसिद्ध झालेलं परिक्षण-
मूळ पुस्तकाविषयी काही एक अंदाज यावा एवढाच हेतू हे परिक्षण ह्या ब्लॉगवर नोंदविण्यामागे आहे. बाकी सर्व श्रेय संबंधित लेखक व वृत्तपत्राकडे
***
आत्मटीकात्मक लेख
- एकनाथ साखळकर
ख्रिश्चन तसेच हिंदू धर्मीयांप्रमाणे मुस्लिम धर्मीयांतही आत्मटीकेच्या मार्गाने प्रबोधनाचे प्रवाह निर्माण व्हावेत यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये हमीद दलवाई यांचे नाव अग्रभागी आहे. प्रबोधनाच्या मार्गाने मुस्लिम समाजात विचारपरिवर्तन सुरु व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पैगंबरसाहेबांच्या कतरृत्वाबद्दल त्यांना आदर होता, परंतु पैगंबरसाहेबांचे जीवन, तसेच कुराण-हदीस यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लिम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लिम समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरु व्हावेत यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. त्यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. त्यांच्या शेवटच्या आजारातही ते स्वस्थ राहिले नाहीत. त्या दिवसातही त्यांनी केलेले लेखन साधना प्रकाशनाने संपादित करुन 'राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान' या नावाने प्रकाशित केले आहे. हे लेखन प्रामुख्याने भारतीय उपखंडातील मुसल-मानांच्या धार्मिक प्रवृत्ती, राजकारण, त्यांचे राजकीय नेतृत्व, पाकिस्तानची चळवळ आणि उद्दिष्टे, हिंदुत्ववाद या विषयांवर आहे. त्यातील तपशील, तपशिलामागील अर्थ, उद्याच्या भारतासाठी बदलाची गरज यासंबंधीचे विवेचन वाचल्यानंतर दलवाई यांच्या प्रबोधनविषयक दृष्टीची कल्पना यावी. समाजप्रबोधनाचे कार्य करणार्या कोणाही द्रष्ट्या नेत्याला होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त विरोध त्यांना झाला.
''भारतीय इस्लामचे स्वरुप, भारतात इस्लामचे आगमन ज्या प्रकारे झाले... त्या संदर्भात समजून घेतले पाहिजे. इस्लामचे आगमन हिंसक पद्धतीने झाले... मुसलमान जेथे जेथे विजेते म्हणून गेले तेथील बहुसंख्य किंवा सगळीच्या सगळी प्रजा कालांतराने मुसलमान बनली.'' इस्लाम धर्माच्या स्थापनेच्या इतिहासामुळे अन्य काही होणे नव्हते. ''प्रेषित महमद हे इस्लामचे केवळ धर्मसंस्थापक नसून राज्य-संस्थापकही आहेत. मदिनेतही त्यांनी धर्म-प्रसाराचेच कार्य केले नाही, तर त्यांनी राज्यही स्थापन केले.'' असा इतिहास सांगत दलवाईंनी भारतातील मुसलमानांच्या तसेच त्यांच्या धार्मिक, राजकीय नेत्यांच्या दृष्टीसंबंधी विवेचन केले आहे.
मुसलमानांच्या धार्मिक चळवळीच्या संदर्भातही त्यांनी मतप्रदर्शन केले आहे. ''अरबस्तानात बिगरमुसलमान नसल्याने तेथील चळवळींचे स्वरुप समाजांतर्गत राहिले.'' भारतात मात्र ''येथील राज्यसत्ता आणि बहुसंख्याक हिंदू समाज यांच्या-विरोधी पवित्रा चळवळीने घेतला.'' येथे स्वातंत्र्यासाठीची चळवळ जेव्हा जोर घेऊ लागली तेव्हाही मुसलमानांचे हेच स्वरुप पुढे आले. १९३७ च्या निवडणुकीत एकूण मुस्लिम मतांपैकी केवळ ४.४ टकके मते मुस्लिम लीगला मिळाली. ते कोठेही सत्तेत येणे शकयच नव्हते. तरीही नेहरुंनी त्यांना सत्तेत सहभागी करुन न घेतल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला, अशी ओरड त्यांनी केली. दलवाईंच्या मते ''लीगची भूमिका न्याय्य होती, आसे फक्त मुसलमानच मानतात आणि आपली कुठलीही मागणी न्याय्यच असते, असे मानण्याच्या त्यांच्या परंपरेला हे धरुनच आहे.'' त्यानंतर ''जीनांनी कॉंग्रेसविरुद्ध गलिच्छ जातीय प्रचाराला सुरुवात केली.'' पुढे ''नाइलाजाने छोट्या आकाराचे पाकिस्तान स्वीकारल्यानंतर वरकरणी जीनांनी मित्र म्हणून आपण वेगळे होत आहोत,'' असे निवेदन केले. त्याचबरोबर ''मोठया पाकिस्तानच्या निर्मितीसाठी भारताशी संघर्ष कायम ठेवण्याच्या तयारीला ते लागले.'' 'भारत-पाक संबंध' तसेच 'पाकिस्तानची उद्दिष्टे' या दोन लेखांत पाकिस्तानने जीनांचे धोरण कसे चालू ठेवले आहे, याचे विवेचन आहे. ''वरवर भारताबरोबर मैत्रीचे संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त करणारी निवेदने करायची.. आणि सन्माननीय पातळीवर भारत तडजोड करायला तयार नाही म्हणून वाद पुढे चालू आहे असे भासवायचे हे पाकिस्तानी राजनीतीचे प्रमुख सूत्र होते व आहे.'' हे सांगून दलवाई म्हणतात की, ''हे वर्तन 'हिटलरचे वर्तन आणि सदिच्छेची निवेदने' यासारखे आहे.''
मुस्लिम समाजात प्रबोधनपर्व सुरु झाल्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य सुकर होणार नाही अशी दलवाईंची खात्री होती. ख्रिश्चन समाजातील मार्टिन ल्युथरच्या सुधारणांमुळे आणि झंझावती प्रबोधनयुगामुळे युरोपीय समाज आमूलाग्र बदलला आणि तेथे आधुनिकतेचे मोकळे वारे वाहू लागले. भारतातील हिंदू समाजातही तेराव्या शतकात बहुजनवादी संतपरंपरा निर्माण झाली आणि समाज बदलला. मुस्लिम समाजाने मात्र प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला नाही. दलवाईंच्या मते मुस्लिम समाजाने स्वत्व टिकवून व आपल्यात प्रबोधन घडवून राष्ट्रीय ऐक्याची कास धरण्याची गरज आहे. ते अवघड आहे हे त्यांना माहीत होते. मुस्लिम मन कुराण, हदीस, पैगंबराचे जीवन व इस्लामिक परंपरा यांच्या आधारेच बनते. या शब्दप्रामाण्याच्या व धर्मांधतेच्या विळख्यातून मुस्लिम मन मुक्त करण्याचा त्यांनी निकराचा प्रयत्न केला. मुस्लिम समाज उदारमतवादी व धर्मनिरपेक्ष मुस्लिम नेत्यांकडे ढुंकूनही पाहत नाही, मुस्लिम समाजात गांधींसारखी मानवतावादी व्यक्ती निर्माण झाली नाही याचेही दलवाईंना दु:ख आहे.
दलवाई निराशावादी नाहीत. ''एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जातीयवादी शक्तींचे संघटन होत नाही हे लक्षात आले की आपोआपच योग्य ते राजकीय प्रवाह मुस्लिम समाजात दिसू लागतील.'' आसे ते लिहितात. योग्य टीका करुन मुस्लिम मन बदलू शकते, याचा त्यांना विश्वास वाटतो. मुस्लिम मन कायम सनातन्यांच्या पकडीत बंदिस्त राहील असे त्यांना वाटत नाही.
पुस्तकामध्ये ज्या विषयांची चर्चा झाली आहे त्यात आता बराच फरक पडला आहे तरीही दलवाईंनी मांडलेले विचार मूलभूत स्वरुपाचे असल्याने ते आजही महत्त्वाचे वाटावेत. पुस्तकाला भाई वैद्यांची उत्कृष्ट प्रस्तावना आहे.
मूळ पुस्तकाविषयी काही एक अंदाज यावा एवढाच हेतू हे परिक्षण ह्या ब्लॉगवर नोंदविण्यामागे आहे. बाकी सर्व श्रेय संबंधित लेखक व वृत्तपत्राकडे
***
आत्मटीकात्मक लेख
- एकनाथ साखळकर
ख्रिश्चन तसेच हिंदू धर्मीयांप्रमाणे मुस्लिम धर्मीयांतही आत्मटीकेच्या मार्गाने प्रबोधनाचे प्रवाह निर्माण व्हावेत यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये हमीद दलवाई यांचे नाव अग्रभागी आहे. प्रबोधनाच्या मार्गाने मुस्लिम समाजात विचारपरिवर्तन सुरु व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पैगंबरसाहेबांच्या कतरृत्वाबद्दल त्यांना आदर होता, परंतु पैगंबरसाहेबांचे जीवन, तसेच कुराण-हदीस यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लिम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लिम समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरु व्हावेत यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. त्यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. त्यांच्या शेवटच्या आजारातही ते स्वस्थ राहिले नाहीत. त्या दिवसातही त्यांनी केलेले लेखन साधना प्रकाशनाने संपादित करुन 'राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान' या नावाने प्रकाशित केले आहे. हे लेखन प्रामुख्याने भारतीय उपखंडातील मुसल-मानांच्या धार्मिक प्रवृत्ती, राजकारण, त्यांचे राजकीय नेतृत्व, पाकिस्तानची चळवळ आणि उद्दिष्टे, हिंदुत्ववाद या विषयांवर आहे. त्यातील तपशील, तपशिलामागील अर्थ, उद्याच्या भारतासाठी बदलाची गरज यासंबंधीचे विवेचन वाचल्यानंतर दलवाई यांच्या प्रबोधनविषयक दृष्टीची कल्पना यावी. समाजप्रबोधनाचे कार्य करणार्या कोणाही द्रष्ट्या नेत्याला होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त विरोध त्यांना झाला.
''भारतीय इस्लामचे स्वरुप, भारतात इस्लामचे आगमन ज्या प्रकारे झाले... त्या संदर्भात समजून घेतले पाहिजे. इस्लामचे आगमन हिंसक पद्धतीने झाले... मुसलमान जेथे जेथे विजेते म्हणून गेले तेथील बहुसंख्य किंवा सगळीच्या सगळी प्रजा कालांतराने मुसलमान बनली.'' इस्लाम धर्माच्या स्थापनेच्या इतिहासामुळे अन्य काही होणे नव्हते. ''प्रेषित महमद हे इस्लामचे केवळ धर्मसंस्थापक नसून राज्य-संस्थापकही आहेत. मदिनेतही त्यांनी धर्म-प्रसाराचेच कार्य केले नाही, तर त्यांनी राज्यही स्थापन केले.'' असा इतिहास सांगत दलवाईंनी भारतातील मुसलमानांच्या तसेच त्यांच्या धार्मिक, राजकीय नेत्यांच्या दृष्टीसंबंधी विवेचन केले आहे.
मुसलमानांच्या धार्मिक चळवळीच्या संदर्भातही त्यांनी मतप्रदर्शन केले आहे. ''अरबस्तानात बिगरमुसलमान नसल्याने तेथील चळवळींचे स्वरुप समाजांतर्गत राहिले.'' भारतात मात्र ''येथील राज्यसत्ता आणि बहुसंख्याक हिंदू समाज यांच्या-विरोधी पवित्रा चळवळीने घेतला.'' येथे स्वातंत्र्यासाठीची चळवळ जेव्हा जोर घेऊ लागली तेव्हाही मुसलमानांचे हेच स्वरुप पुढे आले. १९३७ च्या निवडणुकीत एकूण मुस्लिम मतांपैकी केवळ ४.४ टकके मते मुस्लिम लीगला मिळाली. ते कोठेही सत्तेत येणे शकयच नव्हते. तरीही नेहरुंनी त्यांना सत्तेत सहभागी करुन न घेतल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला, अशी ओरड त्यांनी केली. दलवाईंच्या मते ''लीगची भूमिका न्याय्य होती, आसे फक्त मुसलमानच मानतात आणि आपली कुठलीही मागणी न्याय्यच असते, असे मानण्याच्या त्यांच्या परंपरेला हे धरुनच आहे.'' त्यानंतर ''जीनांनी कॉंग्रेसविरुद्ध गलिच्छ जातीय प्रचाराला सुरुवात केली.'' पुढे ''नाइलाजाने छोट्या आकाराचे पाकिस्तान स्वीकारल्यानंतर वरकरणी जीनांनी मित्र म्हणून आपण वेगळे होत आहोत,'' असे निवेदन केले. त्याचबरोबर ''मोठया पाकिस्तानच्या निर्मितीसाठी भारताशी संघर्ष कायम ठेवण्याच्या तयारीला ते लागले.'' 'भारत-पाक संबंध' तसेच 'पाकिस्तानची उद्दिष्टे' या दोन लेखांत पाकिस्तानने जीनांचे धोरण कसे चालू ठेवले आहे, याचे विवेचन आहे. ''वरवर भारताबरोबर मैत्रीचे संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त करणारी निवेदने करायची.. आणि सन्माननीय पातळीवर भारत तडजोड करायला तयार नाही म्हणून वाद पुढे चालू आहे असे भासवायचे हे पाकिस्तानी राजनीतीचे प्रमुख सूत्र होते व आहे.'' हे सांगून दलवाई म्हणतात की, ''हे वर्तन 'हिटलरचे वर्तन आणि सदिच्छेची निवेदने' यासारखे आहे.''
मुस्लिम समाजात प्रबोधनपर्व सुरु झाल्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य सुकर होणार नाही अशी दलवाईंची खात्री होती. ख्रिश्चन समाजातील मार्टिन ल्युथरच्या सुधारणांमुळे आणि झंझावती प्रबोधनयुगामुळे युरोपीय समाज आमूलाग्र बदलला आणि तेथे आधुनिकतेचे मोकळे वारे वाहू लागले. भारतातील हिंदू समाजातही तेराव्या शतकात बहुजनवादी संतपरंपरा निर्माण झाली आणि समाज बदलला. मुस्लिम समाजाने मात्र प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला नाही. दलवाईंच्या मते मुस्लिम समाजाने स्वत्व टिकवून व आपल्यात प्रबोधन घडवून राष्ट्रीय ऐक्याची कास धरण्याची गरज आहे. ते अवघड आहे हे त्यांना माहीत होते. मुस्लिम मन कुराण, हदीस, पैगंबराचे जीवन व इस्लामिक परंपरा यांच्या आधारेच बनते. या शब्दप्रामाण्याच्या व धर्मांधतेच्या विळख्यातून मुस्लिम मन मुक्त करण्याचा त्यांनी निकराचा प्रयत्न केला. मुस्लिम समाज उदारमतवादी व धर्मनिरपेक्ष मुस्लिम नेत्यांकडे ढुंकूनही पाहत नाही, मुस्लिम समाजात गांधींसारखी मानवतावादी व्यक्ती निर्माण झाली नाही याचेही दलवाईंना दु:ख आहे.
दलवाई निराशावादी नाहीत. ''एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जातीयवादी शक्तींचे संघटन होत नाही हे लक्षात आले की आपोआपच योग्य ते राजकीय प्रवाह मुस्लिम समाजात दिसू लागतील.'' आसे ते लिहितात. योग्य टीका करुन मुस्लिम मन बदलू शकते, याचा त्यांना विश्वास वाटतो. मुस्लिम मन कायम सनातन्यांच्या पकडीत बंदिस्त राहील असे त्यांना वाटत नाही.
पुस्तकामध्ये ज्या विषयांची चर्चा झाली आहे त्यात आता बराच फरक पडला आहे तरीही दलवाईंनी मांडलेले विचार मूलभूत स्वरुपाचे असल्याने ते आजही महत्त्वाचे वाटावेत. पुस्तकाला भाई वैद्यांची उत्कृष्ट प्रस्तावना आहे.
Monday, January 30, 2012
हमीद दलवाई यांचा परिचय
शमसुद्दिन तांबोळी यांनी संपादित केलेल्या ‘हमीद दलवाई - क्रांतिकारी विचारवंत’ या पुस्तकातून, त्यांच्या परवानगीने-
हमीदभाईंचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ला रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील मिरजोळी या गावी झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण चिपळूणमध्ये झाले व १९५१ साली ते मॅट्रिक झाले. मुंबईच्या इस्माईल युसुफ महाविद्यालय व रूपारेल महाविद्यालयात त्यांनी इंटरमिडीएट आर्ट्सपर्यंतचे शिक्षण घेतले ते १९५४ ते १९६३ पर्यंत काही किरकोळ नोकऱ्या करत राहिले. या काळापूर्वीपासून ते राष्ट्रसेवा दल व समाजवादी पक्षातर्फे राजकीय व सांस्कृतिक कार्य करीतच होते. दरम्यान, हमीदभाईंनी ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘वसुधा’ आदी नियतकालिकांतून कथालेखन चालू ठेवले होते. ‘लाट’ हा त्यांचा एकमेव कथासंग्रह १९६० साली साधना प्रकाशनाने काढला. ‘मौज’तर्फे ‘इंधन’ ही त्यांची एकमेव कादंबरी १९६६ साली प्रसिद्ध झाली. ही कादंबरी व काही कथांना मुस्लीम समाजाची पार्श्वभूमी होती. ‘कफनचोर’ या कथेमुळे हमीदभाई सर्जनशील लेखक म्हणून प्रसिद्धीस आले. ‘इंधन’ या आत्मकथनपर कादंबरीत कोकणातील एका गावात स्वातंत्र्योत्तर काळात वातावरण कसे बदलत गेले; हिंदू-मुसलमान तणाव कसा वाढत गेला; इरेस पेटलेल्या दोन्हीकडच्या लोकांनी गावचे एरवीचे वातावरण कसे ढवळून काढले, याचे तरल, संवेदनशील आणि वास्तव चित्रण आहे.
या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचे १९६६ सालचे पारितोषिक मिळाले. सामान्य वाचक व समीक्षक यांना सारख्याच आवडणाऱ्या या कादंबरीने चिपळुणात मात्र लोकक्षोभाला तोंड दिले. हिंदीमध्ये ही कादंबरी याच नावाने भाषांतरित आहे.
दलवाईंनी ‘मराठा’त १९६३ के १९६८ या काळात पत्रकारिता केली. १९६८नंतर मुस्लीम समाजसुधारणेचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. त्यांचे साहित्यलेखनही थांबले. मराठी भाषेने एक सर्जनशील, वास्तवावादी लेखक गमावला; पण मुस्लीम समाजसुधारणेच्या महत्त्वपूर्ण कामासाठी दिले गेलेले साहित्यिकाचे बलिदान वाया गेले नाही.
मुस्लीम स्त्रीची दयनीय अवस्था आणि दर्जा सुधारण्यासाठी योग्य त्या कायद्याच्या मागणीसाठी हमीदभाईंनी मुंबई येथे कौन्सिल हॉलवर सात मुस्लीम स्त्रियांचा मोर्चा १८ एप्रिल १९६६ रोजी नेला. हा मोर्चा पुढे होणाऱ्या मुस्लीम प्रबोधनवादी चळवळीची नांदी ठरला. मुस्लीम स्त्रीची शोचनीय स्थिती सुधारून समाजांतर्गत स्त्री-स्त्री समानता व धर्मांतर्गत स्त्री-पुरुष समानता हा दलवाईंच्या विचारसरणीचा गाभा होता. इस्लाम व इस्लामची ऐतिहासिक परंपरा यांची इहवादी चिकित्सा हा त्यांच्या विचारप्रक्रियेचा केंद्रबिंदू होता.
भारतीय मुस्लीम समाजाचे वास्तविक आकलन करून घेण्यासाठी हमीदभाई भारतभर फिरले. या त्यांच्या दौऱ्यासाठी ‘इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रिडम’, ‘आंतरभारती’, कोल्हापूरचा कोरगांवकर ट्रस्ट, ‘सेक्युलर फोरम’, ‘मराठा’, ‘मौज’ वगैरेंनी सर्वतोपरी साहाय्य केले.
भारतभर पसरलेले मुसलमान हे वेगवेगळ्या विचारसरणीचे, विविध व्यक्तिमत्त्वांचे आहेत व मुसलमान समाज संघटित असल्याच्या तथाकथित मुस्लीम नेतृत्त्वाचा दावा फोल आहे, असे या दौऱ्यानंतर हमीदभाईंचे मत बनले. त्यांनी आपली विश्लेषणे, विचारप्रणाली व भूमिका स्पष्टपणे मांडावयास सुरुवात केली. भारतात बहुसंख्याक असलेल्या हिंदूंना दलवाईंचे सांगणे असे, ‘ज्या हिंदूंनी मुस्लीम जातीयवादाचा प्रतिकार करायचा आहे, ते हिंदूंना सनातनी बनविण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ज्या हिंदूंना हिंदू समाजाला आणि पर्यायाने देशाला आधुनिकतेच्या रस्त्याने न्यायचे आहे ते मुस्लीम जातीयवाद्यांना मिठ्या मारीत आहे. हे दृश्य बदलले पाहिजे. मुस्लीम जातीयवादाचा प्रतिकार करणाऱ्या हिंदूंच्या मी बाजूचा आहे, पण हिंदूंना सनातनी बनविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा मी विरोधक आहे. त्याचबरोबर हिंदूंना आधुनिक बनवणाऱ्यांना माझा पाठिंबा आहे. मुस्लीम जातीयवादाचा प्रतिकार न करण्याच्या त्यांच्या धोरणाचा मी विरोधक आहे.’
हमीदभाई एक लोकशाही समाजवादी कार्यकर्ता होते. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण व काही प्रमाणात महात्मा गांधींचा त्यांच्यावर प्रभाव होता. एकंदर भारतीय समाजात व विशेषतः भारतीय मुस्लिमांत जी धर्म आणि राजकारण यांची गल्लत झाली आहे, तिच्यावर प्रहार करून त्या दोहोंची फारकत दलवाईंना अभिप्रेत होती. याशिवाय सध्याच्या मुस्लीम जातीयवादाला भारतातील सर्वच राजकीय पक्ष कारणीभूत आहेत, त्यांनीच मतांच्या राजकारणापायी मुस्लिमांचा जातीयवाद अप्रत्यक्षपणे पोसला आहे, असा विचार हमीदभाईंनी मांडला. देशातील राजकीय पक्षांना मुस्लीम अनुनय सोडण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी वारंवार केले.
धर्मातीतता, धर्मनिरपेक्षता, इहवाद या प्रतिशब्दांनी परिचित असलेले ‘सेक्युलॅरिझम’ हे मूल्य हमीदभाईंना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीयत्व, विज्ञाननिष्ठा आदी आधुनिक जागतिक मूल्यांइतकेच महत्त्वाचे वाटत होते आणि ‘सेक्युलॅरिझ’ मुस्लीम समाजाच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनात वागवणे त्यांना आपल्या कामाच्या दृष्टीने अत्याधिक आवश्यक वाटे. त्यांनी काढलेल्या पहिल्याच मोर्चापासून स्त्रियांना हक्क मिळवून देऊन स्त्रीमुक्तीच्या मार्गाने स्त्री-पुरुष समानता साधणे हे तर दलवाईंचे मिशन होते. मुस्लीम स्त्रीला तिच्या धर्मात व समाजात दुय्यम व अन्यायी स्थान आहेच, पण भारतातील प्रचलित कायद्यानुसार हिंदू स्त्रीइतकेही तिला अधिकार नाहीत. दलवाईंनी व नंतर मुस्लीम सत्यशोधक मंडळाने घेतलेले बरेच कार्यक्रम या विचारमालिकेशी संबंधित होते आणि तलाकपीडित स्त्रियांना पोटगी मिळवून देण्यासाठी झगडा उभारून केलेले विधायक कामही.
हे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी लेख, भाषणे, जाहीर सभा यांद्वारे दलवाईंनी एक मोहीमच काढली. ‘साधना ट्रस्ट’तर्फे आपल्या विचारांची व त्यांना जोड देणाऱ्या अनुभवांची मांडणी करणारी तीन भाषणे दिली. याशिवाय आपल्या विचारांच्या तरुणांशी संपर्क साधण्यासाठी त्यांनी अ. भि. शहांच्या बरोबरीने इंडियन सेक्युलर सोसायटी १९६८ साली मुंबईत स्थापन केली, परंतु त्यानंतर दोन वर्षांपर्यंत स्वतः दलवाईंखेरीज एकही मुस्लीम त्या सोसायटीकडे न फिरकल्याने दलवाई निराश झाले. दरम्यान, त्यांनी भाषणे देणे, प्रसारमाध्यमांत लेख लिहिणे, दौरे आदी चालूच ठेवले. पुणे, कोल्हापूर, बेळगाव या शहरांत आणि गडहिंग्लज, निपाणी, आजरा, उत्तूर, संकेश्वर, कुरुंदवाड या ग्रामीण भागात राष्ट्रसेवा दलातर्फे त्यांचा एह महत्त्वाचा दौरा आयोजित केला गेला. भाषणे, सभा, चर्चा इत्यादी मार्गाने मुस्लीम तरुणांशी आपल्या विचारसरणीबाबत व त्यांची प्रतिक्रिया आजमावण्यासाठी ते संवाद साधत.
अ. भि. शहा, यदुनाथ थत्ते, नरहर कुरुंदकर, प्रा. असफ ए. ए. फैजी, डॉ. मोईन शाकीर आदींबरोबरच भाई वैद्य व डॉ. बाबा आढाव या समविचारी मंडळींनी हमीदभाईंना त्यांच्या कामात साहाय्य केले. वैद्य व आढाव यांना हमीदभाईंच्या विचारांना प्रतिसाद देतील असे पुण्यातील काही मुस्लीम तरुण परिचित होते. सय्यदभाई, मुनीर सय्यद, अमीर शेख, अन्वर शेख, रफीऊद्दीन सय्यद, बशीर तांबोळी, मकबूल तांबोळी आदी तरुणांशी हमीदभाईंचा परिचय करून दिला. कोल्हापूरच्या हुसेन जमादारांचा कोल्हापूर दौऱ्यात परिचय झाला होताच. एन. आर. बारगीर, महंमदगौस नाईक, आय. एन. बेग व मुमताज रहिमतपुरे ही मंडळी जमादारांबरोबर होती. अशा प्रकारे पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, मुंबई, सातारा येथील या सर्व तरुणांशी एकत्रित चर्चा झाल्यावर मुस्लिमांसाठी, मुस्लिमांची अशी एखादी संघटना काढण्याची हमीदभाईंना गरज वाटू लागली व पुढे सुमारे दीड वर्ष चर्चा होऊन मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली.
हमीदभाईंना मुस्लीम सत्यशोधक चळवळीसाठी १९६६ ते १९७७ अशी उणीपुरी अकरा वर्षे देता आहे. नवी दिल्लीची ऑल इंडिया कॉन्फरन्स फॉर फॉरवर्ड लुकींग मुस्लिम्स, पुण्याची महाराष्ट्र राज्य मुस्लीम महिला परिषद, मुंबईची मुस्लीम सामाजिक परिषद व कोल्हापूरची मुस्लीम शिक्षण परिषद असे काही ठळक कार्यक्रम हमीदभाईंनी मंडळाद्वारे आयोजित केले व यशस्वी करून दाखवले. त्यांनी फार मोजकेच लेखन केले. ‘मुस्लीम जातीयतेचे स्वरूप – कारणे व उपाय’, ‘इस्लामचे भारतीय चित्र’ व ‘मुस्लीम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया’ हे इंग्रजी भाषेतील पुस्तक यांचा त्यांच्या लेखनसंग्रहात समावेश होतो. याशिवाय आपल्या विचारांच्या प्रचारासाठी व त्या त्या काळात घडणाऱ्या मुस्लीम समाजसंदर्भातील घटनांवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध विषयांवर अनेक लेख त्यांनी लिहिले व व्याख्याने दिली. हे लेख ‘क्वेस्ट’, ‘सेक्युलॅरिस्ट’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘इंडियन एक्सप्रेस’ आदी इंग्रजी व ‘मराठा’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘साधना’ आदी मराठी प्रकाशनांत लिहिले.
हमीदभाईंनी मुस्लीम राजकारणावर टीका केल्याने चिडलेल्या मुस्लीम जातीयवादी नेतृत्वाने इस्लामविरोधक, काफीर, हिंदूंचा एजंट वगैरे विशेषणे लावून त्यांच्या बदनामीची मोहीमच आखली होती. धमक्या तर नेहमीच्याच, पण त्यांच्यावर हल्ल्याचे प्रयत्नही झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही पुणे व मुंबई महापालिकेत मुस्लीम नगरसेवकांनी दलवाईंना श्रद्धांजली वाहण्यास विरोध केला. नरहर कुरुंदकर म्हणतात, ‘दलवाईंच्या कार्यातील अडचणी लक्षात घेता खऱ्या आश्चर्यकारक गोष्टी दोन आहेत : पहिली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांना आजारी पडून मरण्याची संधी मिळाली, त्यांना हुतात्मा व्हावे लागले नाही. त्याहून अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेराशे वर्षांच्या परंपरेविरुद्ध बंड करणाऱ्या या बंडखोराला पाहता पाहता तीन-चारशे अनुयायी मिळाले.’
हमीदभाईंचा अंत ३ मे १९७७ या दिवशी झाला. त्यापूर्वी दीर्घकाळ ते किडनीच्या विकाराने आजारी होते. हमीदभाईंची अंतिम इच्छा नमूद करण्यासारखी आहे, ‘माझ्या मृत्यूनंतर माझे शव माझ्या गावी नेऊ नये, विद्युतदाहिनीत माझ्या शवाचे दहन करावे. मुसलमान किंवा हिंदू पद्धतीने कोणताही धार्मिक संस्कार अगर श्रद्धांजलीची भाषणे करून नयेत. निरिश्वरवादी म्हणून मी जगलो व निरिश्वरवादी म्हणून मला मरायचे आहे. माझे स्मारक उभारू नयेत. या देशात ‘इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट’ स्थापन व्हावी ही माझी आवडती इच्छा. काही खासगी व निमसरकारी यंत्रणांनी चालविलेल्या काही संस्था आहेत, पण त्यांच्या कामाने माझे समाधान झालेले नाही. इस्लाम व त्याची संस्कृती सुधारू इच्छिणाऱ्या माझ्या मित्रांशी अशी संस्था स्थापन करावी. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय अशा मूलभूत चळवळीचे तसेच शहरी चळवळीचे प्रतिबिंब या संशोधनात दिसले पाहिजे. इस्लामच्या समस्यांना वाहिलेले एक नियतकालिकही त्या संस्थेने सुरू करावे. जगातील इस्लामिक चळवळीची दखल या नियतकालिकाने घ्यावी. मी सुखाने जगलो. माझी आता कोणाहीविरुद्ध तक्रार नाही. माझ्याशी ज्यांचे मतभेद होते, त्यांच्याशी मी झगडलो. पण माझा कोणाहीविरुद्ध आकस नाही. म्हणून त्यांच्याशीही वैयक्तिक संबंध ठेवण्याचा मी यत्न केला.’
धर्माविषयी दलवाईंची भूमिका वेगळी व टोकाची होती, हे या अंतिम इच्छेसंदर्भात नमूद करणे आवश्यक आहे. आपण मुसलमान आहोत म्हणून आपल्या समाजातील दोषांचे दिग्दर्शन करून ते सुधारणे हे आपले पहिले कर्तव्य आहे, असा दलवाईंचा आग्रह होता. ‘धर्म ही खासगी बाब’ मानणारे दलवाई नास्तिक निरिश्वरवादी होते, पण आपली ही भूमिका त्यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळावर अथवा कार्यकर्त्यांवर लादायचा पुसटसा प्रयत्नही कधी केला नाही. नास्तिकता ही दलवाईंची वैयक्तिक भूमिका होती, पण मंडळाची नास्तिकतेची भूमिका कधीही नव्हती व नाही.
हमीदभाईंचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ला रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील मिरजोळी या गावी झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण चिपळूणमध्ये झाले व १९५१ साली ते मॅट्रिक झाले. मुंबईच्या इस्माईल युसुफ महाविद्यालय व रूपारेल महाविद्यालयात त्यांनी इंटरमिडीएट आर्ट्सपर्यंतचे शिक्षण घेतले ते १९५४ ते १९६३ पर्यंत काही किरकोळ नोकऱ्या करत राहिले. या काळापूर्वीपासून ते राष्ट्रसेवा दल व समाजवादी पक्षातर्फे राजकीय व सांस्कृतिक कार्य करीतच होते. दरम्यान, हमीदभाईंनी ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘वसुधा’ आदी नियतकालिकांतून कथालेखन चालू ठेवले होते. ‘लाट’ हा त्यांचा एकमेव कथासंग्रह १९६० साली साधना प्रकाशनाने काढला. ‘मौज’तर्फे ‘इंधन’ ही त्यांची एकमेव कादंबरी १९६६ साली प्रसिद्ध झाली. ही कादंबरी व काही कथांना मुस्लीम समाजाची पार्श्वभूमी होती. ‘कफनचोर’ या कथेमुळे हमीदभाई सर्जनशील लेखक म्हणून प्रसिद्धीस आले. ‘इंधन’ या आत्मकथनपर कादंबरीत कोकणातील एका गावात स्वातंत्र्योत्तर काळात वातावरण कसे बदलत गेले; हिंदू-मुसलमान तणाव कसा वाढत गेला; इरेस पेटलेल्या दोन्हीकडच्या लोकांनी गावचे एरवीचे वातावरण कसे ढवळून काढले, याचे तरल, संवेदनशील आणि वास्तव चित्रण आहे.
या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचे १९६६ सालचे पारितोषिक मिळाले. सामान्य वाचक व समीक्षक यांना सारख्याच आवडणाऱ्या या कादंबरीने चिपळुणात मात्र लोकक्षोभाला तोंड दिले. हिंदीमध्ये ही कादंबरी याच नावाने भाषांतरित आहे.
दलवाईंनी ‘मराठा’त १९६३ के १९६८ या काळात पत्रकारिता केली. १९६८नंतर मुस्लीम समाजसुधारणेचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. त्यांचे साहित्यलेखनही थांबले. मराठी भाषेने एक सर्जनशील, वास्तवावादी लेखक गमावला; पण मुस्लीम समाजसुधारणेच्या महत्त्वपूर्ण कामासाठी दिले गेलेले साहित्यिकाचे बलिदान वाया गेले नाही.
मुस्लीम स्त्रीची दयनीय अवस्था आणि दर्जा सुधारण्यासाठी योग्य त्या कायद्याच्या मागणीसाठी हमीदभाईंनी मुंबई येथे कौन्सिल हॉलवर सात मुस्लीम स्त्रियांचा मोर्चा १८ एप्रिल १९६६ रोजी नेला. हा मोर्चा पुढे होणाऱ्या मुस्लीम प्रबोधनवादी चळवळीची नांदी ठरला. मुस्लीम स्त्रीची शोचनीय स्थिती सुधारून समाजांतर्गत स्त्री-स्त्री समानता व धर्मांतर्गत स्त्री-पुरुष समानता हा दलवाईंच्या विचारसरणीचा गाभा होता. इस्लाम व इस्लामची ऐतिहासिक परंपरा यांची इहवादी चिकित्सा हा त्यांच्या विचारप्रक्रियेचा केंद्रबिंदू होता.
भारतीय मुस्लीम समाजाचे वास्तविक आकलन करून घेण्यासाठी हमीदभाई भारतभर फिरले. या त्यांच्या दौऱ्यासाठी ‘इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रिडम’, ‘आंतरभारती’, कोल्हापूरचा कोरगांवकर ट्रस्ट, ‘सेक्युलर फोरम’, ‘मराठा’, ‘मौज’ वगैरेंनी सर्वतोपरी साहाय्य केले.
भारतभर पसरलेले मुसलमान हे वेगवेगळ्या विचारसरणीचे, विविध व्यक्तिमत्त्वांचे आहेत व मुसलमान समाज संघटित असल्याच्या तथाकथित मुस्लीम नेतृत्त्वाचा दावा फोल आहे, असे या दौऱ्यानंतर हमीदभाईंचे मत बनले. त्यांनी आपली विश्लेषणे, विचारप्रणाली व भूमिका स्पष्टपणे मांडावयास सुरुवात केली. भारतात बहुसंख्याक असलेल्या हिंदूंना दलवाईंचे सांगणे असे, ‘ज्या हिंदूंनी मुस्लीम जातीयवादाचा प्रतिकार करायचा आहे, ते हिंदूंना सनातनी बनविण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ज्या हिंदूंना हिंदू समाजाला आणि पर्यायाने देशाला आधुनिकतेच्या रस्त्याने न्यायचे आहे ते मुस्लीम जातीयवाद्यांना मिठ्या मारीत आहे. हे दृश्य बदलले पाहिजे. मुस्लीम जातीयवादाचा प्रतिकार करणाऱ्या हिंदूंच्या मी बाजूचा आहे, पण हिंदूंना सनातनी बनविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा मी विरोधक आहे. त्याचबरोबर हिंदूंना आधुनिक बनवणाऱ्यांना माझा पाठिंबा आहे. मुस्लीम जातीयवादाचा प्रतिकार न करण्याच्या त्यांच्या धोरणाचा मी विरोधक आहे.’
हमीदभाई एक लोकशाही समाजवादी कार्यकर्ता होते. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण व काही प्रमाणात महात्मा गांधींचा त्यांच्यावर प्रभाव होता. एकंदर भारतीय समाजात व विशेषतः भारतीय मुस्लिमांत जी धर्म आणि राजकारण यांची गल्लत झाली आहे, तिच्यावर प्रहार करून त्या दोहोंची फारकत दलवाईंना अभिप्रेत होती. याशिवाय सध्याच्या मुस्लीम जातीयवादाला भारतातील सर्वच राजकीय पक्ष कारणीभूत आहेत, त्यांनीच मतांच्या राजकारणापायी मुस्लिमांचा जातीयवाद अप्रत्यक्षपणे पोसला आहे, असा विचार हमीदभाईंनी मांडला. देशातील राजकीय पक्षांना मुस्लीम अनुनय सोडण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी वारंवार केले.
धर्मातीतता, धर्मनिरपेक्षता, इहवाद या प्रतिशब्दांनी परिचित असलेले ‘सेक्युलॅरिझम’ हे मूल्य हमीदभाईंना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीयत्व, विज्ञाननिष्ठा आदी आधुनिक जागतिक मूल्यांइतकेच महत्त्वाचे वाटत होते आणि ‘सेक्युलॅरिझ’ मुस्लीम समाजाच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनात वागवणे त्यांना आपल्या कामाच्या दृष्टीने अत्याधिक आवश्यक वाटे. त्यांनी काढलेल्या पहिल्याच मोर्चापासून स्त्रियांना हक्क मिळवून देऊन स्त्रीमुक्तीच्या मार्गाने स्त्री-पुरुष समानता साधणे हे तर दलवाईंचे मिशन होते. मुस्लीम स्त्रीला तिच्या धर्मात व समाजात दुय्यम व अन्यायी स्थान आहेच, पण भारतातील प्रचलित कायद्यानुसार हिंदू स्त्रीइतकेही तिला अधिकार नाहीत. दलवाईंनी व नंतर मुस्लीम सत्यशोधक मंडळाने घेतलेले बरेच कार्यक्रम या विचारमालिकेशी संबंधित होते आणि तलाकपीडित स्त्रियांना पोटगी मिळवून देण्यासाठी झगडा उभारून केलेले विधायक कामही.
हे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी लेख, भाषणे, जाहीर सभा यांद्वारे दलवाईंनी एक मोहीमच काढली. ‘साधना ट्रस्ट’तर्फे आपल्या विचारांची व त्यांना जोड देणाऱ्या अनुभवांची मांडणी करणारी तीन भाषणे दिली. याशिवाय आपल्या विचारांच्या तरुणांशी संपर्क साधण्यासाठी त्यांनी अ. भि. शहांच्या बरोबरीने इंडियन सेक्युलर सोसायटी १९६८ साली मुंबईत स्थापन केली, परंतु त्यानंतर दोन वर्षांपर्यंत स्वतः दलवाईंखेरीज एकही मुस्लीम त्या सोसायटीकडे न फिरकल्याने दलवाई निराश झाले. दरम्यान, त्यांनी भाषणे देणे, प्रसारमाध्यमांत लेख लिहिणे, दौरे आदी चालूच ठेवले. पुणे, कोल्हापूर, बेळगाव या शहरांत आणि गडहिंग्लज, निपाणी, आजरा, उत्तूर, संकेश्वर, कुरुंदवाड या ग्रामीण भागात राष्ट्रसेवा दलातर्फे त्यांचा एह महत्त्वाचा दौरा आयोजित केला गेला. भाषणे, सभा, चर्चा इत्यादी मार्गाने मुस्लीम तरुणांशी आपल्या विचारसरणीबाबत व त्यांची प्रतिक्रिया आजमावण्यासाठी ते संवाद साधत.
अ. भि. शहा, यदुनाथ थत्ते, नरहर कुरुंदकर, प्रा. असफ ए. ए. फैजी, डॉ. मोईन शाकीर आदींबरोबरच भाई वैद्य व डॉ. बाबा आढाव या समविचारी मंडळींनी हमीदभाईंना त्यांच्या कामात साहाय्य केले. वैद्य व आढाव यांना हमीदभाईंच्या विचारांना प्रतिसाद देतील असे पुण्यातील काही मुस्लीम तरुण परिचित होते. सय्यदभाई, मुनीर सय्यद, अमीर शेख, अन्वर शेख, रफीऊद्दीन सय्यद, बशीर तांबोळी, मकबूल तांबोळी आदी तरुणांशी हमीदभाईंचा परिचय करून दिला. कोल्हापूरच्या हुसेन जमादारांचा कोल्हापूर दौऱ्यात परिचय झाला होताच. एन. आर. बारगीर, महंमदगौस नाईक, आय. एन. बेग व मुमताज रहिमतपुरे ही मंडळी जमादारांबरोबर होती. अशा प्रकारे पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, मुंबई, सातारा येथील या सर्व तरुणांशी एकत्रित चर्चा झाल्यावर मुस्लिमांसाठी, मुस्लिमांची अशी एखादी संघटना काढण्याची हमीदभाईंना गरज वाटू लागली व पुढे सुमारे दीड वर्ष चर्चा होऊन मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली.
हमीदभाईंना मुस्लीम सत्यशोधक चळवळीसाठी १९६६ ते १९७७ अशी उणीपुरी अकरा वर्षे देता आहे. नवी दिल्लीची ऑल इंडिया कॉन्फरन्स फॉर फॉरवर्ड लुकींग मुस्लिम्स, पुण्याची महाराष्ट्र राज्य मुस्लीम महिला परिषद, मुंबईची मुस्लीम सामाजिक परिषद व कोल्हापूरची मुस्लीम शिक्षण परिषद असे काही ठळक कार्यक्रम हमीदभाईंनी मंडळाद्वारे आयोजित केले व यशस्वी करून दाखवले. त्यांनी फार मोजकेच लेखन केले. ‘मुस्लीम जातीयतेचे स्वरूप – कारणे व उपाय’, ‘इस्लामचे भारतीय चित्र’ व ‘मुस्लीम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया’ हे इंग्रजी भाषेतील पुस्तक यांचा त्यांच्या लेखनसंग्रहात समावेश होतो. याशिवाय आपल्या विचारांच्या प्रचारासाठी व त्या त्या काळात घडणाऱ्या मुस्लीम समाजसंदर्भातील घटनांवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध विषयांवर अनेक लेख त्यांनी लिहिले व व्याख्याने दिली. हे लेख ‘क्वेस्ट’, ‘सेक्युलॅरिस्ट’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘इंडियन एक्सप्रेस’ आदी इंग्रजी व ‘मराठा’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘साधना’ आदी मराठी प्रकाशनांत लिहिले.
हमीदभाईंनी मुस्लीम राजकारणावर टीका केल्याने चिडलेल्या मुस्लीम जातीयवादी नेतृत्वाने इस्लामविरोधक, काफीर, हिंदूंचा एजंट वगैरे विशेषणे लावून त्यांच्या बदनामीची मोहीमच आखली होती. धमक्या तर नेहमीच्याच, पण त्यांच्यावर हल्ल्याचे प्रयत्नही झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही पुणे व मुंबई महापालिकेत मुस्लीम नगरसेवकांनी दलवाईंना श्रद्धांजली वाहण्यास विरोध केला. नरहर कुरुंदकर म्हणतात, ‘दलवाईंच्या कार्यातील अडचणी लक्षात घेता खऱ्या आश्चर्यकारक गोष्टी दोन आहेत : पहिली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांना आजारी पडून मरण्याची संधी मिळाली, त्यांना हुतात्मा व्हावे लागले नाही. त्याहून अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेराशे वर्षांच्या परंपरेविरुद्ध बंड करणाऱ्या या बंडखोराला पाहता पाहता तीन-चारशे अनुयायी मिळाले.’
हमीदभाईंचा अंत ३ मे १९७७ या दिवशी झाला. त्यापूर्वी दीर्घकाळ ते किडनीच्या विकाराने आजारी होते. हमीदभाईंची अंतिम इच्छा नमूद करण्यासारखी आहे, ‘माझ्या मृत्यूनंतर माझे शव माझ्या गावी नेऊ नये, विद्युतदाहिनीत माझ्या शवाचे दहन करावे. मुसलमान किंवा हिंदू पद्धतीने कोणताही धार्मिक संस्कार अगर श्रद्धांजलीची भाषणे करून नयेत. निरिश्वरवादी म्हणून मी जगलो व निरिश्वरवादी म्हणून मला मरायचे आहे. माझे स्मारक उभारू नयेत. या देशात ‘इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट’ स्थापन व्हावी ही माझी आवडती इच्छा. काही खासगी व निमसरकारी यंत्रणांनी चालविलेल्या काही संस्था आहेत, पण त्यांच्या कामाने माझे समाधान झालेले नाही. इस्लाम व त्याची संस्कृती सुधारू इच्छिणाऱ्या माझ्या मित्रांशी अशी संस्था स्थापन करावी. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय अशा मूलभूत चळवळीचे तसेच शहरी चळवळीचे प्रतिबिंब या संशोधनात दिसले पाहिजे. इस्लामच्या समस्यांना वाहिलेले एक नियतकालिकही त्या संस्थेने सुरू करावे. जगातील इस्लामिक चळवळीची दखल या नियतकालिकाने घ्यावी. मी सुखाने जगलो. माझी आता कोणाहीविरुद्ध तक्रार नाही. माझ्याशी ज्यांचे मतभेद होते, त्यांच्याशी मी झगडलो. पण माझा कोणाहीविरुद्ध आकस नाही. म्हणून त्यांच्याशीही वैयक्तिक संबंध ठेवण्याचा मी यत्न केला.’
धर्माविषयी दलवाईंची भूमिका वेगळी व टोकाची होती, हे या अंतिम इच्छेसंदर्भात नमूद करणे आवश्यक आहे. आपण मुसलमान आहोत म्हणून आपल्या समाजातील दोषांचे दिग्दर्शन करून ते सुधारणे हे आपले पहिले कर्तव्य आहे, असा दलवाईंचा आग्रह होता. ‘धर्म ही खासगी बाब’ मानणारे दलवाई नास्तिक निरिश्वरवादी होते, पण आपली ही भूमिका त्यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळावर अथवा कार्यकर्त्यांवर लादायचा पुसटसा प्रयत्नही कधी केला नाही. नास्तिकता ही दलवाईंची वैयक्तिक भूमिका होती, पण मंडळाची नास्तिकतेची भूमिका कधीही नव्हती व नाही.
Subscribe to:
Comments (Atom)
Blog Archive
Followers
इतर काही गोष्टी
या कात्रणवहीसाठी माहितीसंकलन व टायपिंग, इत्यादी खटाटोप केलेल्या व्यक्तीनंच वरील वह्याही तयार केल्या आहेत. त्याच्या सुट्या वेगळ्या वहीसाठी पाहा: रेघ







